तिसवाडी: इतर मागासवर्गीय (ओबीसी) गटातील सर्वांत मोठ्या भंडारी समाजाची जातीनिहाय जनगणना होणे आवश्यक आहे. २०१४ मध्ये ओबीसी समाजाची जनगणना झाली होती. परंतु तेव्हा जनगणनेत चूक झाली होती. त्यामुळे यंदा गफलत होणार नाही, यासाठी स्वतंत्र जातीनिहाय जनगणना करणार आहोत, अशी माहिती भंडारी समाजाच्या नवीन संघटनेचे संचालक किरण कांदोळकर यांनी दिली.
खोर्ली येथील कार्यक्रमात कांदोळकर बोलत होते. ते म्हणाले, की केंद्र सरकारने देशव्यापी जातीनिहाय जनगणना करण्याचा निर्णय घेतला, त्याचे आम्ही स्वागत करतो.
२०१४ मध्ये ओबीसी समाजाची जनगणना करण्याची मागणी आम्ही केली होती. तेव्हा मी देखील सभासद होतो. त्यावेळी समाजाच्या लोकसंख्येत १९ टक्क्यांवरून २६ टक्के वाढ झाली. परंतु जनगणनेचे काम चुकीच्या पद्धतीने केल्याने यात अनेक त्रुटी झाल्याचे आमच्या निदर्शनास आले, असे कांदोळकर म्हणाले.
भंडारी समाजाच्या नवीन संघटनेतर्फे धुळापी-खोर्ली येथे आयोजित जातीनिहाय जनगणना कार्यक्रमाचे उदघाटन झाले. यावेळी भंडारी समाजाच्या नवीन संघटनेचे अध्यक्ष उपेंद्र गावकर, माजी मंत्री दयानंद मांद्रेकर, प्रवक्ते संजीव नाईक आणि इतर सदस्य उपस्थित होते.
गेल्या एक वर्षापासून ओबीसी समाजाची जातीनिहाय जनगणना करण्याची मागणी आम्ही सरकारकडे करत होतो. आता आम्ही भंडारी समाजाची जनगणना करण्याचा निर्णय घेतला आहे, असे उपेंद्र गावकर म्हणाले.
महाराष्ट्रात मराठा समाजाची लोकसंख्या २० टक्के असूनही आजपर्यंत १९ पैकी १२ मुख्यमंत्री या समाजातून झाले, तर गोव्यात भंडारी समाजाची लोकसंख्या ३० टक्के असली तरी आतापर्यंत आमचा एकच मुख्यमंत्री झाला, तोही केवळ १३ महिने पदावर राहिला. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत या जनगणनेचा फायदा होईल, असे प्रवक्ते संजीव नाईक म्हणाले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.