डिचोली: खाण कंपनीचा प्रस्ताव मान्य नसल्याने पिळगाव येथील शेतकऱ्यांचे आंदोलन अजून निवळले नसून प्रलंबित मागण्यांसंदर्भात अजूनही ‘सुवर्णमध्य’ निघालेला नाही. परिणामी गेल्या सहा दिवसांपासून सारमानस येथे शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू असून खनिज वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे.
दुसऱ्या बाजुने खनिज वाहतूक करण्याचा प्रयत्न झाला. मात्र, शेतकऱ्यांनी विरोध केल्यामुळे खनिज मालाने भरलेले ट्रक जेटीपर्यंत नेणे शक्य झाले नाही. त्यामुळे ते रस्त्यावरच अडकून पडले. प्रलंबित नुकसान भरपाईसह अन्य प्रश्न सोडवा, अशी मागणी करीत सारमानस - पिळगावमधील शेतकरी गेल्या गुरुवारपासून अचानक रस्त्यावर उतरले आहेत.
सारमानस येथे सेसा कंपनीच्या फाटकाजवळ रस्ता अडवल्याने गेल्या सहा दिवसांपासून खनिज वाहतुकीत अडथळा निर्माण झाला आहे. त्यामुळे गुरुवारपासून खनिज वाहतूक ठप्प आहे.
कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी डिचोलीच्या पोलिस उपअधीक्षक श्रीदेवी बी. व्ही. आणि पोलिस निरीक्षक विजय राणे यांच्या निरीक्षणाखाली आंदोलनस्थळी पोलिस फौजफाटा तैनात करण्यात आला होता.
गेल्या शुक्रवारी आमदारांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत ठरल्याप्रमाणे याप्रश्नी शिष्टाई करून खनिज वाहतूक सुरू करण्यासाठी आज प्रशासकीय पातळीवरून प्रयत्न झाले. मात्र, चर्चा निष्फळ ठरली.
डिचोलीचे उपजिल्हाधिकारी शुभम नाईक यांनी आज (मंगळवारी) सारमानस येथे आंदोलनस्थळी जाऊन शेतकऱ्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. बैठकीत ठरल्याप्रमाणे नुकसान भरपाई मिळण्यासाठी शेतजमिनीची कागदपत्रे द्या. अशी सूचना उपजिल्हाधिकाऱ्यांनी केली. मात्र, शेतकरी आपल्या हट्टाशी ठाम राहिले. त्यामुळे सायंकाळी उशिरापर्यंत तोडगा निघू शकला नाही. यावेळी मामलेदार शैलेंद्र देसाई आणि कंपनीचे अधिकारी उपस्थित होते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.