
डिचोली: आमठाणे धरणाच्या मुख्य गेटची दुरुस्ती करेपर्यंत या धरणात साळ बंधाऱ्यातील पाणी सोडण्यात येणार नाही, अशी माहिती जलस्रोत खात्याच्या एका अधिकाऱ्याने दिली. मात्र तोपर्यंत या धरणातील जलसाठा आणखी कमी होण्याची शक्यता असली तरी जनतेने काळजी करण्याची गरज नाही, असेही त्याने म्हटले आहे.
उत्तर गोव्याची तहान भागविणाऱ्या आमठाणे धरणातील जलसाठा कमी झाला की दरवर्षी या धरणात साळ बंधाऱ्यातील पाणी सोडून जलसाठा नियंत्रित ठेवण्यात येतो. सध्या या धरणातील जलसाठ्यात जवळपास ९ मीटरनी घट झाली आहे. सभोवतालचे पात्र कोरडे पडले आहे. मात्र अद्याप साळ बंधाऱ्यातील पाणी धरणात सोडण्यात आलेले नाही. त्यामुळे जनतेमधून वेगवेगळे प्रश्न उपस्थित होत आहेत.
गेल्या जानेवारी महिन्यात दोडामार्ग तालुक्यातील कुडासे येथे तिळारीच्या कालव्याला भगदाड पडल्यानंतर ‘तिळारी’तून गोव्याला पाणीपुरवठा बंद झाला होता. त्यामुळे उत्तर गोव्यातील बहुतांश भागात पाण्याची टंचाई निर्माण झाली होती.
साहजिकच आमठाणे धरणावरील ताण वाढला होता. आपत्कालीन उपाययोजना म्हणून आमठाणे धरणाची मुख्य गेट उघडताना संबंधित खात्याला कसरत करावी लागली होती. नौदलाचीही मदत घ्यावी लागली होती.
असा प्रसंग पुन्हा उद्भवू नये यासाठी धरणाच्या गेटची दुरुस्ती करण्याचा जलस्रोत खात्याचा प्रस्ताव आहे.
गेटची दुरुस्ती करण्यासाठी गेटजवळील भाग कोरडा असणे आवश्यक आहे. त्यामुळेच गेटची दुरुस्ती होईपर्यंत धरणाचे पात्र कोरडे ठेवावे लागणार आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.