फोंडा: वाढता उकाडा त्यातच पाण्याची अतिरिक्त गरज, यामुळे राज्यात येत्या मेमध्येच पाणी टंचाई भासेल काय? अशी शंका वाटत असतानाच सार्वजनिक बांधकाम खात्याच्या पाणीपुरवठा आणि जलस्रोत खात्याने पाणी टंचाई होणार नाही.
यासाठी कटाक्ष ठेवताना येत्या मेमध्ये कोणत्याही प्रकारची पाणी टंचाई भासणार नाही, असे ठामपणे सांगितले आहे. विशेष म्हणजे ओपा जल प्रकल्पातून अकरा मतदारसंघांना मिळणारे पाणी यावेळेलाही व्यवस्थित मिळेल, यासाठी तरतूद करण्यात आली असून ओपाशी संबंधित सुमारे सोळा बंधाऱ्यांत पाणी तुडुंब भरून आहे.
राज्यात काही ठिकाणी कृत्रिम पाणी टंचाई असली तरी येत्या मेपर्यंत तरी ओपातून बिनधास्तपणे पाणी पुरवठा होऊ शकतो, एवढ्या पाण्याची तरतूद या प्रकल्पासह बंधाऱ्यात करण्यात आली आहे. विशेष म्हणजे मार्च महिना सरत आला तरी ओपा जल शुद्धीकरण प्रकल्पात पाण्याची पातळी कमी झालेली नाही. सध्या तरी पाच मीटरपेक्षा जास्त ‘लेव्हल'' ओपा जलशुद्धीकरण प्रकल्पात असल्यामुळे अजून एकाही बंधाऱ्याचे पाणी सोडण्यात आलेले नाही.
राज्यात काही ठिकाणी कृत्रिम तसेच मानवनिर्मित चुकांमुळे पाणी टंचाई भासत आहे. काही ठिकाणी निवासी वसाहती उंचावर आहेत, तर काही ठिकाणी पाण्याचे वॉल्व बंद करण्याचे प्रकार घडत आहेत. या तसेच इतर घटनांमुळे पाणी टंचाईचे सावट काही ठिकाणी आहे, पण नियोजन केल्यास योग्य आणि पुरेसा पाणी पुरवठा होऊ शकतो.
ओपा जल शुद्धीकरण प्रकल्प पुरेसा पाण्याचा पुरवठा करण्यास सज्ज असला तरी ग्राहकांनी मात्र पाण्याचा गैरवापर टाळायला हवा, असे आवाहन पाणी पुरवठा खात्यातर्फे करण्यात येत आहे. ऐन उन्हाळ्यात अनावश्यक पाण्याचा वापर तसेच पाण्याचा अपव्यय टाळणे हेच उत्तम असून पाणी हे जीवन आहे, या भावनेने उन्हाळ्यात पाण्याचा वापर करा, असाही संदेश देण्यात आला आहे.
कोमुनिदादच्या जमिनी हडप करून ही घरे बांधली जात आहेत, त्यामुळे पाणी कुठून कसे येईल, याचे ताळतंत्र कुठेच नसते. हल्लीच्या काळात कोमुनिदादच्या जमिनी बळकावून घरे बांधलेल्यांवर संक्रांत आली आहे.
ओपा जलशुद्धीकरण प्रकल्पाला आपत्कालीन वेळेला पाणीपुरवठा करणाऱ्या बंधाऱ्यांमध्ये मुबलक पाणी आहे. ओपा जल प्रकल्पातील पाण्याची पातळी कमी झाली, की या बंधाऱ्यांतील पाणी सोडले जाते. पण यावेळेला एकाही बंधाऱ्याचे पाणी सोडलेले नाही. मागच्या काळात मार्चमध्येच या बंधाऱ्याचे पाणी सोडण्याची पाळी संबंधित खात्यावर आली होती, पण यंदा तसा प्रकार नाही. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी खास पाणी पुरवठा खाते कार्यरत करण्यावर भर दिला असल्याने पाण्याच्या बाबतीत कोणतीच समस्या उद्भवणार नाही, याकडे सरकारचा कटाक्ष राहील, अशी माहिती या खात्याच्या एका अधिकाऱ्याने दिली.
राज्यातील सर्वांत पहिल्या आणि अर्ध्या गोव्याला पाणी पुरवठा करणाऱ्या ओपा जल प्रकल्पात एकूण ५ जलशुद्धीकरण प्रकल्प असून रोज किमान १५० एमएलडी पाण्याचा पुरवठा केला जातो. याशिवाय साळावली तसेच गांजे प्रकल्पांवरही भिस्त ठेवण्यात येत असून पंचवाडीच्या प्रकल्पातून दहा एमएलडी पाण्याचा पुरवठा केला जातो. सद्यःस्थितीत पणजीतील स्मार्ट सिटीसाठी अतिरिक्त पाण्याचा पुरवठा करण्यासाठी तरतूद करण्यात आली असून ओपा जलाशयातील यासंबंधीचे काम पूर्ण करण्यात आले आहे, मात्र स्मार्ट सिटीतील टाक्यांचे काम पुरे झाले नसल्याने हे पाणी अजून सोडलेले नाही.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.