काणकोण: तालुक्यात यंदा भाजीपाला पिकांचे क्षेत्र वाढले आहे. लोलये पंचायत क्षेत्रातील लोलये ते माशेपर्यंतची जमीन गेली तब्बल २५ वर्षे पडीक होती. मात्र, कृषी खात्याच्या प्रयत्नांमुळे यंदा २.५ हेक्टर क्षेत्र शेतकऱ्यांनी भातशेती लागवडीखाली आणली आहे. त्यामुळे तालुक्यात भाजीपाला उत्पादनात वाढ होण्याची अपेक्षा आहे.
खरीप हंगामात सुमारे २५० हेक्टर, तर रब्बी हंगामात ३५० हेक्टर क्षेत्र विविध भाजी पिकांखाली आहे. यंदा प्रायोगिक तत्त्वावर बारा शेतकऱ्यांना एकूण एक हेक्टर क्षेत्रात हायब्रीड टॉमेटो लागवडीसाठी बियाण्यांचे वाटप करण्यात आले होते.
या उपक्रमाचा शेतकऱ्यांना चांगला लाभ झाला आहे. याशिवाय, शैक्षणिक संस्थांमध्ये परसबाग उपक्रम राबविण्यासाठी प्रोत्साहन देण्यात येत असून, शेतकऱ्यांना अनुदान तत्त्वावर चिटकी, वालपापडी, अळसांदे, भेंडी, कोबी, मुळा, काकडी व वांगी यांची बियाणे पुरविण्यात येत आहेत, अशी माहिती साहाय्यक कृषी संचालक नागेश कोमरपंत आणि साहाय्यक विभागीय कृषी अधिकारी सर्वानंद सर्वणकर यांनी दिली.
काणकोण तालुक्यातील लोलये, आगोंद, चिपळे, देवाबाग, वेलवाडा, खरेगाळ आदी भागांत सध्या वायंगण शेती केली जात आहे. पाळोळे फार्मर्स क्लबच्या स्थापनेनंतर क्लबतर्फे सुमारे ७ हेक्टर पडीक जमीन लागवडीखाली आणण्यात आली होती. यंदा शेतकऱ्यांना ‘गोवा धन–४’ या तांबड्या भाताचे बियाणे वितरित करण्यात आले आहे. हे वाण १२५ दिवसांत तयार होत असून, ज्योती व जया या पारंपरिक भात वाणांना पर्याय म्हणून देण्यात आले आहे. या वाणाची लागवड यंदा गावडोंगरी, खोतीगाव आणि लोलये–पैंगीण परिसरात करण्यात येणार आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.