फोंडा: फोड्यातील काँग्रेस नेते डॉ. केतन भाटीकर यांच्या आकस्मिक निधनामुळे फोंड्याचे राजकारण बदलण्याचे संकेत मिळत आहेत. भाटीकर हे फोंड्याच्या राजकारणातील एक प्रमुख मोहरे म्हणून गणले जात असत. २०२२ साली मगोपतर्फे निवडणूक लढविलेल्या भाटीकरांना ७,४३७ मते प्राप्त झाली होती आणि त्यांचा भाजपच्या रवी नाईकांकडून अवघ्या ७७ मतांनी पराभव झाला होता. तर नुकतीच रद्द झालेली फोंड्याची पोटनिवडणूक त्यांनी काँग्रेस पक्षातर्फे लढवली होती आणि या पोटनिवडणुकीतही त्यांनी जबरदस्त हवा निर्माण केली होती.
विशेष म्हणजे फोंडा मगोपचे अनेक कार्यकर्ते भाजपबरोबर युतीत असून सुद्धा काँग्रेसच्या भाटीकरांबरोबर वावरताना दिसत होते. पोटनिवडणूक रद्द झाल्यामुळे त्यांनी आता २०२७सालची निवडणूक लढविण्याची तयारीही सुरू केली होती. पण, काँग्रेसचे कुशावती जिल्हाप्रमुख तसेच गेल्या निवडणुकीचे काँग्रेसचे उमेदवार राजेश वेरेकर यांनीही परत रिंगणात उतरण्याची इच्छा प्रदर्शित केल्यामुळे केतन की राजेश असा एक गुंता तयार होत होता. हा गुंता सुटला असला तरी त्यांच्या अकाली निधनामुळे फॉड्याच्या राजकीय पटलावर अनेक प्रश्नचिन्हे उभी राहायला लागली आहेत.
सर्वात मोठा प्रश्न आहे तो भाटीकरांच्या असंख्य कार्यकर्त्यांचा. या कार्यकर्त्यांना आता नेता कोण यावरही चर्चीतचर्वण होताना दिसत आहे. यावर सध्या तीन संभाव्य शक्यता व्यक्त होत आहे. या कार्यकर्त्यात अल्पसंख्याकांचे प्रमाण मोठे असल्यामुळे आणि हे लोक प्रामुख्याने काँग्रेसचे मतदार असल्यामुळे ते परत काँग्रेसकडे वळू शकतात, असा एक मतप्रवाह ऐकू येत आहे. आगामी निवडणुकीत मगोप भाजपची युती राहिल्यास पूर्वाश्रमीचे मगोप पण आता भाटीकरांमुळे काँग्रेसकडे वळलेले कार्यकर्ते या युतीकडे जाऊ शकतात, असेही बोलले जात आहे.
तसेच भाटीकरांच्या मुशीतून तयार झालेल्या काही कार्यकर्त्यांतून नवे नेतृत्व तयार होऊ शकते, अशीही शक्यता व्यक्त होत आहे. भाटीकरांच्या अनपेक्षित 'एक्झिट'मुळे नवी समीकरणे उदयास येऊ शकतात, असाही होरा व्यक्त होऊ लागला आहे. राजकीय पोकळी भरून काढण्याच्या दृष्टीने फोंड्यात अनेक जर तरची समीकरणे निर्माण होऊ शकतात, असे संकेत आतापासूनच मिळायला लागले आहेत.
गेल्या निवडणुकीत काँग्रेसतर्फे रिंगणात उतरून फोंडा मतदारसंघात ६,८३९ मते प्राप्त केलेले राजेश वेरेकर यांनी सध्या सावध भूमिका घेतल्याचे दिसून येत आहे. रह झालेल्या पोटनिवडणुकीतही याचा प्रत्यय आला होता. उमेदवारी करता इच्छुक असल्यामुळे नव्यानेच प्रवेश केलेल्या भाटीकराना काँग्रेसने उमेदवारी दिल्यानंतर राजेश नाराज होतील, अशी सर्वसाधारण अपेक्षा होती. पण राजेशनी नाराजी वा शक्ती प्रदर्शनाचा आधार न घेता भाटीकरांना निवडणुकीत सक्रिय पाठिंबा दिला होता. त्यांच्या या 'मुव्ह'चे भाटीकरांच्या कार्यकर्त्यांकडून स्वागतही करण्यात आले होते.
भाटीकरांच्या निधनाच्या दोन दिवसांपूर्वी व्हायरल झालेल्या व्हिडिओत सुद्धा त्यांनी आपण जरी काँग्रेसच्या उमेदवारी करता इच्छुक असलो तरी आपण व केतन एक असून ज्याला पक्ष उमेदवारी देईल त्याच्याकरता दुसरा कार्य करील, असे सांगून संभाव्य बंडाच्या शक्यतेवर पडदा टाकला होता. यामुळे ते भाटीकरांच्या कार्यकर्त्यांच्या 'गुड बुक्स'मध्ये शिरले होते. तसे अनेक कार्यकर्त्यांनी बोलूनही दाखवले होते. आता भाटीकरांच्या निधनानंतर नक्की काय होईल हे सांगणे कठीण असले तरी राजकारणात आक्रमक भूमिकेपेक्षा कधीकधी सावध भूमिका फायदेशीर ठरू शकते, हेही तेवढेच खरे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.