फोंड्यात सध्या बनवेगिरीचे प्रकरण गाजत आहे. फोंडा पालिकेच्या एका नगरसेवकाकडून बनावट दाखले दिल्याचे स्पष्ट झाले आहे. फोंडा पोलिसांनी या नगरसेवकाला एक नव्हे तर दोनवेळा अटकही केली आहे. मात्र हा नगरसेवक जामिनावर सहीसलामत सुटला आहे. आता प्रश्न असा उद्भवतो तो म्हणजे ही दोनच प्रकरणे उघडकीस आली आहेत, अशी आणखी कितीतरी प्रकरणे असतील जी उघड झाली नसतील. आता या प्रकरणात आणखी कुणी सामील आहेत काय असाही सवाल उपस्थित होत आहे. त्यामुळे बनावट दाखल्यांपासून सावध रहा ,रे बाबा... असे म्हणण्याची पाळी फोंडावासीयांवर आली आहे. ∙∙∙
भाजप प्रदेशाध्यक्षपदाची धुरा हाती घेताच एकाही भाजप पदाधिकाऱ्यावर अन्याय होऊ देणार नाही, अशी घोषणा दामू नाईक यांनी केली होती. त्यामुळे मंत्री तथा पणजीचे आमदार बाबूश मोन्सेरात यांच्या राजकारणाचा अंदाज असलेल्या आणि बाबूशच्या एंट्रीनंतर बाहेर फेकल्या गेलेल्या पणजीतील भाजपच्या केडर नेत्यांमध्ये समाधान पसरले होते. सुरुवातीच्या काळात दामूंनी घोषणा लक्षात ठेवून पणजीतील पदाधिकाऱ्यांशी जवळीकही ठेवली. पण, हळूहळू दामूही राजकारण केंद्रस्थानी ठेवून वाटचाल करीत असल्याने पणजीतील अनेक पदाधिकारी पक्षापासून दूर जात आहेत. अशा पदाधिकाऱ्यांना आपल्याकडे खेचण्याचे प्रयत्न उत्पल पर्रीकर गुप्तपणे करीत आहेत. पण, त्याचा काहीही उपयोग होणार नसल्याचे माहीत असल्यामुळेच दामू त्यांचा जास्त विचार करीत नसतील का? ∙∙∙
‘शिक्षणाच्या आईचा घो’ नावाचा एक मराठी सिनेमा आला होता. या सिनेमात पाल्यांवर होणाऱ्या मानसिक तणावावर सुंदर चित्रण झाले आहे. आजही आपली कोवळी पिढी शिक्षणाच्या दबावात बळी पडून आपले जीवन संपवितात. नव्या शिक्षण धोरणामुळे विद्यार्थ्यांना आनंददायी शिक्षण मिळणार, ही आशा फोल ठरली आहे. गेल्या सहा महिन्यात आपल्याच राज्यातील एका अग्रगण्य शिक्षण संस्थेतील तीन हुशार विद्यार्थ्यांनी तणाव सहन झाल्याने जीवन संपविले. जे शिक्षण विद्यार्थ्यांना तणाव सहन करण्याची शक्ती देऊ शकत नाहीत, त्या शिक्षणाचा फायदाच काय? अशा ‘क्रीमी’ शिक्षण संस्थेत शिक्षण घेणारे हुशार विद्यार्थीच जर आपले जीवन संपवायला लागले तर अशा शिक्षण संस्थेला टाळे ठोकलेलेच योग्य नव्हे काय? ∙∙∙
नागेशी - बांदोडा येथील सात दिवसांचा अखंड भजनी सप्ताह गोवाभर प्रसिद्ध आहे. शेवटच्या दिवशी दहीहंडी कार्यक्रमाने या उत्सवाची सांगता होते. विशेष म्हणजे या उत्सवातील कार्यक्रमांना या भागाचे आमदार तथा वीजमंत्री सुदिन ढवळीकर आवर्जून उपस्थिती लावतात. स्वतः भजनात सहभागी होतात. भाविकांशी संवाद साधतात, त्यामुळे एक प्रकारचे आपलेपणाचे नाते निर्माण होते. एरव्ही आमदार म्हटल्यावर फक्त उद्घाटनापुरते आणि समारोपाच्या कार्यक्रमाला दिसण्यापुरते काम लोकप्रतिनिधी करतात, पण सुदिनराव हातात टाळ घेऊन कपाळावर छानपैकी चंदनाचा टिळा लावून आणि डोक्यावर वारकऱ्याची टोपी घेऊन भजनात रमतात, हे विशेष... अशी चर्चा सप्ताहस्थळी सुरू होती. ∙∙∙
