जम्मू: दहशतवाद्यांविरुद्ध सुरू केलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’मुळे बिथरलेल्या पाकिस्तानकडून गुरुवारी रात्री भारताविरुद्ध युद्धाची ठिणगी टाकण्यात आली. जम्मू, उधमपूर, जैसलमेर आणि पठाणकोटसह अनेक ठिकाणी ड्रोन व क्षेपणास्त्र हल्ल्याचा प्रयत्न केला. एस-४०० या यंत्रणेद्वारे हे सर्व हल्ले निष्प्रभ करण्यात आले. बुधवारी रात्रीही पाकिस्तानने १७ हून अधिक ठिकाणी हल्ल्याचा प्रयत्न भारताने हाणून पाडला होता. प्रत्युत्तरादाखल पाकिस्तानातील इस्लामाबाद, लाहोर, सियालकोट, बहावलपूर येथे थेट हल्ले केले. या कारवाईत पाकिस्तानची दोन लढाऊ विमाने पाडण्यात आली.
हमासने इस्राईलमध्ये केलेल्या हल्ल्याप्रमाणे हल्ले करण्याचा प्रयत्न पाकिस्तानने केल्याचे संरक्षण मंत्रालयातील अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. हे सर्व हल्ले निवासी भागात करण्याचा त्यांचा प्रयत्न होता.
पाकिस्तानने आज रात्री आठच्या सुमारास पहिल्यांदा जम्मू येथील विमानतळावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी डागलेले किमान आठ ड्रोन पाडण्यात आले. जम्मू विद्यापीठाच्या परिसरातही दोन ड्रोन पाडण्यात आले. उधमपूर, सांबा, आर.एस. पुरा, अखनूर या भागात पाकिस्तानकडून मोठ्या प्रमाणात गोळीबारही सुरू करण्यात आला.
तेथेही ड्रोन डागण्याचा प्रयत्न हाणून पाडण्यात आला. पंजाबमधील पठाणकोट, राजस्थानातील जैसलमेर येथेही ड्रोन हल्ले निष्प्रभ करण्यात आले.
या दोन्ही ठिकाणी प्रत्येकी ३० ते ४० ड्रोन पाडण्यात आल्याचे लष्कराने स्पष्ट केले. पाकिस्तानचे ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ले ‘इंटिग्रेटेड काउंटर यूएएस ग्रीड’ आणि रशियानिर्मित एस-४०० ‘सुदर्शन चक्र’ हवाई संरक्षण प्रणालींद्वारे निष्क्रिय करण्यात आले.
हल्ला करण्यासाठी पाकिस्तानने लढाऊ विमानांचाही वापर केला. त्यापैकी जेएफ-१७ आणि एफ -१६ अशी दोन विमाने भारताने पाडली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित दोवाल यांच्याबरोबर चर्चा
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची सरसेनाध्यक्ष आणि तिन्ही सैन्यदलांच्या प्रमुखांबरोबर रात्री चर्चा
दिल्ली, राजस्थान, पंजाब, हरियाना, जम्मू-काश्मीरमध्ये पोलिस आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या सुट्या रद्द, शाळा बंद
एस. जयशंकर यांची विविध देशांबरोबर चर्चा
धर्मशाला येथे ‘आयपीएल’चा सामना रद्द
भारतीय लष्कराने ‘ऑपरेशन सिंदूर’ राबविताना मंगळवारी (ता.६) मध्यरात्रीनंतर पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील नऊ दहशतवादी तळांवर लक्ष्यवेधी हल्ले करून ते नष्ट केले. यात जैशे महंमद, लष्करे तैयबा, हिज्बुल मुजाहिदीन दहशतवादी संघटनाच्या मुख्यालयांसह प्रशिक्षण केंद्रांचाही समावेश होता.
यानंतर बुधवारी (ता. ७) परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्री यांच्यासह लष्कराच्या महिला अधिकारी कर्नल सोफिया कुरेशी आणि हवाई दलाच्या प्रतिनिधी विंग कमांडर व्योमिका सिंह यांच्यासमवेत पत्रकार परिषद घेऊन भारताची कारवाई नियंत्रित स्वरूपाची आणि दहशतवाद्यांना निष्क्रिय करण्यासाठी होती, अशी भूमिका मांडली.
भारतीय परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी अमेरिकन सेक्रेटरी मार्को रुबीओ यांच्याशी संवाद साधला. यावेळी रुबीओ यांनी परिस्थिती चिघळू देऊ नका, असा आवाहन केले. भारत आणि पाकिस्तानमध्ये मध्यस्थी करण्याची तयारी अमेरिकेने दर्शवली आहे. अमेरिकेने दाखवलेल्या पाठिंब्यावर परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी ट्विट पोस्ट करत आभारही मानले आहेत.
ऑपरेशन सिंदूर’ ही भारताची दहशतवाद्यांविरुद्धची संयमित, नियंत्रित आणि तणाव टाळणारी कारवाई असून पाकिस्तानने यापुढे कोणतीही चिथावणीखोर कृती केल्यास ती संघर्ष वाढवणारी ठरेल, असा सज्जड दम भारताने पाकिस्तानला दिला आहे. ‘पहलगाममधील २२ एप्रिलचा दहशतवादी हल्ला हीच मुळात पहिली चिथावणी होती आणि भारतीय सैन्याने त्याचे उत्तर आपल्या कृतीतून दिले आहे,’ असे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्री यांनी स्पष्ट केले.
लाहोर सोडण्याची अमेरिकेची आपल्या नागरिकांना सूचना
भारताने बागलिहार, सलाल प्रकल्पांतील पाणी सोडले
पाकिस्तानमधील सर्व विमान उड्डाणे रद्द
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.