Reservation Dainik Gomantak
गोवा

Reservation: एक देश, एक आरक्षण? 'खरी कुजबूज'

गोमन्तक डिजिटल टीम

‘एक देश एक विधान एक निशान’, ‘एक देश एक संविधान एक कानून’, ‘एक देश एक पोलिस एक वर्दी’, या मोदी सरकारच्या घोषणांनंतर ‘एक देश एक आरक्षण’ ही घोषणा प्रत्यक्षात उतरणार का, यावर चर्चा सुरू झाली आहे.

केंद्र सरकारने आर्थिकदृष्‍ट्या मागासलेल्यांसाठी लागू केलेले दहा टक्के आरक्षण योग्य असल्याचा निर्वाळा सर्वोच्च न्यायालयाच्या पाच न्यायाधीशांच्या खंडपीठाने दिला आहे. या निवाड्यात सध्‍या सुरू असलेल्‍या जातिनिहाय आरक्षणावर पुनर्विचार करावा अशी टिपणीही न्यायालयाने केली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे देशात ‘वन नेशन वन रिझर्व्हेशन’ पद्धत सुरू होण्याचे संकेत मिळत असल्याची चर्चा आहे.

आता सरकारी देवदर्शन

आपल्या देशात तीर्थयात्रांना मोठे महत्व आहे. हिंदू असो, ख्रिस्ती असो वा मुस्लिम, प्रत्येक धर्मात तीर्थयात्रा असतेच. जीवनात निदान एकदा तरी तीर्थयात्रा करावी, अन्यथा आपल्‍याला मोक्षप्राप्ती होणार नाही अशी लोकांची भावना असते.

मात्र सगळ्यांनाच तीर्थयात्रा करणे आर्थिक कारणांमुळे शक्य होत नाही. अशा लोकांना आता सरकार मदत करणार आहे. राज्य सरकारने ‘मुख्यमंत्री देवदर्शन’ योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत आता गरीब श्रद्धाळूंना तीर्थयात्रा करण्याची संधी मिळणार आहे. म्हणून आत जनता म्हणायला लागली आहे, ‘भिवपाची गरज ना’.

सुभाषभाऊंची काय हो चूक?

शिरोडा मतदारसंघातील बेतोडा येथे एका पाण्याच्या चेंबरचे उद्घाटन झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी या उघड्या चेंबरमध्ये पडून एका मजुराचा मृत्‍यू झाला. हा मजूर अल्कोहोलिक होता, हे मान्य. तरीपण चेंबर उघडा ठेवलाच कसा, असा सवाल केला जात आहे. या पाण्याच्या व्यवस्थेचे अर्थातच चेंबरमधील व्हॉल्वचे उद्घाटन जलस्रोतमंत्री सुभाष शिरोडकर यांनी केले खरे, पण दुसऱ्याच दिवशी वाईट घडले.

आता हे वाईट घडले आणि एकजण मरण पावला त्याला जबाबदार संबंधित पाणीपुरवठा खात्याचे अधिकारी आणि कंत्राटदारच ना? हा चेंबर उघडा सोडलाच कसा? असा सवाल करून सुभाषभाऊंची हो कसली आली त्यात चूक, असे बेतोड्यातील लोक बोलत आहेत.

श्‍वानांची अनोखी सलामी!

पोलिस मुख्यालयात दरदिवशी पोलिस ध्वज सकाळी चढवून संध्याकाळी तो उतरविला जातो. हा ध्वज चढवताना व उतरवताना पोलिस शस्त्रास्त्र सलामी दिली जाते. तसेच बिगुल वाजविले जाते. हे नेहमीचे या मुख्यालयात घडत असते. संध्याकाळी ध्वज उतरवताना पोलिसांनी सलामी दिल्यानंतर बिगुल वाजविण्यास सुरवात झाल्‍यावर या मुख्यालयाच्या अवतीभवती असलेले श्‍वान जेथे असतील तेथून धावत पळत येऊन तेथे जमा होतात.

तसेच एकाच ठिकाणी उभे राहून भुंकण्यास सुरवात करतात. जोपर्यंत हे बिगुल वाजणे बंद होत नाही, तोपर्यंत श्‍वान भुंकणे काही थांबवत नाहीत. प्रामाणिक प्राणी म्हणून ज्याचा उल्लेख होतो, त्या श्‍वानांनाही या बिगुलचा अर्थ कळतो की काय, असा प्रश्‍‍न त्‍यांना पाहिल्‍यावर पडतो. ‘मिले सूर मेरा तुम्‍हारा’ या पंक्तीनुसार ते आपल्या परीने या बिगुलच्या आवाजाला दाद देतात. हे चित्र दरदिवशी पोलिस मुख्यालयात नेहमी पाहायला मिळते.

हम करेसो कायदा

गोवा विद्यापीठात सध्या ‘हम करेसो कायदा’ असाच प्रकार सुरू आहे. आपल्या माणसांना व्हीआयपी वागणूक देण्यात येतेय. विद्यापीठातील अनेक विभागांमध्ये दहा ते पंधरा वर्षे ठाण मांडून बसलेल्‍यांची बदली इतर विभागांत करण्यात आली आहे. यासंदर्भात बदलीचे आदेशही जारी करण्यात आले आहेत.

