डिचोली : सारमानस फेरीधक्क्यावर मंगळवारी सायंकाळी एक कार नदीपात्रात गेल्याच्या घटनेनंतर या फेरीधक्क्याच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. सुदैवाने कार चिखलात रुतल्याने वाहनातील दाम्पत्याचा जीव वाचला. मात्र, या घटनेमुळे यापूर्वी घडलेल्या अपघातांच्या आठवणी ताज्या झाल्या आहेत.
सारमानस फेरीधक्का दिवसेंदिवस अधिक धोकादायक बनत असल्याची भावना स्थानिकांमध्ये व्यक्त होत आहे. गेल्या वर्षी ३ नोव्हेंबर रोजी फेरीबोटीतून कार बाहेर काढताना एक कार थेट नदीत कोसळली होती. त्यावेळी चालक असलेल्या युवा अभियंत्याचा थोडक्यात बचाव झाला होता.
त्याआधी नोव्हेंबर २०२३ मध्ये याच ठिकाणी कार नदीत बुडाल्याने डिचोलीतील यतीन मयेकर या युवकाचा मृत्यू झाला होता. शिवायही काही वाहने नदीत जाण्याच्या घटना घडल्या आहेत.
स्थानिकांच्या मते, फेरीधक्क्याकडे जाणारा रस्ता अरुंद असून त्यावर मोठी उतरण असल्याने धोका वाढतो. फेरीबोटीत प्रथम प्रवेश मिळवण्यासाठी वाहनचालकांमध्ये अनेकदा घाई व स्पर्धा निर्माण होते. त्यामुळे अपघातांना निमंत्रण मिळते.
१६ वर्षांपूर्वी सारमानस फेरीधक्क्याजवळ फेरीबोट बुडण्याची दुर्घटना घडली होती. टोंक फेरीधक्क्यावरून आलेली फेरीबोट सारमानस फेरीधक्क्याजवळ पोहोचता, पोहोचता मांडवी नदीत बुडाली होती. या दुर्घटनेत फेरीबोटीमधील माशेल येथील गोवेकर नामक एका व्यावसायिकाचा बुडून मृत्यू झाला होता, तर अन्य काही प्रवासी मृत्यूच्या दाढेतून बचावले होते. फेरीबोट बुडाल्याने वाहनेही पाण्याखाली गेली होती. या दुर्घटनेत मोठी वित्तहानीसुद्धा झाली होती.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.