पणजी: मान्सूनचा पाऊस मंदावल्याने राज्यावर पुढील काही दिवसांत पाण्याचे भीषण संकट येण्याची भीती व्यक्त केली जात असतानाच, ‘‘राज्यातील धरणांमध्ये पुढील महिनाभर पुरेल इतका पाणीसाठा आहे’’, असे जलस्रोतमंत्री सुभाष शिरोडकर यांनी सांगितले.
खात्याचे नवे प्रकल्प, जलसंवर्धन आदींबाबत खात्याच्या अधिकाऱ्यांशी सोमवारी घेतलेल्या बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. ‘‘पाऊस मंदावल्याने राज्यात उपलब्ध पाण्याचा कशापद्धतीने वापर करण्यात यावा, याबाबत बैठकीत चर्चा झाली.
सध्या साळावली धरणात दीड महिना, तर पंचवाडीत महिनाभर पुरेल इतका पाणीसाठा आहे. अंजुणेत १५ दिवस पुरेल इतके= पाणी आहे. तेथील पाणी केवळ पिण्यासाठीच वापरण्यात येत आहे’’, असे मंत्री शिरोडकर म्हणाले. जुलैमध्ये पाऊस सुरू झाल्यानंतर पाण्याची टंचाई भासणार नाही’’, असेही त्यांनी नमूद केले.
‘‘राज्यातील धरणांमध्ये सध्या सुमारे एक महिना पुरेल इतका पाणीसाठा आहे. परंतु, भविष्यातील गरज ओळखून पाण्याचा जपून वापर करणे आवश्यक आहे. शुद्धीकरण केलेल्या पाण्याचा योग्य ठिकाणच वापर व्हावा, यासाठी लवकरच परिपत्रक जारी करण्यात येणार आहे’’, असेही पिण्याचे पाणी खात्याचे मंत्री सुभाष फळदेसाई यांनी सांगितले.
‘‘भविष्यात जलसंवर्धनासाठी बंधारेच महत्त्वपूर्ण ठरणार आहेत. शिवाय काजूमळ आणि चरावणे ही दोन लघुधरणेही उभारावी लागतील. काजूमळचे पाणी ओपात आणि चरावणेचे पाणी डिचोलीत आल्यानंतर संबंधित भागांत पाणी टंचाई भासणार नाही. त्यामुळे या दोन धरणांचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करून त्यांना आवश्यक ते सर्व परवाने मिळवण्यात येतील’’, असेही मंत्री सुभाष शिरोडकर यांनी सांगितले.
‘‘पिसुर्ले येथील खाणपीठातील पाण्याचा चालू काळात वापर करण्याचेही खात्याने ठरवले आहे. तेथील पाण्याचा उपसा करून ते पडोसेत आणले जाईल. या कामाला येत्या गुरुवारपासून सुरुवात होणार असून, हे काम चार ते पाच दिवसांत पूर्ण केले जाईल’’, असेही शिरोडकर म्हणाले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.