पणजी: नवनिर्वाचित मंत्री दिगंबर कामत व रमेश तवडकर या दोघांचेही खातेवाटप अद्याप न झाल्याने सलग पाचव्या दिवशीही त्यांना बिनखात्याचे मंत्री म्हणूनच रहावे लागले आहे. दोघांना नेमकी कोणती खाती द्यायची हे अजूनही निश्चित झालेले नाही. त्यामुळे त्यांना खाती देण्यास आणखी विलंब लागण्याची शक्यता आहे.
लोकसभा निवडणुकीनंतर चर्चेत राहिलेल्या मंत्रिमंडळ फेरबदलाच्या विषयावर गुरुवारी शिक्कामोर्तब झाले. अपेक्षेनुसार ज्येष्ठ आमदार दिगंबर कामत आणि रमेश तवडकर यांच्या गळ्यात भाजपने मंत्रिपदाची माळ घातली. त्यानंतर या दोघांनाही गुरुवारीच राज्यपाल पुसापती अशोक गजपती राजू यांनी मंत्रिपद आणि गोपनीयतेची शपथ दिली.
मंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर लगेचच त्यांना खात्यांचे वाटप केले जाणार होते, परंतु शुक्रवार आणि शनिवार असे दोन दिवस अमावास्या असल्याने खात्यांचे वाटप करण्यात आले नाही. हिंदू धर्मात अमावास्येला चांगले काम केले जात नाही.
त्यामुळे कामत आणि तवडकर या दोघांनीही सोमवारी आपल्याला खाती द्यावी, अशी मागणी केली. त्यामुळेच त्यांना सोमवारी खात्यांचे वाटप केले जाईल, असे भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनीही स्पष्ट केले होते, परंतु सोमवारीही त्यांना खात्यांचे वाटप करण्यात आले नाही.
तवडकरांनी स्वीकारला केबिनचा ताबा
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडून सोमवारी खात्यांचे वाटप केले जाण्याच्या शक्यतेने मंत्री रमेश तवडकर यांनी सोमवारीच मंत्रालयातील आपल्या केबिनचा ताबा घेतला. यावेळी त्यांचे कार्यकर्ते आणि हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते. मंत्री दिगंबर कामत यांनी मात्र अजून आपल्या केबिनचा ताबा स्वीकारलेला नाही.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.