पणजी: ईव्हीएमद्वारे भाजप निवडणुका जिंकतो, असा खोटा आरोप विरोधक नेहमीच करतात. परंतु, झेडपी निवडणुकीत मतपत्रिकेद्वारे मतदान करून जनतेने भाजप सरकार, मोदींवरील विश्वास पुन्हा सार्थ ठरवला. दोन्ही झेडपीत ‘एनडीए’ला स्पष्ट बहुमत मिळवून दिले, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी स्पष्ट केले.
पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी प्रदेशाध्यक्ष दामू नाईक, मंत्री माविन गुदिन्हो, खासदार सदानंद शेट तानावडे व माजी खासदार विनय तेंडुलकर उपस्थित होते. जिल्हा पंचायत निवडणुकीत काँग्रेसला दुहेरी आकडाही गाठता आला नाही. त्यामुळे या निवडणुकीच्या माध्यमातूनही गोमंतकीय जनतेने काँग्रेस–गोवा फॉरवर्ड युतीला नाकारल्याचे दिसून आले.
ग्रामीण भागातील जनतेला भाजप सरकार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर ठाम विश्वास आहे. त्यामुळेच त्यांनी दोन्हीही जिल्हा पंचायतींत भाजपला स्पष्ट बहुमत दिले आणि विकसित गोव्याचे स्वप्न साकारण्यास आणखी बळ दिले, असे मुख्यमंत्री डॉ. सावंत म्हणाले.
जिल्हा पंचायत निवडणुकीतील ‘एनडीए’च्या यशात मंत्री, भाजप, मगो आमदार, पदाधिकारी, कार्यकर्त्यांचे मोठे योगदान आहे. दोन्ही झेडपी पुन्हा ताब्यात आल्याने महिला सक्षमीकरणाला चालना देण्याची संधी मिळाल्याचेही त्यांनी नमूद केले. दरम्यान, ईव्हीएमवरून भाजपवर आरोप करणाऱ्यांना जनतेने मतपत्रिकेद्वारे मतदानातूनही चपराक लगावली. गतवेळी भाजपला ३३ जागा मिळाल्या होत्या. यावेळी भाजपने त्यापलीकडे मजल मारली आहे.
जिल्हा पंचायत निवडणुकीतील विजयात राज्य सरकारच्या ‘माझे घर’ योजनेचा किती वाटा आहे असा प्रश्न विचारला असता, ‘एनडीए’च्या विजयात ‘माझे घर’ योजनेचाही मोठा वाटा असल्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले. ही योजना यशस्वी करण्यासाठी अधिकाधिक नागरिकांनी मतदान करावे, असे आवाहन आम्ही प्रचारा दरम्यान केले होते. त्यामुळे नागरिकांना उत्स्फूर्तपणे मतदान प्रक्रियेत सहभागी होऊन भाजप उमेदवारांना मते दिली, असेही त्यांनी सांगितले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.