पणजी: ‘एल निनो’च्या प्रभावामुळे रखडलेल्या मान्सूनच्या पावसामुळे राज्यातील शेतकरी गलितगात्र झाला असून, त्यांनी पेरलेला तरवा सुकून गेला आहे. इतर पिकांना घातलेली खते मातीमोल झालेली आहेत. पुढील आठ दिवसांत पावसाचे आगमन न झाल्यास मात्र शेतकरी देशोधडीला लागण्याची शक्यता कृषी क्षेत्रातील तज्ञ शेतकऱ्यांनी ‘गोमन्तक’शी बोलताना व्यक्त केली.
कृषी खात्याचे ब्रँड अँबिसिडर वरद सामंत म्हणाले, राज्यात जूनच्या पहिल्या ते दुसऱ्या आठवड्यात मान्सूनचा पाऊस सुरू होतो. तोच अंदाज यंदाही बांधत विविध भागांतील शेतकऱ्यांनी भात लागवडीची तयारी सुरू केली. त्यासाठी त्यांनी तरवाही पेरलेला होता. परंतु, अजूनही पावसास सुरुवात न झाल्याने तरवा लावलेल्या शेतकऱ्यांचा तरवा पूर्णपणे सुकून गेलेला आहे.
त्यामुळे त्यांना पुन्हा तरवा लावावा लागणार आहे. दुसरीकडे, गणेश चतुर्थीसाठी काही भागांतील शेतकऱ्यांनी काकडी, भेंडी, दोडका, लाल भाजीची लागवड केलेली होती. पण, उन्हामुळे त्यांची ही पिके वाळून गेलेली आहेत. परिणामी, या शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे.
भाताचे पीक हे साधारण १२० ते १३० दिवसांचे असते. त्यामुळे जूनच्या अखेरपर्यंत भाताची लागवड होणे गरजेचे असते. पण, सद्यस्थिती पाहिल्यास पुढील काही दिवस राज्यात पावसाचे संकेत दिसत नाहीत. अशा स्थितीत २५ जूनपर्यंत पाऊस न पडल्यास शेतकऱ्यांची अवस्था आणखी बिकट होणार आहे, असेही त्यांनी सामंत यांनी नमूद केले.
मान्सूनचा पाऊस अजूनही सुरू न झाल्याने राज्यातील शेतकरी हवालदील झालेला आहे. यंदा राजकारण्यांकडून शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात बियाणांचे वाटप झाले. पण, पाऊस सुरू न झाल्याने अनेक शेतकऱ्यांनी भात तसेच इतर पिकांची लागवड सुरू केलेली नाही.
पाऊस पडणारच
‘‘एल निनोच्या प्रभावामुळे मान्सूनचा पाऊस रखडला असला, तरी पुढील काही दिवसांत तो नक्की कोसळेल’’, असा ठाम विश्वास कृषी संचालक संदीप फळदेसाई यांनी व्यक्त केला. ‘‘राज्यात एरव्ही ६ ते ८ जूननंतर मान्सूनच्या पावसास सुरुवात होते. त्यानंतर शेतीची कामे सुरू होतात. याचा विचार केल्यास अवघे दहाच दिवस झालेले आहेत’’, असेही त्यांनी नमूद केले.
कृषी खात्याचे दुर्लक्ष
‘‘एल निनोच्या प्रभावामुळे मान्सूनच्या पावसास उशीर होण्याची शक्यता लक्षात घेऊन गोव्याशेजारील महाराष्ट्र सरकारने तेथील शेतकऱ्यांना तुर्तास भाताची लागवड न करण्याचा अधिकृत सल्ला दिला. परंतु, गोव्याच्या कृषी खात्याने मात्र याकडे दुर्लक्ष केले. शेतकऱ्यांमध्ये याबाबत जागृती केली नाही. त्यामुळे काही शेतकऱ्यांनी तरवा लावला आणि त्यांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागला’’, अशी खंतही उदय प्रभूदेसाई यांनी व्यक्त केली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.