बार्देश, म्हापसा शहरात जागोजागी कचऱ्याचे ढीग असून भटकी जनावरे, कुत्र्यांचाही मोठ्या प्रमाणात उपद्रव वाढला आहे.
या कचऱ्याच्या ठिकाणी भटकी गुरे व कुत्री अन्न शोधण्यासाठी जातात. शिवाय हा कचरा आजूबाजूला पसरवीत आहे. काही वेळेला या गुरे, कुत्री आपापसात भांडतात, त्यामुळे तेथील कचराच इतरत्र पसरत आहे. शिवाय या दुर्गंधीयुक्त कचऱ्यामुळे सर्वसामान्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे, असे मत म्हापसावासीय व्यक्त करीत आहेत.
म्हापसा नगरपालिका क्षेत्रातील सर्वं २० ही प्रभागात जागोजागी कचऱ्याचे ढीग असून सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे. त्या ढिगामध्ये लहान मोठ्या पिशवीतील शिळे खाद्यपदार्थ काही घरवाले, तसेच हॉटेलवाले रस्त्याच्या बाजूला फेकत आहेत. या प्रकाराकडे नगरपालिकेचेही दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळेच कचरा फेकण्याचे प्रकार वाढल्याने कचऱ्यांचे ढीग निर्माण होत आहेत. शहराला कचऱ्यांचा वेढा पडलेला आहे, अशी स्थिती म्हापशात फिरताना दिसते.
सध्या पावसाचे दिवस असून या कचऱ्यात पाणीही साचत आहे. ओला कचरा व कुजलेले अन्न पदार्थ यामुळे डासांची पैदासही अधिक होण्याचा धोका आहे. म्हापसा पालिकेचे कर्मचारी दिवसातून एकदा त्या त्या प्रभागातील कचरा उचलतात. तो कचरा उचलून नेल्यानंतर काही घरमालक व हॉटेलवाले पुन्हा कचरा टाकतात. तो कचरा पालिकेचे कामगार उचलत नाहीत, असे काही लोक म्हणतात.
माजी नगराध्यक्ष प्रिया मिशाळ म्हणाल्या, नगराध्यक्ष असताना दुकानदारांना अनेक वेळा ताकीद देऊनसुद्धा दुकानदार न जुमानता कचरा टाकतात. बाजारपेठेतील दुकानदार जास्त प्रमाणात कचरा टाकतात. सीसीटीव्ही यंत्रणेसाठी सुमारे ३ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे, पण ही यंत्रणा म्हापसा शहरासाठी गरजेची आहे. परंतु इतकी रक्कम पालिकेकडे नाही.
शहरातील कचरा समस्या त्वरित निकाल काढली नाही, तर यंदाच्या पावसाळ्यात म्हापशात रोगराई वाढण्याची शक्यता आहे, अशी भिती ही नागरिकांतर्फे व्यक्त होत आहे.
कठोर कारवाई करा
शहरातील कोणत्याही रस्त्यावर, रस्त्यांच्या बाजूला कचरा टाकणाऱ्यावर कठोर कारवाई करण्याची गरज आहे. आवश्यक ठिकाणी सीसीटीव्ही यंत्रणा बसवून कचरा फेकूवर लक्ष ठेवण्याची गरज आहे. शिवाय शहरातील काही ठिकाणच्या सीसीटीव्ही कचरा फेकणारे सापडल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई करणे शक्य आहे. फक्त पालिकेने कारवाई करायला हवी, असे म्हापशातील ज्येष्ठ नागरिकांचे मत आहे.
कचराफेक बंद करा
नगराध्यक्ष डॉ. नूतन बिचोलकर म्हणाल्या, आमच्याकडे जे कचरा उचल करणारे कामगार आहेत. ते योग्य प्रकारे काम करतात. परंतु अनेकवेळा दुकानदार व हॉटेल मालकांना कचरा अस्ताव्यस्त टाकतात. त्यांनी हे प्रकार बंद करायला हवे. स्वच्छ शहरासाठी सर्वांनीच प्रयत्न करणे गरजेचे आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.