Goa ancient ports history Dainik Gomantak
गोंयकाराचें मत

Kshatriya Migration: काठियावाडी क्षत्रिय समुद्रमार्गे आले, ते झुआरी नदीकाठी किनाऱ्यावरच्या खेड्यांत वसले; स्थलांतरणाचा इतिहास

Kathiawadi Kshatriya migration: व्यापारामुळे क्षत्रिय आणि किरात एकत्र आले आणि त्यांच्यामध्ये रोटीबेटी व्यवहार सुरू झाले. याच्या मध्यभागी होतं काठियावाड; इथेच जन्म झाला त्याला आपण काठियावाडी क्षत्रिय म्हणतो.

Sameer Panditrao

तेनसिंग रोद्गीगिश

व्यापारामुळे क्षत्रिय आणि किरात एकत्र आले आणि त्यांच्यामध्ये रोटीबेटी व्यवहार सुरू झाले. याच्या मध्यभागी होतं काठियावाड; इथेच जन्म झाला त्या समाजाचा ज्याला आपण काठियावाडी क्षत्रिय म्हणतो. त्याच्या उत्कर्षकाळात काठियावाड हे फक्त एकच बंदर नव्हतं; ते एक प्रचंड बंदर-संकुल होतं — आखात कच्छापासून लहान रण आणि नळ-भाळ खोरं ओलांडून आखात खांबाटपर्यंत. हेच नजीकच्या पूर्व देशांशी आणि आफ्रिकेशी व्यापाराचं मुख्य केंद्र होतं.

ते चीन ते मेसोपोटामिया या नव्या व्यापारमार्गावर वसलं होतं. हा मार्ग ईशान्येकडून भारतीय उपखंडात शिरला, ब्रह्मपुत्र-गंगा मैदानाने काठियावाडपर्यंत आला; आणि तिथून समुद्रमार्गे सिंध-मकरान किनाऱ्यावरून ओमानच्या आखातात, व पुढे तिग्रीस-युफ्रेटीस खोऱ्यात गेला.

पण काठियावाडचं वैभव फार काळ टिकून राहिलं नाही. साधारण इसवी सनाच्या सुरुवातीला वाढणाऱ्या समुद्रपातळीमुळे काठियावाड बुडालं; नेमका काळ बदलत राहतो, कारण ही भूमी अनेक वेळा पाण्याखाली गेली असल्याचं दिसतं.

जेव्हा काठियावाड बुडालं, तेव्हा व्यापाऱ्यांना स्थलांतर करावं लागलं; पण त्याची जागा घेणारं केंद्र तितकंच प्रचंड असणं आवश्यक होतं. अखेरीस एक संपूर्ण बंदरांचा पट्टा सापडल्याने शोध संपला. हा बंदरांचा पट्टा संपूर्ण कोकण किनाऱ्यावर पसरला होता. गुजरातमधील संजाण(आजच्या दमणबाहेर)पासून गोव्याच्या कुशस्थळीपर्यंत. या नव्या बंदर-शहरांमध्ये आपल्याला काठियावाड आणि नव्या वसाहतींमधील सांस्कृतिक सातत्याचे पुरातत्त्वीय व सांस्कृतिक पुरावे आढळतात.

असं शक्य आहे की काही काठियावाडी क्षत्रिय, वाढत्या समुद्रपातळीपासून पळून, समुद्रमार्गे गोव्याच्या किनाऱ्यावर आले, आणि त्यांनी इथे अशी जागा पाहिली जी त्यांच्या मागे सोडलेल्या मातृभूमीसारखीच दिसत होती.

तशीच सुपीक जमीन, दाट झाडं, भरपूर पाणी, आणि सुरक्षित बंदर असलेली त्यांना हवी होती तशी जागा होती. म्हणून त्यांनी या नव्या सापडलेल्या जागेसही आपल्या जुन्या स्थानांची नावे दिली. त्यांनी या ठिकाणाला कुशस्थळी असं नाव दिलं. त्यांनी आजूबाजूच्या खेड्यांमध्ये वस्ती केली. साकवाळ (शंखवाळ) ज्याचं नाव त्यांनी शंखोधरवरून दिलं; केळशी, लोटली, कुठ्ठाळी (कुशस्थळी) इत्यादी. त्यांनी समुद्री व्यापाराच्या आपल्या परंपरेनुसार इतर बंदरेही उभारली.

आपल्याला निश्चितपणे झुआरी खाडीतल्या आणखी एका बंदराची माहिती आहे; ते म्हणजे गोपकपट्टण, म्हणजेच आताचे गोवा वेल्हा!

२०१५मध्ये राष्ट्रीय समुद्रशास्त्र संस्थेतील (छखज) समुद्री पुरातत्त्वज्ञांनी झुआरी नदीलगत १.२ किमी लांबीची भिंत उघड केली, जी एका जुन्या बंदराचा भाग असावी असा तर्क होता. संशोधकांच्या मते तिची रचना गुजरातमधील ४,५०० वर्षे जुन्या लोथल या गोदीसारखी होती. दुर्दैवाने, आपण तिला पुन्हा गाळाखाली पुरलं आणि ११व्या शतकातील कदंब बंदर म्हणून इतिहासाच्या कचऱ्याच्या टोपलीत टाकून दिलं.

