राजेंद्र पां. केरकर
केरी-सत्तरी : येथील अंजुणे धरणाच्या जलाशयातील पाण्याचा साठा सध्या मोठ्या प्रमाणात घटून १५ टक्क्यांपेक्षा खाली आल्याचे वृत्त आहे. त्यामुळे असंख्य नागरिकांना पुरविण्यात येणाऱ्या पाण्याच्या उपलब्धतेबरोबरच त्याच्या गुणवत्तेबाबतही गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत.
या धरणाच्या जलाशयातील पाणीसाठा मोठ्या प्रमाणात कमी झाला की अनेक भौतिक, रासायनिक व जैविक प्रक्रिया सुरू होतात. पाण्याचे प्रमाण कमी झाल्यामुळे सेंद्रिय पदार्थ, पोषकद्रव्ये, गाळ आणि इतर प्रदूषकांचे प्रमाण वाढते.
स्थिर पाणी, उच्च तापमान आणि जास्त पोषकद्रव्यांमुळे शैवाल व सायनोबॅक्टेरिया (Blue-Green Algae) यांची झपाट्याने वाढ होते. यामुळे पाण्याला हिरवट रंग व दुर्गंधी येते. सेंद्रिय पदार्थांचे विघटन वाढल्याने पाण्यातील ऑक्सिजनचे प्रमाण कमी होत असून, त्यामुळे हायड्रोजन सल्फाईड व मिथेन यांसारखे वायू तयार होतात आणि पाण्याला कुबट वास येतो. तळातील गाळामधील प्रदूषके बाहेर पडतात.
धरणाच्या तळाशी अनेक वर्षांपासून साचलेला गाळ, सेंद्रिय पदार्थ, पोषकद्रव्ये, जड धातू व जीवाणू यांचे प्रमाण जास्त असल्याने पाणी मृतसाठ्याजवळ पोहोचल्यावर हे घटक पाण्यात मिसळतात. उन्हाळ्यात पाण्याचे विविध स्तर तयार होतात. तळातील पाणी ऑक्सिजनविरहित होऊन त्यात लोह, मँगनिज, अमोनिया व सूक्ष्मजीवांचे प्रमाण वाढते.
मृतसाठा (Dead Storage) हा धरणातील असा भाग असतो, जो नियमित पाणीपुरवठ्यासाठी वापरण्याचा उद्देश नसतो. या पाण्यात खालील समस्या असू शकतात:
- गाळाचे प्रमाण जास्त
- ऑक्सिजनचे प्रमाण कमी
- सेंद्रिय पदार्थांचे विघटन जास्त
- शैवालांची वाढ
- लोह, मँगनिज व अमोनिया जास्त प्रमाणात
- रोगकारक सूक्ष्मजीवांची उपस्थिती.
अत्यावश्यक परिस्थितीत मृतसाठ्यातील पाणी वापरावे लागल्यास ते अत्याधुनिक प्रक्रिया करूनच पिण्यायोग्य बनवावे लागते. अशा पाण्यात टोटल कोलीफॉर्म, फिकल कोलीफॉर्म, ई. कोली, एंटरोकोकस, तसेच सायनोबॅक्टेरियांचे प्रमाण वाढते आणि अशा दूषित पाण्यामुळे जुलाब,
उलट्या, पोटदुखी, त्वचारोग, डोळ्यांची जळजळ, ताप, यकृतावर परिणाम होतो. मृतसाठ्यातील किंवा निकृष्ट दर्जाच्या पाण्यावर ही प्रक्रिया करावी - गाळणीद्वारे प्राथमिक स्वच्छता, प्री-क्लोरीनेशन, कोग्युलेशन, फ्लॉक्युलेशन, गाळ बसविणे, जलद वाळू गाळणी, अक्टिव्हेटेड कार्बन उपचार आवश्यक असल्यास शैवाल विषारी घटकांचे निर्मूलन करण्याच्या प्रक्रियांना प्राधान्य देणे गरजेचे असते.
- धरणाच्या तळाशी असलेल्या ड्रेनेज स्लुईसद्वारे पाणी सोडणे किंवा योग्य उंचीवर बसविलेल्या पंपद्वारे पाणी उचलणे सुरक्षित नाही.
- तळाशी गाळाचे प्रमाण सर्वाधिक असते.
- कुजलेले सेंद्रिय पदार्थ तळाशी जमा असतात.
- लोह, मँगनिज व अमोनियाचे प्रमाण जास्त असते.
- स्लुईस उघडून किंवा पंपद्वारे पाणी सोडल्यास गाळ ढवळून अधिक प्रदूषण होऊ शकते.
तथापि, कोणतीही पद्धत वापरली तरी अशा पाण्यावर संपूर्ण प्रक्रिया करूनच ते पिण्यासाठी पुरविले पाहिजे. आजची परिस्थिती ही केवळ नैसर्गिक संकट नसून जलस्रोत नियोजनातील गंभीर त्रुटींचे द्योतक आहे. लोकसंख्या वाढत असताना आणि पाण्याची मागणी वाढत असताना, जवळपास चाळीस वर्षांपूर्वी बांधलेल्या अंजुणे धरणाव्यतिरिक्त पूरक जलसाठे निर्माण केलेले नाहीत.
पाण्याला मातकट वास, हिरवट रंग
गेल्या महिनाभरापासून नळाद्वारे पुरविण्यात येणाऱ्या पाण्याला मातकट वास आणि रंग असल्याच्या, तसेच काही वेळा पाणी हिरवट रंगाचे असल्याच्या तसेच चव खराब झाल्याच्या तक्रारी नागरिकांकडून सातत्याने येत आहेत. स्थानिक लोकप्रतिनिधींनी हस्तक्षेप करूनही परिस्थितीत सुधारणा होण्याऐवजी ती अधिकच बिघडत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे सध्या नागरिकांना पुरविण्यात येणारे पाणी पिण्यासाठी सुरक्षित आहे का? हा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.