Mulgao Residents Meeting Against Vedanta Mining
डिचोली: खनिज प्रश्नावरून मुळगाववासीय आता निर्णायक संघर्षाच्या तयारीत आहेत. येत्या रविवारी (ता. २६) सायंकाळी ४ वाजता खाणविरोधी जाहीर सभेचे आयोजन गावकरवाडा येथील श्री केळबाई देवीच्या मंदिरात करण्यात आले आहे.
गेल्या रविवारी मुळगाव पंचायतीच्या ग्रामसभेत ठरल्याप्रमाणे ही जाहीर सभा बोलाविण्यात आली आहे. या सभेत खाणविरोधी पुढील कृती निश्चित करण्यात येणार आहे. खाण लीज क्षेत्रातून मुळगाव हा गाव बाहेर काढा, गावचे निसर्गवैभव जपा, ही ग्रामस्थांची प्रमुख मागणी आहे.
दीड महिन्यापूर्वी मुळगाव पंचायतीतर्फे ‘वेदान्ता’ कंपनीला निवेदन देण्यात आले असून, त्यात पंधरा मागण्या नमूद करण्यात आल्या आहेत. या निवेदनाच्या प्रती आमदारांसह संबंधित सरकारी यंत्रणांना दिली आहे. गेल्या रविवारी (ता. १९) ग्रामसभेतही खाणीचा विषय पुन्हा ऐरणीवर येऊन खाणीविरोधात ठरावही संमत करण्यात आला होता.
दरम्यान, गावाच्या अस्तित्वासाठी शेतकऱ्यांसह ग्रामस्थांनी या सभेला मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
गाव उद्ध्वस्त करणारा खनिज व्यवसाय आम्हाला नको, या भूमिकेशी सुरवातीपासूनच ठाम असलेले मुळगावमधील लोक पुन्हा एकदा आक्रमक झाले आहेत. खाण लीज क्षेत्रातून मंदिरांसह घरेदारे, शेती-बागायती, नैसर्गिक जलस्रोत वगळून गावातील अन्य प्रश्न सोडविण्याकडे दुर्लक्ष झाल्यास खाणीवर धडक देऊ, असा इशारा पुन्हा एकदा मुळगावमधील ग्रामस्थांनी दिला आहे.
गावाच्या मागण्यांसंदर्भात मुख्यमंत्री, आमदारांना निवेदन दिले आहे. ग्रामसभांनी ठराव संमत करण्यात आले आहेत. शासकीय पातळीवर बैठका घेण्यात आल्या. मात्र आत्तापर्यंत आश्वासनाव्यतिरिक्त काहीच मिळाले नाही. गाव वाचविण्यासाठी कोणीही गांभीर्याने लक्ष पावले उचलली नाहीत, असा दावा श्री केळबाई देवस्थानचे अध्यक्ष वसंत गाड आणि शेतकरी संघाच्या प्रतिनिधींनी केला आहे.
खनिजप्रश्नी मुळगाववासीयांनी पुढे केलेल्या मागण्यासंदर्भात ‘वेदान्ता’ खाण कंपनी गंभीर आहे. सध्या या मागण्या विचाराधीन आहेत. खाणींपासून मुळगाव गावाच्या अस्तित्वाला बाधा पोचणार नाही याची पूर्णपणे काळजी घेण्यात येईल, अशी ग्वाही कंपनीचे मुख्य उपकार्यकारी अधिकारी धीरजकुमार जगदीश यांनी दिली आहे.
गेल्या रविवारी (ता. १९) मुळगावच्या ग्रामसभेत खनिज प्रश्न ऐरणीवर आला होता. डिचोली खाण ब्लॉक-१ अंतर्गतच्या वेदान्ता (सेसा) खाण कंपनीकडून मुळगावच्या जनतेची फसवणूक झाल्याचा आरोप माजी सरपंच वसंत गाड यांनी करून गावावर संकट ओढवून घेण्यापेक्षा खाण बंद करा, असा ठराव ग्रामसभेत घेतला आहे. खाण लीज क्षेत्रातून मंदिरांसह शेती-बागायती, नैसर्गिक जलस्रोते बाहेर काढा, तळ्यातील गाळ उपसा, शेतकऱ्यांना प्रलंबित नुकसान भरपाई द्या, स्थानिकांना रोजगाराची संधी द्या, आदी मुळगाववासीयांच्या मागण्या आहेत.
खाण लीज क्षेत्रातून भाग बाहेर काढण्यासंदर्भात सरकारच निर्णय घेऊ शकते. मुळगावातील जवळपास ५० कुटुंबे खाणीवर अवलंबून आहेत. हा व्यवसाय बंद झाला तर साडेतीन हजाराहून अधिक लोकांवर त्याचा परिणाम होईल, असा दावा कंपनीने केला आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.