म्हापसा/पणजी: काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे यांच्या गोवा दौऱ्यावरून भाजप आणि काँग्रेसमध्ये राजकीय संघर्ष भलताच पेटला आहे. यामुळे दोन्ही पक्षात आरोप-प्रत्यारोपांना सुरवात झाली आहे.
‘वंदे मातरम्’ या राष्ट्रीय गीताचा अपमान केल्याच्या निषेधार्थ भारतीय जनता युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी दाबोळी विमानतळाबाहेर खर्गे यांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवत आंदोलन केले. दुसरीकडे, या आंदोलनादरम्यान सुरक्षा व्यवस्थेचा भंग झाल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे.
‘भाजयुमो’चे प्रदेशाध्यक्ष तुषार केळकर यांनी म्हापसा येथे पत्रकार परिषदेत बोलताना खर्गे यांनी ‘वंदे मातरम्’चा अपमान केल्याचा आरोप केला. राष्ट्रीय गीतासंदर्भातील कायद्यानुसार त्याचा अपमान करणे हा गुन्हा असल्याचे सांगत, असा अपमान कदापि सहन केला जाणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.
दाबोळी विमानतळाबाहेर ‘भाजयुमो’ने शांततामय आणि घटनात्मक मार्गाने आंदोलन केले होते, असा दावा त्यांनी केला. आंदोलनादरम्यान काँग्रेसच्या युवा कार्यकर्त्यांनी भाजप कार्यकर्त्यांच्या दिशेने वस्तू फेकल्याचा आरोपही त्यांनी केला. भविष्यात सोनिया गांधी किंवा राहुल गांधी गोव्यात आले तरी अशाच प्रकारे काळे झेंडे दाखविण्याचा इशारा केळकर यांनी दिला.
युवा काँग्रेस अध्यक्ष अर्चित नाईक यांनीही आंदोलनाचा निषेध केला. राजकीय मतभेद असले तरी कोणाच्याही सुरक्षिततेला धोका निर्माण करणाऱ्या कृतीचे समर्थन करता येणार नाही, असे सांगत संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून सुरक्षा नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली.
‘वंदे मातरम्’वरील आरोप आणि खर्गेंच्या सुरक्षा व्यवस्थेचा मुद्दा यामुळे गोव्यात भाजप-काँग्रेसमधील राजकीय वातावरण तापले असून, पोलिसांच्या पुढील भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
‘एफआयआर’ न नोंदविल्याने नाराजी
प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते अमित पालेकर यांनी ‘भाजयुमो’वर पलटवार केला. खर्गे यांच्या ताफ्याच्या मार्गात आंदोलकांनी बॅरिकेड्स ओलांडून प्रवेश केला आणि ध्वनिक्षेपकांचा वापर केला, त्यामुळे संरक्षित व्यक्तीच्या सुरक्षेला धोका निर्माण होऊ शकला, असा आरोप त्यांनी केला. याप्रकरणी काँग्रेसने पोलिसांकडे तक्रार दिली असून, आंदोलकांवर अद्याप ‘एफआयआर’ नोंदविला नसल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली. पोलिसांनी ‘एफआयआर’ नोंदविला नाही तर न्यायालयात जाण्याचा इशारा पालेकर यांनी दिला.
दबावाखाली दोन कडवी!
सहा कडव्यांचे असलेले वंदे मातरम् हे गीत १९२८ मध्ये मुस्लिम लीगच्या दबावाखाली येऊन काँग्रेसने केवळ राजकारणासाठी दोन कडव्यांचे केले. परंतु, या गीताची सहाही कडवी म्हणावी असा कायदा झालेला असल्याने काँग्रेसला त्याचे उल्लंघन करता येणार नाही. यापुढे वंदे मातरम म्हणायचे असेल तर ते सहा कडव्यांचे म्हणा. दोन कडव्यांचे नको, असा सल्ला तुषार केळकर यांनी दिला.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.