

मडगाव: काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी गोव्यातील जनतेला भाजपला हरविण्यासाठी ‘एकवट’ करण्याचे आवाहन केले असले तरी प्रत्यक्षात गोव्यात जे काँग्रेस नेते आहेत त्यांच्यामध्येच आधी ‘एकवट’ व्हायला पाहिजे. २०१९ त्यानंतर २०२२ असे दोनवेळा पक्षातून फुटून जाऊन काँग्रेस आमदारांनी घाऊक पक्षांतरे केली आहेत. २०२७ मध्ये काँग्रेस या पक्षांतरांची हॅट्ट्रीक करणार, अशी भीती लोकांमध्ये आहे, असे मत गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी व्यक्त केले.
गोवा फॉरवर्ड हा पक्ष काँग्रेसचा युतीचा भागीदार असला तरी युतीच्या प्रश्नावरून या दोन्ही पक्षांत सध्या तणावाचे वातावरण आहे. गोवा फॉरवर्डने काँग्रेसबरोबर सुरू असलेली युतीची बोलणी स्थगित ठेवली असून काँग्रेसकडूनही त्या बाबतीत कसलाही पुढाकार घेतलेला नाही. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनीही आपल्या गोवा भेटीत युतीबद्दल स्पष्ट उल्लेख केला नाही. असे जरी असले तरी काँग्रेसच्या नेत्यांनी आधी एकत्र यावे आणि कार्यकर्त्यांसमोर एक उदाहरण घालून द्यावे, असे आवाहन कालच्या वेर्णा येथील सभेत केले होते.
या पार्श्वभूमीवर बोलताना सरदेसाई म्हणाले, काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी आपल्या पक्षाला दिलेला सल्ला म्हणजे ‘घरचा अहेर’ आहे.
पूर्वीच्या भूमिकेवर ठाम!
गोव्यातील जनतेचा काँग्रेसवरील विश्वास कमी झाला आहे. राज्यातील कानाकोपऱ्यात सध्या काँग्रेसच्या ‘पक्षांतराच्या हॅट्ट्रीक’चीच चर्चा सुरू आहे. २०१९ मध्ये काँग्रेसचे दहा आमदार फुटले, तर २०२२ मध्ये आठ आमदारांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली. त्यामुळे आगामी काळातही काँग्रेसमध्ये फूट पडण्याची भीती जनतेच्या मनात आहे. ही भीती दूर करण्याची गरज आहे. मात्र, सध्याच्या परिस्थितीत गोवा फॉरवर्ड आपल्या पूर्वीच्या भूमिकेवर ठाम असल्याचे सरदेसाई यांनी स्पष्ट केले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.