पणजी: राज्यात आषाढ सरी बरसत असतानाच राजकारणाला उकळी फुटू लागली आहे. विधानसभेच्या निवडणुकीला १९ महिने बाकी असून, काँग्रेस-गोवा फॉरवर्डचे बिनसले की काय, असे दिसत असतानाच दोन्ही बाजूंनी थोडी नरमाई घेण्यात आली आहे.
प्रियोळमध्ये भाजपने राजकीय शस्त्रक्रिया केल्यानंतर आता सभापती रमेश तवडकर यांनी तेथे लक्ष घातले आहे. तेथे हजार जणांच्या उपस्थितीत श्रमधाम मेळावा आयोजित करण्याची घोषणा करत प्रियोळ हे आपले लक्ष्य असल्याचे त्यांनी दाखवून दिले आहे. भाजपने मतदारसंघवार मेळावे घेऊन राजकीय वातावरण तापवण्यास सुरवात केली आणि त्याची ‘री’ आता इतर पक्ष ओढू लागले आहेत.
काँग्रेस आणि ‘आप’ यांच्यात वरिष्ठ पातळीवर ‘बेकी’ निर्माण झाल्याचे चित्र असतानाच राज्यात गोवा फॉरवर्ड आणि काँग्रेस यांचे एकाचवेळी आज कुडचडे येथे अनुक्रमे ‘जनता दरबार’ व ‘संविधान बचाव’ यात्रा आयोजित केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. दोन्ही पक्षांमध्ये दरी निर्माण होतेय, अशा चर्चा सुरू झाल्याने रात्री दोन्ही पक्षांतील नेत्यांनी आम्ही एकत्र आहोत, अशा प्रतिक्रिया देत समन्वयचा अभाव नसल्याचा दावा केला.
‘गत विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आणि गोवा फॉरवर्ड या दोन्ही पक्षांनी युती करून निवडणूक लढवली होती आणि ती युती तुटल्याचे अद्याप कोणी जाहीर केलेले नाही. तथापि, २०२७ च्या निवडणुकीत कोणता निर्णय घ्यायचा हे पक्षश्रेष्ठी ठरवतील’, अशी प्रतिक्रिया काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी दिली. ‘भूरुपांतर ही गोव्यासमोर मोठी समस्या असून, त्यासाठी आवश्यक कायदाबदल कुणी केला’, असा प्रश्न करून पाटकर यांनी मागील दहा वर्षांत झालेल्या नगरनियोजनमंत्र्यांवर अप्रत्यक्षरीत्या टीका केली.
त्या मागील रोख सरदेसाई यांच्याकडे होता का, अशीही चर्चा आहे. ‘जनता दरबारा’नंतर सरदेसाई म्हणाले, ‘एकाचवेळी दोन्ही पक्षांचे कार्यक्रम झाले हे खरे. परंतु आम्ही भाषणासाठी गेले नव्हतो, आम्ही लोकांची गाऱ्हाणी ऐकण्याचे काम केले. काँग्रेसने आम्हास कार्यक्रमाची पूर्वकल्पना दिली असती तर आम्ही कार्यक्रम पुढे ढकलला असता’.
गोविंद गावडे यांनी मंत्रिमंडळातून डच्चू मिळाल्यानंतर मंत्री तवडकर यांनी प्रियोळात अधिक लक्ष देण्याचे योजले आहे. आज माशेल येथील एका कार्यक्रमात तवडकर व ढवळीकर तसेच उत्पल पर्रीकर एकाच व्यासपीठावर दिसले.
‘प्रियोळ मतदारसंघात श्रमधाम योजनेतून १२ घरे बांधण्याचा संकल्प केला, त्यापैकी सहा घरांचे काम पूर्ण झाले आहे. प्रियोळात अनेक दात्यांच्या सहकार्यातून आणखी भविष्यात ५० घरे बांधली जातील. त्यासाठी लवकरच प्रियोळात एक हजार कार्यकर्त्यांचे संमेलन घेण्यात येणार आहे’, अशी घोषणा तवडकर यांनी केली.
समाजकारण, राजकारण संयमाने केले पाहिजे, जनविकास, जनकल्याणाचा दृष्टीकोन ठेवून पाऊल टाकले पाहिजे, म्हणजेच सर्वांना बरोबर घेऊन कार्य निश्चित समाजविकास शक्य आहे. कोणी काहीही म्हटले तरी समाजहितासाठी संयमाने काम केले पाहिजे. जीवनात संयम महत्वाचा आहे, असेही सभापती तवडकर म्हणाले.
सुदिन ढवळीकर म्हणाले, माशेल ही कला, क्रीडा आणि देवदैवताची भूमी आहे. त्यामुळे या भूमीचे विविध क्षेत्रात मोठे योगदान आहे. चिखलकाल्यातून परंपरा, संस्कृतीचे जतन येथे केले जाते. मीसुद्धा या भूमीत क्रिकेट खेळलो असून काही षटकार लगावले आहेत. उत्पल पर्रीकर यांनी मनोगत व्यक्त केले. शलाका लवंदे यांनी सूत्रसंचालन केले. धाडसाखळ क्लबच्या कार्यक्रमात पंच सुनील भोमकर, अजय गावडे, पंच यशवंत जल्मी, पंच शिल्पा वेरेकर, गजानन माशेलकर, ज्ञानेश्वर नार्वेकर, सिद्देश नार्वेकर उपस्थित होते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.