पणजी: वाढती लोकसंख्या आणि शहरी सुविधा लक्षात घेता, सरकारने कळंगुट-कांदोळी आणि पर्वरी यांना शहरांचा दर्जा द्यावा, अशी मागणी गोवा फॉरवर्ड पक्षाचे आमदार विजय सरदेसाई यांनी सोमवारी (दि.२४ मार्च) विधानसभेत केली. विधानसभेत बोलताना सरदेसाई म्हणाले, जर फातोर्डाला मडगाव नगरपरिषदेच्या कार्यक्षेत्रात आणता येत असेल, तर तोच नियम पर्वरी आणि कळंगुट-कांदोळी पट्ट्यालाही लागू करावा.
कळंगुट-कांदोळी ही आता गावं राहिलेली नाहीत. त्यांचं रूपांतर आता शहरांमध्ये झालं आहे. जर ती गावं असतील, तर फातोर्डाला शहर म्हणता येणार नाही. आम्ही नगरपालिकेच्या अंतर्गत येतो; मग कळंगुट आणि कांदोळीला का शहरांचा दर्जा द्यायचा नाही? या ठिकाणी होणारी लोकसंख्येची वाढ खूप मोठी असल्याचं सरदेसाई म्हणाले आहेत.
पर्वरीत आमदार आणि पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांना टाऊन स्क्वेअर तयार करायचा आहे, मग टाऊन स्क्वेअर गावात असतो का? असा सवाल सरदेसाई यांनी केला. राज्यपालांच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावाला उत्तर देताना अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी त्यांनी हे विधान केलं होतं.
सरदेसाई यांच्या मते, कळंगुट-कांदोळी आणि पर्वरी या ठिकाणी शहरी सुविधा उपलब्ध आहेत आणि लोकसंख्याही शहरांसारखीच आहे. त्यामुळे, या भागांना शहरांचा दर्जा देणं आवश्यक आहे. यामुळे, या भागांचा विकास अधिक चांगल्या प्रकारे होईल आणि नागरिकांना चांगल्या सुविधा मिळतील असं त्याचं मत होतं.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.