शिरगाव येथील लईराई देवीच्या वार्षिक जत्रोत्सवात घडलेल्या चेंगराचेंगरी दुर्घटनेने संपूर्ण गोवा हादरुन गेला होता. या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या भाविकांच्या कुटुंबीयांना देवस्थान समितीने प्रत्येकी एक लाख रुपयांची सानुग्रह मदत जाहीर केली आहे. हा निर्णय देवस्थानच्या महाजनांनी घेतला असून मृतांच्या कुटुंबीयांना थोडासा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
देवस्थान महाजनांनी यावेळी स्पष्टपणे सांगितले की, या दुर्घटनेसाठी देवस्थान जबाबदार नाही. उलट प्रशासनाने योग्य ती खबरदारी न घेतल्यामुळेच ही दुर्दैवी घटना घडली, असा आरोप महाजनांनी केला. "जत्रेच्या पूर्वतयारीत तसेच गर्दी नियोजनामध्ये प्रशासनाची जबाबदारी ठरते. प्रत्येकवर्षीप्रमाणे यंदाही आम्ही आमचे पारंपरिक आयोजन केले होते, मात्र गर्दी नियंत्रणात अपयश आल्यामुळे दुर्घटना घडली," असे महाजनांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
दरम्यान, राज्य सरकारने (Government) या दुर्घटनेची सखोल चौकशी करण्यासाठी सत्यशोधन समिती स्थापन केली आहे. या समितीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतरच पुढील कार्यवाही केली जाईल, असेही देवस्थान समितीच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.
गेल्या आठवड्यात लईराई देवीच्या जत्रोत्सवात हजारोंच्या संख्येने भाविक जमा झाले होते. दर्शनासाठी झालेल्या गर्दीत अचानक चेंगराचेंगरी झाली आणि त्यात काही भाविकांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता, तर अनेक जण जखमी झाले होते. या पार्श्वभूमीवर राज्यभरातून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या होत्या.
जत्रोत्सवांच्या सुरक्षिततेसंदर्भात आता नवीन नियोजन आणि सुधारित व्यवस्था करण्याची मागणीही जोर धरु लागली आहे. प्रशासन, पोलीस (Police) यंत्रणा आणि देवस्थान समिती यांच्यात समन्वय साधून अशा घटना पुन्हा होणार नाहीत यासाठी ठोस उपाययोजना करण्यात याव्यात, अशी अपेक्षा भाविकांकडून व्यक्त केली जात आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.