गंगाराम आवणे
स्वप्न पाहणं सोपं असतं; पण त्या स्वप्नाला वास्तवात उतरवण्यासाठी लागते ती जिद्द, चिकाटी आणि सातत्य. अशीच जिद्द मनात बाळगून मयेतील गावकरवाडा येथील म्हामल कुटुंबीयांनी अळंबी उत्पादनाचा मार्ग स्वीकारला आणि आज त्या माध्यमातून स्वयंपूर्णतेकडे आत्मविश्वासाने पावले टाकली आहेत.
निसर्गाशी मैत्री करत, छोट्या जागेतून सुरू झालेली ही वाटचाल आज प्रेरणादायी ठरत आहे. पारंपरिक शेतीपलीकडे जाऊन काहीतरी वेगळं करण्याचा ध्यास घेतलेल्या या कुटुंबाने अळंबी उत्पादनात नवा मार्ग शोधला आहे.
२०२४ साली राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांच्या पुढाकारातून काही निवडक शेतकऱ्यांना बिहारमधील डॉ. राजेंद्र प्रसाद केंद्र कृषी विद्यापीठ, मुसा येथे अळंबी उत्पादनाचे प्रशिक्षण घेण्याची संधी मिळाली. या प्रशिक्षणात त्रिवेणी सतीश म्हामल आणि सतीश विनायक म्हामल यांनी सहभाग घेतला. तेथे बटन, ऑयस्टर, मिल्की, शिताके अशा विविध प्रकारच्या अळंबी उत्पादनाच्या आधुनिक पद्धती शिकण्याची संधी मिळाली.
प्रशिक्षणातून मिळालेले ज्ञान आणि स्वतःची मेहनत यांच्या बळावर त्यांनी घराच्या परिसरात छोट्या प्रमाणात अळंबी उत्पादन सुरू केले. सुरुवातीला वातावरण, तापमान आणि व्यवस्थापन यांसारख्या अडचणींचा सामना करावा लागला;
मात्र चिकाटीने त्या पार केल्या. पहिल्याच प्रयत्नात मिळालेल्या चांगल्या उत्पादनाने त्यांच्या आत्मविश्वासाला नवी उभारी दिली. आज म्हामल कुटुंबीय प्रामुख्याने ऑयस्टर मशरूमचे उत्पादन घेत आहेत.
पोषक, आरोग्यदायी आणि सहज पचणारी ही अळंबी आज बाजारात मोठ्या प्रमाणात मागणी असलेली ठरली आहे. मात्र, सुरुवातीच्या काळात अळंबीबाबत जागरूकतेचा अभाव हा मोठा अडथळा होता.
लोकांना तिची ओळख करून देण्यासाठी त्यांनी काही काळ अळंबी मोफत वाटली. हळूहळू तिचे फायदे समजावून सांगत त्यांनी लोकांचा विश्वास जिंकला. आज त्यांच्या उत्पादनाला मिळणारा प्रतिसाद हा त्यांच्या कष्टांचा खरा सन्मान ठरत आहे.
अळंबी उत्पादन हा केवळ व्यवसाय नसून, आत्मनिर्भरतेकडे नेणारा एक मार्ग आहे, हे म्हामल कुटुंबीयांच्या अनुभवातून स्पष्ट होते. कमी जागेत, कमी खर्चात आणि कमी कालावधीत चांगले उत्पादन देणारा हा व्यवसाय आजच्या तरुणांसाठी नवी दिशा दाखवणारा ठरू शकतो.
ऑयस्टर मशरूममध्ये प्रथिने, जीवनसत्त्वे आणि खनिजे मुबलक प्रमाणात असतात. वजन नियंत्रण, रोगप्रतिकारक शक्ती वाढवणे आणि शरीराला आवश्यक पोषण देणे यासाठी ती उपयुक्त ठरते. त्यामुळे आरोग्याबाबत जागरूक असलेल्या नागरिकांमध्ये तिची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे.
“स्वतःचा छोटेखानी व्यवसाय उभारून स्वतःच्या पायावर उभे राहण्याचा आनंद वेगळाच असतो. माझ्या या प्रवासात कुटुंबीयांचे मोठे सहकार्य लाभले. अळंबी उत्पादनातून स्वयंपूर्णतेकडे वाटचाल करत असल्याचे समाधान आहे.”त्रिवेणी म्हामल, गावकरवाडा, मये