स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला मडगावात भाजपने तिरंगा यात्रेचे आयोजन केले होते. या यात्रेला उस्फूर्त प्रतिसाद लाभला. पाऊस पडत असतानाही लोकांची उपस्थिती लक्षणीय होती. आमदार दिगंबर कामत यांचे समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते. ही गर्दी बघून कामत मनातून सुखावले. दुसऱ्या दिवशी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ध्वजारोहणाचा मानही कामत सरांना मिळाला. आता लवकरच आमच्या बाबांना मंत्रिपद मिळेल व तेही गलेलठ्ठ असे त्यांचे समर्थक छाती पुढे काढून सांगू लागले आहेत. मंत्रिपद वाटप कधी होईल, हे अजून निश्चित झालेले नाही, मात्र बाबा मंत्री होणार याचा शंभर टक्के विश्वास त्यांच्या कार्यकर्त्यांना आहे हे मात्र खरे. ∙∙∙
पापाचे घडे भरले, की त्याचे प्रायश्चितही भोगावेच लागते. मुंगूल येथील गॅंगवॉर प्रकरणाने ही बाब पुन्हा अधोरेखित केली आहे. या गॅंगवॉर प्रकरणी फरार संशयितांना मदत करणारा दीपकभाई याच्या हातात फातोर्डा पोलिसांनी शेवटी बेड्या ठोकल्या. राजकारण्याचा जबरदस्त वरदहस्त लाभलेल्या या भाईला दोन दिवसांपूर्वीच पोलिसांनी ताब्यात घेतले होते. वरून राजकीय दबाव येत होता. आई तथाकथित सामाजिक कार्यकर्त्या, राजकारण्याशीही लॉबिंग. मात्र त्याचे पितळ शेवटी उघडे पडलेच. तो सरकारी कर्मचारीही आहे. काही वर्षांपूर्वी त्याने पीएसआय बनण्यासाठी प्रयत्नही केले होते. मात्र त्याचे हे प्रयत्न त्यावेळी फळास लागले नाही. जर तो पोलिसात अधिकारी झाला असता तर काय अनर्थ घडला असता, देवच जाणे. ∙∙∙
‘शिक्षणाच्या आईचा घो’ नावाचा एक मराठी सिनेमा आला होता. या सिनेमात पाल्यांवर होणाऱ्या मानसिक तणावावर सुंदर चित्रण झाले आहे. आजही आपली कोवळी पिढी शिक्षणाच्या दबावात बळी पडून आपले जीवन संपवितात. नव्या शिक्षण धोरणामुळे विद्यार्थ्यांना आनंददायी शिक्षण मिळणार, ही आशा फोल ठरली आहे. गेल्या सहा महिन्यात आपल्याच राज्यातील एका अग्रगण्य शिक्षण संस्थेतील तीन हुशार विद्यार्थ्यांनी तणाव सहन झाल्याने जीवन संपविले. जे शिक्षण विद्यार्थ्यांना तणाव सहन करण्याची शक्ती देऊ शकत नाहीत, त्या शिक्षणाचा फायदाच काय? अशा ‘क्रीमी’ शिक्षण संस्थेत शिक्षण घेणारे हुशार विद्यार्थीच जर आपले जीवन संपवायला लागले तर अशा शिक्षण संस्थेला टाळे ठोकलेलेच योग्य नव्हे काय? ∙∙∙
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.