परंतु ते कागदावरच ठेवून जाणूनबुजून याची अंमलबाजणी केली जात नसल्याने विद्यापीठातील अनागोंदी कारभार उघड झाला आहे. बदली झालेल्यांचे ‘गॉडफादर’ आणि ‘गॉडमदर’ही असल्याने त्यांच्या बदल्या केवळ कागदावरच दाखवण्यासाठी केल्या जात असल्याची विद्यापीठात चर्चा सुरू आहे. आता बोला!

‘मेगा जॉब फेअर’ धमाका

राज्यात मोठ्या प्रमाणात बेरोजगारीचा प्रश्‍न भेडसावत आहे. सरकारचे या प्रश्‍नाकडे लक्ष आहे हे दाखविण्यासाठी पुढील दोन दिवस ‘मेगा जॉब फेअर’ आयोजित केला आहे. या मेळाव्यात सुमारे १५५ कंपन्या सहभागी होऊन ५५०० जागांसाठी उमेदवारांची निवड करणार आहेत असे सांगण्यात येत आहे.

सरकारी नोकरी न मिळालेल्यांची या मेळाव्याला मोठी गर्दी होणार आहे. मात्र त्यातील किती जणांना नोकऱ्या मिळणार हा प्रश्‍‍नच आहे. अर्जदारांची संख्या पाहता राज्यातील बेकारीची कल्‍पना येते. बेरोजगारीच्या प्रश्‍नावरून विरोधकांनी आवाज उठवू नये यासाठी ही सरकारची धडपड आहे. गोमंतकीय तरुणांचा कल सरकारी नोकऱ्यांकडे आहे.

त्यामुळे सरकारी नोकरी मिळेपर्यंत बेरोजगार राहण्यापेक्षा या मेळाव्यात नशीब अजमावण्यास काय हरकत आहे, असे त्‍यांचे म्‍हणणे आहे. या बेरोजगार युवकांची विचारसरणी बदलण्यासाठी सरकारचे प्रयत्न अजूनही तोकडेच पडत आहेत.

बाबूशना टेन्शन!

मजूरमंत्री बाबूश मोन्सेरात यांनी ‘जॉब फेअर’ हा रोजगार मेळावा घेत युवा वर्गामध्ये आशा निर्माण केल्या आहेत. या मेळाव्याला १५ हजारांपेक्षा अधिक उमेदवारांनी नोंदणी केल्याने या एकदिवसीय मेळाव्याचा कालावधी दोन दिवसांचा करण्यात आला आहे.

मेळावा यशस्वी करण्‍यासाठी बाबूश यांच्यासह त्या खात्याचे संचालक राजू गावस व त्‍यांचे सहकारी परिश्रम घेत आहेत. अशा प्रकारचा मेळावा घेण्याची कदाचित बाबूश यांची ही पहिलीच वेळ असल्याने त्यांना या मेळाव्याविषयी बरीच उत्सुकता आहे. मेळाव्यासाठी शंभरावर कंपन्यांनी नोंदणी केलेली आहे.

त्यामुळे या कंपन्यांनी अधिकाधिक युवकांना नोकऱ्या द्याव्यात अशी सरकारची इच्छा असणार आहे. महत्त्वाची बाब म्हणजे ज्या प्रकारच्या नोकऱ्या आहेत, त्या गटातील उमेदवार मिळाल्यास हा मेळावा यशस्वी होऊ शकतो. काही झाले तरी हा रोजगार मेळावा यशस्वी होईपर्यंत बाबूशचे टेन्शन मात्र वाढणार आहे, हे नक्की.

प्रार्थनेचे शपथेत रूपांतर?

विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजप सोडून काँग्रेसमध्ये गेलेल्या मायकल लोबो यांनी एका कार्यक्रमात काँग्रेस नेत्यांनी घेतलेल्या शपथांविषयी खुलासा केला आहे. एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत लोबो यांनी आपणास निवडणुकीपूर्वी पणजीतील महालक्ष्मी मंदिरात प्रार्थना करण्‍यासाठी येण्यास सांगितले होते.

सर्वांना निमंत्रण होते. परंतु त्यानंतर सर्वांना त्याठिकाणी पक्ष न सोडण्याची शपथ देण्यात आली. आता लोबो यांच्या खुलाशावर भलेही इतर उमेदवार विश्‍वास ठेवतील, पण त्यावेळी उपस्थित कार्यकर्ते कसे विश्‍वास ठेवतील? काँग्रेसच्या उमेदवारीवर आमदार होऊन ते भाजपमध्ये आले. त्यांच्यासह इतर सातजणही भाजपवासी झाले.

त्यामुळे या फुटीर गटाला पक्षांतरानंतर देवतांच्या शपथांची आठवण करून दिली जाते. कारण तेव्हा काँग्रेस नेत्यांनी सर्वधर्मीय देवतांच्‍या शपथा घेतल्या होत्या, याची जाणीव सुज्ञ मतदारांना नक्कीच आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Subhash Velingkar: सुभाष वेलिंगकरांची अटक अटळ? कोर्टाचा दिलासा नाही, जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

BKC ते आरे JVLR पंतप्रधान मोदींचा मेट्रोने प्रवास; शाळकरी विद्यार्थी, महिलांशी साधला संवाद पाहा Video

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

गिरीत बंदिस्त खोलीत आढळला मृतदेह , संशयास्पद मृत्यूचा कुटुंबियांचा अंदाज; गोव्यातील ठळक बातम्या

SCROLL FOR NEXT