

RO Water and Health Effects: आजच्या धावपळीच्या युगात भारतीय घरांमध्ये रेफ्रिजरेटर किंवा गॅस स्टोव्हइतकेच 'आर.ओ.' (Reverse Osmosis) वॉटर प्युरिफायरला महत्त्व प्राप्त झाले आहे. पिण्याच्या पाण्यातील अशुद्धता, जड धातू आणि घातक जीवाणू काढून टाकण्यासाठी आर.ओ. सिस्टिमवर लोकांचा मोठा विश्वास आहे. मात्र, गेल्या काही वर्षांपासून एक नवीन चर्चा जोर धरु लागली आहे. आर.ओ. प्रक्रियेत पाण्यातील उपयुक्त खनिजेही नष्ट होतात का? आणि असे 'मिनरल' नसलेले पाणी प्यायल्याने आरोग्यावर दीर्घकालीन परिणाम होतात का?
अनेकांना भीती वाटते की, आर.ओ. पाणी (Water) प्यायल्याने शरीरात पोषक तत्वांची कमतरता निर्माण होईल. मात्र, आरोग्य तज्ज्ञ आणि पोषणतज्ज्ञांच्या मते, ही भीती बऱ्याच अंशी गैरसमजावर आधारित आहे. जर तुमचा आहार संतुलित असेल, तर आर.ओ. पाण्यामुळे खनिजांची कमतरता भासण्याची शक्यता अत्यंत कमी असते.
आर.ओ. शुद्धीकरण प्रक्रिया एका निम-पारगम्य पडद्याद्वारे (Semi-permeable membrane) कार्य करते, जी पाण्यातील विषाणू, बॅक्टेरिया, विरघळलेले क्षार आणि शिसे किंवा आर्सेनिकसारखे जड धातू गाळून बाहेर काढते. ही प्रक्रिया इतकी सूक्ष्म असते की, अशुद्धतेसोबतच पाण्यात नैसर्गिकरित्या आढळणारे कॅल्शियम आणि मॅग्नेशियम यांसारखी खनिजेही कमी होतात. यामुळेच आर.ओ. पाणी 'अतिशुद्ध' आणि परिणामी 'कमी पोषक' असल्याचे मानले जाते. परंतु, क्लिनिकल न्युट्रिशनिस्ट पलक नागपाल यांच्या मते, पाणी हे खनिजांचे मुख्य स्त्रोत नाही.
मानवी शरीराला लागणाऱ्या एकूण खनिजांपैकी पाण्याचा वाटा अत्यंत अल्प असतो. शरीराची बहुतेक पौष्टिक गरज आपण रोज खात असलेल्या अन्नातून पूर्ण होत असते. त्यामुळे जर कोणी फळे, भाज्या, कडधान्ये आणि प्रथिनेयुक्त आहार घेत असेल, तर आर.ओ. फिल्टरेशनमुळे कमी झालेल्या खनिजांची भरपाई अन्नातून सहज होऊ शकते.
शरीराला आवश्यक असणारे कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि पोटॅशियम हे अन्नपदार्थांत मोठ्या प्रमाणात उपलब्ध असतात. उदाहरणार्थ, दुग्धजन्य पदार्थ, नाचणी, तीळ, बदाम आणि हिरव्या पालेभाज्यांतून मुबलक कॅल्शियम मिळते, जे हाडे आणि स्नायूंच्या मजबुतीसाठी आवश्यक असते. मॅग्नेशियमसाठी सुका मेवा, भोपळ्याच्या बिया, ओट्स आणि डाळींचा समावेश आहारात करता येतो.
तसेच, पोटॅशियमची गरज केळी, शहाळ्याचे पाणी आणि रताळ्यासारख्या पदार्थांतून पूर्ण होते. पलक नागपाल स्पष्ट करतात की, बहुतेक पोषक तत्वांची कमतरता ही पाण्याच्या प्रकारामुळे नाही, तर अयोग्य आहार पद्धतीमुळे निर्माण होते. ज्या व्यक्तीच्या आहारात वैविध्य नाही, त्यांनाच खनिजांच्या कमतरतेचा धोका असतो, मग ते आर.ओ. पाणी पिऊ देत किंवा विहिरीचे.
किडनी तज्ज्ञांच्या मतेही आर.ओ. पाणी आरोग्यासाठी (Health) सुरक्षित आहे. नोएडा येथील 'कैलाश हॉस्पिटल'चे नेफ्रोलॉजिस्ट डॉ. अनीश नंदा सांगतात की, आर.ओ. सिस्टिम पाणी पिण्यायोग्य बनवते, जे किडनीच्या आरोग्यासाठी महत्त्वाचे आहे. शरीर खनिजांचे नियमन करण्यासाठी किडनी आणि हार्मोन्सचा वापर करते. जोपर्यंत आपण संतुलित आहार घेत आहोत, तोपर्यंत आर.ओ. पाण्यामुळे शरीरातील 'इलेक्ट्रोलाईट' संतुलन बिघडण्याची शक्यता नसते.
आजकाल अनेक आधुनिक आर.ओ. मशीनमध्ये 'री-मिनरलायझेशन'चे तंत्रज्ञान येते, जे शुद्धीकरणानंतर पुन्हा आवश्यक खनिजे पाण्यात मिसळते. हे चवीसाठी उत्तम असले तरी, आरोग्याच्या दृष्टीने शुद्ध आणि सुरक्षित पाणी मिळणे हे सर्वात जास्त महत्त्वाचे आहे. त्यामुळे पाण्याचे शुद्धीकरण करण्यापेक्षा आपल्या रोजच्या आहारात पोषक तत्वांचा समावेश करण्यावर अधिक भर देणे हाच दीर्घकालीन आरोग्याचा खरा मंत्र आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.