झुआरी नदीच्या दक्षिण काठावर अनेक बंदरं असावीत. त्यापैकी पहिलं कदाचित लोटली होतं. इथे प्राचीन बंदराचे पुरातत्त्वीय अवशेष नाहीत. पण इथे बंदर असावं असा अंदाज देवी कामाक्षीच्या आख्यायिकेने बांधता येतो. त्यात सांगितलं जातं की जेव्हा एका जहाजातून माल उतरवला जात होता, तेव्हा भार म्हणून आणलेल्या गोपिचंदन दगडांपैकी एका दगडात कामाक्षीची मूर्ती सापडली.

सर्वांत मोठं बंदर कदाचित राशाल (रायतूर) होतं. बेटासारख्या रचनेमुळे आजही ते ठिकाण लोथलसारखंच मोठ्या बंदराची आठवण करून देतं. कुडतरी येथे एक लहान बंदर असावं.

आपल्याला हे माहीत नाही की सर्व काठियावाडी क्षत्रिय एकाच वेळी स्थलांतरित झाले, वेगवेगळ्या कालखंडात त्यांचे स्थलांतर झाले. तसेच सर्वजण समुद्रमार्गेच आले की नाही हेही ठाऊक नाही. पण जे झुआरी नदीकाठी किनाऱ्यावरच्या खेड्यांत वसले, ते बहुधा समुद्रमार्गे आले असावेत. नंतर ते हळूहळू ते गोव्याच्या आंतरिक भागांत पसरले असावेत. परंपरेनं सांगितलं जातं की काही कुटुंबं कुठ्ठाळीतून लोटलीला, तर काही लोटलीहून परोडा-चिंचोणेकडे स्थलांतरित झाली.

आजपर्यंत आपण पाहिलेल्या पुराव्यांवरून एक साधी कथा उभी राहते : काठियावाडी चाड्डी गोव्याच्या विविध व्यापारकेंद्रांमध्ये वसले. पण आज ते तिथे दिसत नाहीत. मग ते कुठे गेले? इथे मी एक तर्क मांडतो :

काठियावाडी चाड्डी कुशस्थळी व झुआरी खोऱ्यातील गावांतून आपली जमीन ब्राह्मणांना देऊन, शेजारच्या किनारी गावी — वेळसांव, कासावली, अरसोळे, उतोर्डा, माजोर्डा, बेतालभाटीम, गावंडोळी, सेरावली व बाणावली येथे स्थलांतरित झाले. आणि आज आपण त्यांना तिथेच पाहतो. त्यांची शारीरिक वैशिष्ट्ये इतर चाड्ड्यांपेक्षा वेगळी आहेत. अगदी अलीकडेपर्यंत ते इतरांत मिसळत नव्हते, रोटीबेटी व्यवहार नव्हता.

गोव्यातील ख्रिस्ती चाड्डी आणि हिंदू मराठा यांचा मोठा भाग मात्र दख्खन क्षत्रियांतून आलेला आहे. ते सह्याद्रीपलीकडच्या दुष्काळामुळे किनाऱ्यावर आले होते आणि ते काठियावाडी चाड्डी येण्याआधीच इथे वसले होते.

शेवटी आले ते ब्राह्मण. कॅव्हाली-स्वोरझा आणि इतर संशोधकांच्या कामावरून गाडगीळ यांचा निष्कर्ष असा की ते साधारण इ.स.पू. २००० च्या आसपास भारतीय उपखंडात आले.

ते युरेशियन मैदानावरील शिकारी-मेघारी-पालक लोक (यमनया समाज) होते, जे खैबर खिंडीतून भारतीय उपखंडात आले. (संदर्भ : नरसिंहन, २०१९ : द फॉर्मेशन ऑफ ह्युमन पॉप्युलेशन्स इन साउथ अँड सेंट्रल एशिया, साइन्स)

ते सरस्वती खोऱ्यात गेले, तेव्हा तेथील संस्कृती आधीच नष्ट झालेली होती. परिणामी त्यांनी यमुना खोऱ्याकडे स्थलांतर केलं, मग गंगा-यमुना दोआबात आले. तिथून काही पुढे दख्खन व तामिळनाडूत गेले — हेच देशस्थ ब्राह्मण आणि तामिळ ब्राह्मण. पण त्यांपैकी काहींनी सरस्वती खोऱ्यातून दक्षिण-पश्चिमेकडे वळून कोकण किनाऱ्यावर, विशेषतः गोव्यात, येऊन वस्ती केली. हेच आहेत सारस्वत ब्राह्मण.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

भारताची अणुऊर्जेत मोठी झेप! कल्पक्कममध्ये 'फास्ट ब्रीडर रिएक्टर' यशस्वी, PM मोदींकडून अभिनंदन; होमी भाभांचे स्वप्न साकार

Supreme Court: रागाच्या भरात दिलेली शिवी गुन्हा ठरणार नाही! 'बास्टर्ड' शब्दावरुन झालेली शिक्षा सर्वोच्च न्यायालयाने केली रद्द; नेमकं प्रकरण काय?

Cricket Record: दोन दिग्गज, एक संघ, दशकांचा काळ! 90 टेस्ट आणि 307 वनडे सामने एकत्र खेळले; पण 'या' बहाद्दरांची जोडी बॅटिंगसाठी कधीच जमली नाही

इशानचा 'ड्रग्‍स कॉकटेल' मुळेच मृत्‍यू, पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये धक्कादायक खुलासा! शरीरात 5 अमलीपदार्थांचे अंश

Air India Ticket Price Hike: एअर इंडियाचा 'हाय व्होल्टेज' झटका! 8 एप्रिलपासून विमान प्रवास महागणार, फ्यूल सरचार्जमध्ये मोठी वाढ; जाणून घ्या किती वाढले भाडे

SCROLL FOR NEXT