फोंडा: धारबांदोड्यातील रगाडा नदी पात्रात सुरू असलेल्या विकासकामाबाबत कोणतेच नियोजन नसल्याने शिवडे - धारबांदोडा व इतर भागातील लोकांना गढूळ पाणी प्यावे लागत आहे. ऐन उन्हाळ्यात सध्या जिकडे-तिकडे पाणीटंचाईचे सावट आहे. अशा स्थितीत गढूळ पाणी नळाला येत असल्याने आता पिण्याचे पाणी आणावे कुठून, असा प्रश्न येथील नागरिकांना पडला आहे. शिवाय गढूळ पाण्यामुळे आरोग्याच्या समस्या उद्भवण्याचा धोका निर्माण झाला आहे.
साकोर्डा येथील नदीकाठी संरक्षक भिंतीचे बांधकाम सुरू आहे. शिवाय पुलाच्या सक्षमीकरणाचेही काम प्रगतिपथावर आहे. या कामासाठी अवजड मशिनरी थेट नदीपात्रात उतरवून हा भाग खोलगट करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. पण यामुळे नदीचे पाणी प्रचंड गढूळ झाले असून हेच गढूळ पाणी पंपद्वारे लोकांना पुरविले जात आहे. परिणामी लोकांवर गढूळ पाणी पिण्याची वेळ आली आहे. सध्या भर उन्हाळ्यात प्रचंड उष्मा जाणवत आहे. अशा स्थितीत शुद्ध पाण्यासाठी कुठे भटकंती करावी, असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे.
विकासकामे करताना योग्य नियोजन करायला हवे. अन्यथा त्याचा फटका इतरांना बसतो. असाच प्रकार याठिकाणी घडला आहे. या नदीपात्रातील कामाबाबत संबंधितांकडून कोणतेच नियोजन झाले नसल्याने त्याचा फटका लोकांना बसत आहे. संबंधितांनी याप्रकरणी त्वरित तोडगा काढावा किंवा पाण्याचा टँकर तरी आवश्यक त्या भागात पाठवावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
विकासकामे हवी आहेच, पण त्यात योग्य नियोजन असावे. रगाडा नदीच्या कामावेळी गढूळ झालेले पाणी थेट लोकांच्या घरात पोचत आहे. त्यामुळे संबंधित सरकारी अधिकारी व इतरांनी या कामाचे योग्य नियोजन करून ग्रामस्थांना शुद्ध आणि स्वच्छ पाणी कसे पुरवता येईल, याकडे लक्ष द्यावे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.