बार्देश: आकय स्थानिकांची दीर्घकाळापासूनची मागणी पूर्ण करण्याच्या दिशेने एक मोठी चालना म्हणून काँग्रेसचे हळदोणेचे आमदार अॅड. कार्लुस फेरेरा यांनी केंद्र सरकारने पेडे - म्हापसा जंक्शनवर वाहनांसाठी भुयारी मार्ग बांधण्यासाठी निविदा काढली असल्याची माहिती दिली. त्यामुळे पेडे-म्हापसा जंक्शनवर उड्डाणपूल किंवा भुयारी मार्ग व्हावा यासाठी सतत प्रयत्नशील असणाऱ्या पेडे, कामरखान व आकयवासीयांचा हा विजय असल्याचे ते म्हणाले.
आमदार फेरेरा म्हणाले की, या प्रकल्पाचा खर्च ३३ कोटी रुपये आहे आणि निविदेत ५४० दिवसांच्या आत काम पूर्ण करण्याची अट आहे. या मागणीचा पाठपुरावा करण्यासाठी एकत्रित आघाडी उभारल्याबद्दल पेडे, कामरखाजन आणि आकय येथील स्थानिकांचे अभिनंदन केले. आकयच्या स्थानिकांनी आपल्याला आमदार होण्यापूर्वीच पेडे जंक्शनवर होणाऱ्या त्रासाची माहिती दिली होती.
दोन कार्यकाळ सत्ताधारी भाजपचे आमदार असूनही समस्या सोडवू न शकल्याबद्दल त्यांनी माजी आमदार ग्लेन टिकलो यांच्यावरही टीका केली. पेडे, कामरखाजन आणि आकय ही जरी वेगळी गावे असली तरी ती म्हापशाचा अविभाज्य भाग आहेत.
शाळा, महाविद्यालये आणि रुग्णालये दुसऱ्या बाजूला असल्याने त्यांच्यापुढे अनेक समस्या निर्माण झाल्या होत्या. तसेच, लोकांना दुसऱ्या बाजूने पेडे स्टेडियममध्ये जाण्यास खूप अडचण येत होती. आम्ही हार मानली नाही. लोकांच्या हितासाठी आम्ही पाठपुरावा केला आणि या भुयारी मार्गासाठीच्या कामाची निविदा मंजूर करून घेतली, असे फेरेरा यांनी सांगितले. दरम्यान, पेडे येथील रहिवासी जॉन लोबो यांनी हे काम पूर्ण करण्यासाठी केलेल्या प्रयत्नांबद्दल आमदार फरेरा यांचे आभार मानले.
पेडे जंक्शन बंद करण्यासाठी विधानसभेत प्रयत्न झाले. पेडे, कामरखाजन आणि आकय येथे राहणाऱ्या लोकांची गैरसोय झाली असती म्हणून मी हे अंमलात आणू नये यासाठी लढलो.
या भागातील लोकांना मोठे अंतर कापावे लागले असते. त्यांनी आम्हाला लोक भुयारी मार्गाच्या खाली असलेल्या बस्तोडातून जाऊ शकतात, असा पर्याय दिला होता, परंतु मी याला विरोध केला होता. कारण ते काम व्यवहार्य ठरले नसते. त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली असती. लोक मिलाग्रीस चर्चजवळून म्हापसा शहरात प्रवेश करताना गोंधळ उडाला असता आणि वाहतूक कोंडी झाली असती. आल्तिनो उतारावर रांगा लागल्या असत्या, ज्यामुळे विद्यार्थ्यांना आणि रुग्णांना तसेच बाजारात प्रवेश करू इच्छिणाऱ्यांना त्रास झाला असता, असे ते म्हणाले.
माझ्या आग्रहावरून, मुख्यमंत्र्यांनी बायपास बांधण्याची गरज केंद्राला सुचवली. आम्ही केंद्रीय रस्ते आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी गोव्याला भेट दिली, तेव्हा त्यांचीही भेट घेतली आणि नंतर त्यांनी जंक्शनवर उड्डाणपूल बांधण्यासाठी केंद्रीय अर्थसंकल्पात तरतूद केली, पण तेथे आता उड्डाणपुलाऐवजी भुयारी मार्गाला मंजुरी मिळाली असून निविदाही काढण्यात आली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री आणि केंद्रीय महामार्गमंत्री नितीन गडकरी यांचे आम्ही सर्वजण आभार मानतो, असे फेरेरा म्हणाले.
फेरेरा म्हणाले की, पेडे, कामरखाजन आणि आकय येथील स्थानिकांसह राज्य आणि केंद्र सरकारच्या अधिकाऱ्यांना उड्डाणपूल बांधण्याची गरज पटवून देण्यासाठी आम्ही सतत प्रयत्न केले. पेडे जंक्शनवर जवळच्या ठिकाणी काही किरकोळ अपघात झाले, पण ते सर्वांसाठी चिंतेचे एक प्रमुख कारण होते. जंक्शनच्या आधी आणि नंतर काही अपघात झाले आहेत, पण जंक्शनवर नाही. त्यामुळे, जंक्शन बंद करणे व्यवहार्य नव्हते आणि शिफारस केलेली नव्हती. मी मुख्यमंत्र्यांनाही ते बंद न करण्याची विनंती केली होती.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.