पणजी: गोव्यात गेल्या काही दिवसांपासून उन्हाचा कडाका चांगलाच वाढला असून नागरिक घामाच्या धारांनी आणि असह्य उष्म्याने हैराण झाले आहेत. शुक्रवारी तापमानाने ३५ अंशांचा टप्पा ओलांडल्यानंतर शनिवारी पाऱ्यात किंचित घट झाली असली, तरी उकाड्यापासून सुटका मिळालेली नाही. मात्र, हवामान खात्याने एक दिलासादायक बातमी दिली असून लवकरच राज्यात पावसाचे आगमन होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
तीन दिवस पावसाचे सावट
हवामान वेधशाळेने वर्तवलेल्या अंदाजानुसार, पुढील दोन दिवस उष्म्याचा त्रास असाच कायम राहणार आहे. मात्र, सोमवार, मंगळवार आणि बुधवार असे सलग तीन दिवस राज्याच्या काही भागात तुरळक पावसाची शक्यता आहे. जर हा पाऊस झाला, तर तापमानात घट होऊन नागरिकांना वाढत्या उष्णतेपासून मोठा दिलासा मिळू शकतो. सध्या ढगाळ वातावरणामुळे आर्द्रतेचे प्रमाण वाढले असून, त्यामुळे नागरिकांना अधिक घाम येत आहे.
वाढत्या उष्म्यामुळे 'डिहायड्रेशन' किंवा निर्जलीकरणाचा त्रास होण्याची शक्यता अधिक असते. शनिवारी कमाल तापमान ३४.४ अंश सेल्सिअस, तर किमान तापमान २५.४ अंश सेल्सिअस नोंदवले गेले. या बदलत्या हवामानाचा आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ नये, यासाठी आरोग्य विभागाने खबरदारीच्या सूचना दिल्या आहेत. शरीरातील पाण्याचे प्रमाण टिकवून ठेवण्यासाठी लिंबू पाणी, ताक, पेज आणि ताज्या फळांच्या रसाचे सेवन करणे हितकारक ठरेल, असा सल्ला देण्यात आला आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.