पणजी: शनिवारी रात्रीपासून रविवारी सकाळपर्यंत बरसलेल्या पावसाने रविवारी संपूर्ण दिवसभर विश्रांती घेतली. त्यामुळे राज्यात पुन्हा एकदा उन्हाळा सुरू असल्याचा भास जनतेला झाला. त्यातच राज्य हवामान विभागाने येत्या १५ ऑगस्टपर्यंत पावसाची शक्यता नसल्याचा अंदाज वर्तवला आहे. त्यामुळे प्रामुख्याने राज्यातील शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.
यंदा १ जून ते ९ ऑगस्ट या मान्सून काळात राज्यात ६१.२० इंच इतक्या पावसाची नोंद झाली आहे. या काळात सरासरी ८८.२४ इंच इतका पाऊस पडतो. त्यामुळे या हंगामात सरासरी पावसात ३०.६५ टक्क्यांची तूट असल्याचे दिसून येते.
गतवर्षी १ जून ते ९ ऑगस्ट या कालावधीत राज्यात ८०.३७ इंच पाऊस पडला होता. गतवर्षीच्या पावसाची यंदाच्या पावसाशी तुलना केल्यास यंदा १९.१७ इंच पाऊस कमी पडल्याचे दिसून येते.
दरम्यान, यंदा राज्यात मान्सूनचा पाऊस वेळेवर दाखल झाला. मात्र, मध्यंतरीच्या काळात त्यात सातत्याने खंड पडत गेला. त्यामुळे सरासरी पावसातील तूट अजूनही भरून निघालेली नाही.
दुसरीकडे, राज्यातील धरणक्षेत्रांत गेल्या काही दिवसांत पाऊस सातत्याने पडल्याने साळावली, पंचवाडी आणि गावणे ही धरणे ओव्हरफ्लो झाली असून, इतर धरणांतील पाणीसाठा समाधानकारक असल्याचे दिसून येते.
चार केंद्रांत इंचाचे पाऊण शतक पूर्ण
मान्सूनच्या पावसाने यंदा १ जून ते ९ ऑगस्ट या काळात सांगे (८५.३३ इंच), धारबांदोडा (८५ इंच), वाळपई (८३ इंच) आणि केपे (७५.५० इंच) या चार केंद्रांत इंचाचे पाऊण शतक पूर्ण केले आहे. तर, म्हापशात आतापर्यंत ४६, पेडण्यात ५२, पणजीत ३९.४२, जुने गोव्यात ५२, साखळीत ६४, फोंड्यात ६४.६१, काणकोणात ७०, दाबोळीत ४२.१३, मडगावात ६० आणि मुरगावात ४२ इंच इतक्या पावसाची नोंद झाली आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.