Harbhajan Singh Angry Team India Selection: दक्षिण आफ्रिकेविरुद्ध रायपूर येथे झालेल्या दुसऱ्या वनडे सामन्यात टीम इंडियाला धावांचा डोंगर उभारुनही मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला. भारताने पहिल्यांदा फलंदाजी करताना 359 धावांचे भले मोठे लक्ष्य ठेवले, परंतु दक्षिण आफ्रिकेच्या संघाने अखेरच्या षटकात हे आव्हान यशस्वीरित्या पूर्ण केले. या सामन्यात भारतीय वेगवान गोलंदाज प्रसिद्ध कृष्णा याने अत्यंत निराशाजनक कामगिरी केली. त्याने 8.2 षटकांत तब्बल 85 धावा दिल्या.
या पराभवानंतर टीम इंडियाच्या निवड प्रक्रियेवर अनेक सवाल उपस्थित झाले. हेड कोच गौतम गंभीर आणि चीफ सिलेक्टर अजित आगरकर यांच्यावर चाहत्यांनी टीकेचे बाण सोडले. यातच आता भारताचा माजी फिरकी गोलंदाज हरभजन सिंह (Harbhajan Singh) यानेही जोरदार टीका केली. हरभजनने टीम इंडियाच्या निवड समितीवर टीकास्त्र सोडले असून त्याने मोहम्मद शमीला संधी न मिळाल्याबद्दल आपला संताप व्यक्त केला.
मोहम्मद शमी देशांतर्गत क्रिकेटमध्ये सातत्याने चांगली कामगिरी करत आहे. याच पार्श्वभूमीवर हरभजन सिंहने त्याच्या यूट्यूब चॅनलवर टीम इंडियाच्या निवडीवर भाष्य केले. प्रसिद्ध कृष्णा याला अजून खूप काही शिकायचे आहे, असे मत त्याने व्यक्त केले.
हरभजन म्हणाला, “मोहम्मद शमी कुठे आहे? त्याला संधी का मिळत नाहीये, हे मला समजत नाही. मला माहीत आहे की, टीम इंडियाकडे प्रसिद्ध कृष्णा आहे. तो नक्कीच चांगला गोलंदाज आहे, परंतु त्याला अजून खूप काही शिकायचे आहे. तुमच्याकडे उत्कृष्ट गोलंदाज होते, पण तुम्ही त्यांना हळूहळू बाहेरचा रस्ता दाखवला. आपल्याला जसप्रीत बुमराहच्या अनुपस्थितीतही सामने जिंकायला शिकले पाहिजे.”
हरभजन सिंहने अप्रत्यक्षरित्या अपेक्षेप्रमाणे कामगिरी न करणाऱ्या खेळाडूंना वारंवार संधी देण्याच्या निवड समितीच्या धोरणावर नाराजी व्यक्त केली.
हरभजन सिंह याच्याप्रमाणेच माजी क्रिकेटपटू आकाश चोप्रा यानेही मोहम्मद सिराजला वनडे संघात स्थान न मिळाल्याबद्दल सोशल मीडियावर पोस्टद्वारे सवाल उपस्थित केला.
आकाश चोप्रा म्हणाला, “मोहम्मद सिराज कधीपासून केवळ एका फॉरमॅटचा खेळाडू बनला आहे, हे मला समजत नाहीये. आम्हाला वाटते की तो विकेट घेणारा गोलंदाज आहे. तो वनडे संघातून अचानक गायब कसा झाला? तो देशांतर्गत क्रिकेट खेळत आहे आणि वनडे संघात नाही, हे खूपच विचित्र आहे. दोन वर्षांपर्यंत तो वनडेमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज होता. अचानक त्याचे नाव संघातून कसे गायब झाले? तो टी-20 संघातही नाहीये.”
चोप्राने सिराजला वगळल्यामुळे निवड समितीच्या भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त केली.
टीम इंडियाला (Tam India) वनडे क्रिकेटमध्ये नुकत्याच झालेल्या पराभवामुळे गोलंदाजी डिपार्टमेंटमधील त्रुटी स्पष्टपणे समोर आल्या आहेत. त्यातच मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराजसारख्या अनुभवी आणि यशस्वी गोलंदाजांना संधी न मिळाल्यामुळे निवड समितीच्या निर्णयांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. हेड कोच गौतम गंभीर आणि चीफ सिलेक्टर अजित आगरकर यांना आता या टीकांचा सामना करावा लागत आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.