पणजी: राज्याच्या दीर्घकालीन विकासासाठी उच्च शिक्षण बळकट करणे, कुशल मनुष्यबळ निर्माण करणे आणि पर्यटन क्षेत्रात विविधता आणणे अत्यावश्यक असल्याचे मत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी व्यक्त केले.येथील आझाद मैदानावर क्रांतिदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
यावेळी राज्यपाल पुसापती अशोक गजपती राजू, केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक, वीजमंत्री सुदिन ढवळीकर, मुख्य सचिव डॉ. व्ही. कंदवेलू, विरोधी पक्षनेते युरी आलेमाव, स्वातंत्र्यसैनिक संघटनेचे रोहिदास देसाई तसेच इतर मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी स्वातंत्र्यसैनिकांच्या २७ मुलांना नोकरीची नियुक्तीपत्रे प्रदान करण्यात आली.
मुख्यमंत्री म्हणाले की, गोव्याने राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आधीच अंमलात आणले असून आता कायदा, फॉरेन्सिक सायन्स, कौशल्याधारित शिक्षण, डिजिटल शिक्षण आणि अनुभवाधिष्ठित अभ्यास अशा क्षेत्रांसाठी पाच नवीन महाविद्यालयांची उभारणी करण्यात येणार आहे. बदलत्या उद्योगधंद्यांच्या गरजा लक्षात घेऊन राज्याला स्पर्धात्मक आणि सक्षम बनविणे हा या उपक्रमाचा उद्देश असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
पर्यटन क्षेत्राबाबत बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, केवळ समुद्रकिनाऱ्यांपुरते मर्यादित न राहता राज्यात वारसा, आध्यात्मिक, पर्यावरणपूरक, आरोग्य व अंतर्गत भागातील पर्यटनाला चालना देण्यात येत आहे. यामुळे स्थानिकांना रोजगार व व्यवसायाच्या नव्या संधी निर्माण होत आहेत. विकास धोरणात आर्थिक प्रगतीसोबत शिक्षण, रोजगारनिर्मिती, सांस्कृतिक जतन आणि शाश्वत पर्यटन यांचा समतोल साधला जात असल्याचे त्यांनी सांगितले.
पत्रादेवी हुतात्मा स्मारकाचे काम पूर्ण झाले असून त्याचे लवकरच उद्घाटन करण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. गोव्याच्या स्वातंत्र्यलढ्यात बलिदान दिलेल्या हुतात्म्यांच्या स्मृती जपण्यासाठी हे स्मारक उभारण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.