Kalasa-Banduri Nala project
पणजी: म्हादई नदीचे पाणी वळवण्याला गोवा सरकारकडून विरोध होत असताना आता उत्तर कर्नाटकातील शेतकरी देखील याच्या विरोधात उभे राहिले आहेत. पाणी वळविल्यामुळे फटका बसणाऱ्या शेतकऱ्यांनी या लढाईत गोव्यातील सामाजिक कार्यकर्त्यांना पाठिंबा दिला आहे. कर्नाटकचा महत्वकांक्षी प्रकल्प कळसा - भांडुरा रद्द करण्याची मागणी या शेतकऱ्यांनी केली आहे.
गोव्याची जीवनदायिनी म्हणून ओळखली जाणाऱ्या म्हादई नदीचे पाणी वळविण्यासाठी कर्नाटक सरकार प्रयत्न करत आहे. या नदीचे पाणी वळवून ते मलप्रभा नदीत सोडले जाणार आहे. मलप्रभा ही कृष्णा नदीची उपनदी आहे. खानापूर आणि शेजारील गावातील शेतकऱ्यांनी म्हादईचे पाणी वळवल्यामुळे त्यांच्या हक्काचे पाणी देखील त्यांना मिळणार नाही अशी भीती व्यक्त केली आहे.
पाणी वळवून दुसऱ्या भागात नेले जाईल पण येथील लोकांना पाणी मिळणार नाही. तसेच, पश्चिम घाटाचे नुकसान देखील यामुळे होणार असून, याचा पावसावर परिणाम होईल, असे नितीन धोंड यांनी हिंदुस्थान टाईम्स दिलेल्या प्रतिक्रियेत व्यक्त केले आहे.
असोगा, नेरसा, मंत्रुगा, रुमेवाडी, करमबल या गावांना जमीन अधीग्रहण करण्याबाबत सरकारी नोटीस मिळाली आहे. याप्रकरणी विविध मागण्याचे निवेदन येथील ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांनी संबधित अधिकाऱ्यांना सादर केले .
याप्रकरणी बुधवारी (०९ एप्रिल) खानापूर येथे बैठक पार पडली. या बैठकीत प्रकल्पाच्या विरोधात ठराव संमत करण्यात आला. सरकार हा प्रकल्प रेटण्याचा प्रयत्न करत असून, ते यो्ग्य नाही तसेच सुरु असलेले काम आवश्यक परवानगी न घेता सुरु असल्याचे शेतकऱ्यांनी म्हटले आहे.
या प्रकल्पामुळे जंगलाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होणार आहे. तसेच, जैवविविधताभागाला देखील याचा फटका बसणार आहे. याचा वातावरणाला देखील फटका बसणार आहे. म्हादई आणि मलप्रभा नदी पात्रात पडणाऱ्या पावसावर देखील याचा परिणाम होण्याची शक्यता धोंड यांनी बोलून दाखवली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.