डिचोली: विविध कारणांवरून वादात सापडलेल्या येथील चौपदरी बगलमार्गाला आता अस्वच्छतेचे ग्रहण लागले आहे. हा नवीन बगलमार्ग कचऱ्याचा ‘हॉटस्पॉट’ बनला आहे. हा प्रकार वेळीच नियंत्रणात आला नाही तर भविष्यात या बगलमार्गाजवळून चालणेही कठीण बनेल अशी भीती वर्तविण्यात येत आहे.
डिचोलीतील काही भागात अजूनही कचऱ्याची समस्या कायम आहे. त्यात आता बगलमार्गाची भर पडू लागली आहे. रोलिंग मिल-वाठादेव भागात या बगलमार्गाच्या बाजूने कचरा टाकण्याचे प्रकार घडत आहेत. एका कोपऱ्यात तर सध्या मोठ्या प्रमाणात प्लास्टिकसह अन्य कचरा साचला आहे. हा कचरा कुजून तेथे दुर्गंधी पसरली आहे. रोगराई फैलावण्याची भीती वर्तविण्यात येत आहे.
हा कचरा टाकतो कोण? याबाबत निश्चित माहिती नसली तरी रोलिंगमिल-वाठादेव भागात मोठ्या प्रमाणात कामगारवर्ग भाडेकरू म्हणून राहत आहेत. त्यांच्याकडूनच कचरा टाकण्यात येत असल्याचा संशय आहे. हा परिसर कारापूर-सर्वण पंचायतीच्या कार्यक्षेत्रात येतो. या पंचायतीने या प्रकाराची गांभीर्याने दखल घ्यावी, अशी मागणी होत आहे.
मोठा गाजावाजा करून गेल्या वर्षी ६ जून रोजी वाठादेव ते व्हाळशी या चौपदरी बगलमार्गाचे लोकार्पण करण्यात आले आहे. ‘या बगलमार्गावर व बाजूला कचरा टाकू नका, शहराच्या वैभवात भर घालणारा हा बगलमार्ग चकाचक ठेवा’ असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी बगलमार्गाचे लोकार्पण केल्यानंतर बोलताना केले होते. मात्र मुख्यमंत्र्यांच्या या आवाहनाला हरताळ फासला जात आहे. बगलमार्गावरील कचऱ्याचा हा प्रश्न वेळीच नियंत्रणात आणला नाही तर भविष्यात गंभीर समस्या निर्माण होण्याची भीती वर्तविण्यात येत आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.