मडगाव : रेल्वेतून गोव्यात अल्पवयीन मुले पळून येण्याच्या घटना वाढत असून, हा एक सामाजिक प्रश्न बनू लागला आहे. मागच्या वर्षी कोकण रेल्वे पोलिसांनी परराज्यातून गोव्यात रेल्वेतून पळून आलेल्या एकूण २४ अल्पवयीनांना सुखरूपपणे शोधून काढून नंतर त्यांना मेरशी येथील अपना घरात पाठवून दिले. यामध्ये मुलींचाही समावेश आहे.
या मुलांमध्ये शेजारील कर्नाटक, महाराष्ट्र व केरळ राज्यातील मुलांचा जास्त समावेश आहे. अनेकदा ही मुले आपल्या घरातून पळून गेल्यानंतर त्यासंबंधी तेथील पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविली जात नाही. अशिक्षित, गरिबी हे त्यामागील कारणे आहेत.
गोव्यात ही मुले सापडल्यानंतर, त्यांना विश्वासात घेऊन पोलिस जेव्हा त्यांची चौकशी करतात तेव्हा त्यांना ही मुले कुठली आहेत यासंबंधी माहिती मिळते, त्यानंतर तेथील पोलिसांशी संपर्क साधून मग या मुलांना त्यांच्या पालकांच्या स्वाधीन केले जाते.
कोकण रेल्वे पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सुनील गुडलर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, आमचे पोलिस नेहमी सतर्क असतात, रेल्वे स्थानकात पोलिस गस्त असते, अल्पवयीन मुले आढळली तर आम्ही त्यांची विचारपूस करतात. त्यावेळी काहीजण घरातून पळून आल्याचे उघड होते.
बाल कल्याण समितीच्या सदस्याची मदत घेऊन पुढील कायदेशीर सोपस्कार पार पाडले जातात. हल्लीच कोकण रेल्वे पोलिसांनी केरळ राज्यातील त्रिसूर येथील तीन व पाताम्बी येथील एका अल्पवयीनाला शोधून काढून मग तेथील पोलिसांच्या स्वाधीन केले होते.
मडगावचे सेवाभावी डॉक्टर व्यंकटेश हेगडे यांनी ही एक सामाजिक समस्या बनत असल्याचे म्हटले. गरिबी व अन्य कारणांमुळे ही मुले गोव्यात पळून येतात. गोवा हे सधन राज्य असल्यामुळे येथे रोजगार मिळेल म्हणूनही अनेकजण गोव्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.