पणजी: शालेय विद्यार्थ्यांच्या दप्तराच्या ओझ्याबाबत शिक्षण मंत्रालयाने २०२० मध्ये धोरण तयार केले असले, तरी राज्यात दरवर्षी या धोरणाची पायमल्ली होताना स्पष्टपणे दिसून येत आहे. शिक्षण खाते दरवर्षी याबाबत परिपत्रक काढत असले, तरी शिक्षण संस्थांकडून या परिपत्रकाला ‘केराचीच टोपली’ दाखवली जात आहे.
‘स्कूल बॅग धोरण-२०२०’मध्ये शालेय विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे त्यांच्या वजनाच्या दहा टक्क्यांपेक्षा जास्त असू नये, असा नियम आहे. परंतु राज्यातील अनेक शाळांतील विद्यार्थ्यांच्या पाठीवर त्यांच्या वजनापेक्षा जास्त वजनाचे दप्तर पाहायला मिळते. यासंदर्भात काही विद्यार्थ्यांशी संपर्क साधला असता, वर्गशिक्षकांकडून दरदिवशीचे वेळापत्रक मिळते.
परंतु, वर्गात कधीही कोणताही विषय शिकवला जाऊ शकतो. त्यामुळे विद्यार्थ्यांनी सर्वच विषयांची पुस्तके व वह्या आणण्याच्या सूचना शिक्षकांकडून देण्यात येतात. त्यामुळे दररोज सर्वच विषयांची पुस्तके, वह्या घेऊन जाव्या लागतात, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. दप्तरात पुस्तके, वह्या यांसोबतच पाण्याची बाटली, जेवणाचा डबा हे साहित्यही असते. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे अधिक भरत असल्याचे पालकांनी सांगितले.
दप्तराच्या वाढत्या वजनामुळे शालेय विद्यार्थ्यांमध्ये मान, कंबरदुखीच्या आजारांत वाढ झाल्याचे चित्र काही वर्षांपूर्वी विविध राज्यांमधून समोर आले होते. त्यामुळेच केंद्र सरकारने विद्यार्थ्यांच्या वजनाच्या दहा टक्क्यांपेक्षा अधिक वजन त्यांच्या दप्तराचे नसावे, अशी अट राज्यांना घातली होती.
शिक्षण मंत्रालयाच्या आदेशानुसार दप्तराच्या ओझ्याबाबत शिक्षण खाते दरवर्षी परिपत्रक जारी करीत असते. या परिपत्रकातील सूचनांचे काटेकोरपणे पालन करणे शिक्षण संस्थांची जबाबदारी असते, अशी प्रतिक्रिया शिक्षण संचालक शैलेश झिंगडे यांनी दिली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.