नवी दिल्ली/ मुझफ्फराबाद: उत्तर प्रदेशातील शामली जिल्ह्यातील झिंजाना येथील रहिवासी नौमान अन्सारी(वय १८) हा दुकानदार साहित्य खरेदीसाठी लाल किल्ला परिसरात आला असता सोमवारी संध्याकाळी येथे झालेल्या स्फोटात त्याचा मृत्यू झाला. नौमान हा त्याच्या कुटुंबातील एकमेव कमावता होता.
‘‘दिल्लीमध्ये झालेल्या स्फोटात नौमानचा जागीच मृत्यू झाला तर त्याचा चुलत भाऊ अमन हा जखमी असून त्याच्यावर लोकनायक रुग्णालयात उपचार सुरू आहेत,’’ अशी माहिती नौमानचे काका फारूख यांनी माध्यमांशी बोलताना दिली. नौमान हा घरातील एकमेव कमावता होता, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
दिल्ली परिवहन मंडळात वाहकाची नोकरी करणारे अशोक कुमार (वय ३४) यांचादेखील या स्फोटामध्ये मृत्यू झाला आहे. त्याचप्रमाणे येथे टॅक्सी चालवणारा पंकज सहानी (वय २२) यालाही लाल किल्ल्याजवळील स्फोटात प्राण गमवावे लागले. ‘‘पंकज मागील तीन वर्षांपासून या भागात टॅक्सी चालवत होता.
आम्हाला सोमवारी रात्री पोलिसांचा दूरध्वनी आला, दिल्लीतील स्फोटात पंकजचा मृत्यू झाल्याचे त्यांनी सांगितले. आमच्यासाठी हा खूप मोठ्या धक्का आहे,’’ असे पंकजचे काका रामदेव सहानी यांनी सांगितले. दिल्ली स्फोटातील मृतांची संख्या १२ झाली असून २० जखमी आहेत.
दिल्लीत झालेल्या स्फोटामुळे देशात भीतीचे वातावरण असून सरकारने सत्य सांगावे, अशी मागणी काँग्रेसने केली आहे. यासोबतच हरियानाच्या फरिदाबादमध्ये ३६० किलो स्फोटके सापडल्यानंतर काँग्रेसने केंद्र सरकार अपयशी ठरल्याचा ठपका देखील ठेवला आहे.
काँग्रेसचे माध्यम विभागाचे प्रमुख पवन खेडा यांनी केंद्र सरकार पूर्णपणे अपयशी ठरल्याची तोफ डागली. दिल्लीतील स्फोटावरून सरकारवर हल्ला केला. ते म्हणाले, की पंतप्रधान भूतान दौऱ्यावर रवाना झाले आहे. मात्र देशात भीती आणि चिंतेचे वातावरण आहे. लोकांच्या मनात अनेक प्रश्न आहेत. हा स्फोट नेमका कशासाठी होता, कोणी घडवला आणि मूळ प्रकरण काय आहे हे जोपर्यंत सरकार सांगत नाही तोपर्यंत त्यावर बोलणे योग्य ठरणार नाही. राजधानीत असा स्फोट होणे यातून अनेक प्रश्न उपस्थित होतात, असा टोलाही त्यांनी लगावला.
पवन खेडा यांनी आरोप केला, की २०१९ मध्ये पुलवामा दहशतवादी हल्ल्याबद्दल उपस्थित झालेल्या शंकांना सरकारने अद्याप उत्तर दिलेले नाही. अशा घटनांमुळे नागरिकांच्या मनातील भीती वाढली. पुलवामामध्ये ३५० किलो आरडीएक्स कसे पोचले याचे उत्तर अद्यापपर्यंत न मिळणे आश्चर्यकारक आणि धक्कादायक आहे.
सहा वर्षांहून अधिक काळ लोटला आहे, पण कोणतेही उत्तर मिळालेले नाही. त्या काळात जम्मू काश्मीरचे तत्कालीन नायब राज्यपाल सत्यपाल मलीक यांनी यावर अनेक वेळा प्रश्न उपस्थित केले होते, परंतु त्यांनाही उत्तर मिळाले नाही.आता राष्ट्रीय राजधानी क्षेत्रातून एवढ्या मोठ्या प्रमाणात स्फोटके, बॉम्ब बनवण्याचे साहित्य जप्त करण्यात आले. यावरून सरकार पूर्णपणे अपयशी ठरल्याचे दिसून येते, असे खेडा म्हणाले.
दिल्लीतील आंतरराष्ट्रीय विमानतळावर अलीकडेच झालेल्या गोंधळावरूनही काँग्रेस नेते पवन खेडा यांनी शरसंधान केले. उड्डाणांसाठी एटीएस डेटाला आधार देणाऱ्या ऑटोमॅटिक मेसेज स्विचिंग सिस्टिममधील बिघाड हा सायबर हल्ला असल्याचा संशय खेडा यांनी व्यक्त केला.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.