Goa Ecosystem Dainik Gomantak
गोंयकाराचें मत

Goa Ecosystem: शेती विकली, डोंगर फोडले अन् संस्कार विसरले! नव्या पिढीच्या चंगळवादामुळे 'आमचा गोवा' परक्यांच्या हाती

Goa Natural Ecosystem: डोंगर कापून आणि नैसर्गिक पाणवठे बुजवून तिथे मोठमोठ्या इमारती, इमले आणि संकुले उभी राहू लागली. वाळू उत्खनन करून नदीची पात्रे अनैसर्गिक झाली.

दैनिक गोमन्तक डिजिटल

जयराम रेडकर

इथे येणारे देशी विदेशी पर्यटक माघारी जाताना वाईट अनुभव घेऊन जातात आणि पुन्हा गोव्यात न येण्याची शपथ घेतात. त्यांच्याकडून समाजमाध्यमांवर गोव्याची बदनामी केली जाते. हे असेच घडत राहिले तर नजीकच्या काळात गोव्याच्या पर्यटन क्षेत्रावर प्रतिकूल परिणाम होईल.

गोवा पोर्तुगीज राजवटीतून मुक्त झाला त्याचा आनंद आता ओसरत चालला आहे. मुक्तीनंतरच्या सहा दशकांत गोवा आमूलाग्र बदलून गेला आहे. शांत, सुंदर, नैसर्गिक सौंदर्याने नटलेला आणि सुशेगाद वृत्तीने जीवन व्यतीत करणारा, धर्मभेद, जातिभेद ठरावीक मर्यादेत बाळगणारा, पै पाहुण्यांचे आनंदाने स्वागत करणारा, भजन-पूजन-कीर्तन यात रमणारा, संगीत, नाटक, तियात्र यांचा मनसोक्त आनंद लुटणारा, धार्मिक तेढ कधीच निर्माण न करणारा, एकमेकांच्या धार्मिक उत्सवात उत्साहाने सामील होणारा, शेजाऱ्याच्या कठीण प्रसंगी आपुलकीने मदतीला धावून जाणारा, कायद्याची भीती बाळगणारा असा हा प्रदेश पूर्वीसारखा राहिलेला नाही हे कटू सत्य आहे.

याला कारण येथील माणसाची वृत्ती सात्विकतेकडून भोगवादाकडे झुकली आहे हे आहे. शेजारच्या घरात ज्या सुख-सुविधा आहेत त्या आपल्याही घरात हव्यात असा हव्यास वाढीस लागला. त्यासाठी कोणताही मार्ग स्वीकारण्याची तयारी ठेवली जाऊ लागली. अहंगंड आणि ईर्शा यातून गुन्हेगारीचा जन्म होतो तोच प्रकार इथेही घडला. भांडण-तंटे, मारामाऱ्या, खून यात झपाट्याने वाढ झाली. शांत, सुंदर असणारा गोवा अशांत आणि क्रूर बनला. हा सगळा झालेला बदल पाहून मनाला असंख्य इंगळ्या डसल्याच्या वेदना होतात आणि उद्वेगाने वाटते , गोवा पोर्तुगिजांच्या ताब्यात होता तेच बरे होते.

१९६२-६३ साली लोकनियुक्त सरकार स्थापन झाले आणि प्रजासत्ताक राजवटीचा एक अंग बनले. त्यावेळी सरकारी शाळेत मराठी माध्यमातून शिकलेल्या पहिल्या पिढीने आज वयाची सत्तरी पार केलेली आहे. त्यावेळी त्यांच्यावर झालेले संस्कार अबाधित असले तरी गेल्या पंचवीस वर्षात तयार झालेली पिढी ‘जुने जाऊ द्या मरणालागुनी’ अशा वृत्तीची झाली आहे. दुसऱ्याबद्दल आत्मीयता, आदरभाव, नाते संबंधातील आस्था, प्रेम आणि जिव्हाळा यांचा लोप झाला. कमीत कमी वेळात आणि विनाकष्टात जास्तीत जास्त पैसा मिळावा आणि मस्तीत जगावे अशी चंगळवादी धारणा या नव्या पिढीची झालेली आहे.

शिक्षणाच्या कक्षा विस्तारल्या परंतु माणुसकी आक्रसली. माणसापेक्षा पैसा श्रेष्ठ ठरला. चंगळवाद हेच जीवनाचे अंतिम ध्येय झाले. अनेक कारणांनी संस्कारांची घडी विस्कटत गेली. पारंपरिक व्यवसाय परराज्यातील लोकांच्या घशात कधी गेले हे कळलेच नाही. पूर्वजांनी जपलेली शेतीवाडी, बागायतीचे रूपांतरण करण्यात ही पिढी धन्यता मानू लागली. डोंगर कापून आणि नैसर्गिक पाणवठे बुजवून तिथे मोठमोठ्या इमारती, इमले आणि संकुले उभी राहू लागली. वाळू उत्खनन करून नदीची पात्रे अनैसर्गिक झाली. वृक्षतोड होऊन निसर्गाने दिलेली शुद्ध हवेची देणगी क्रूरपणे ओरबाडली गेली. पर्यावरणाचा असा र्‍हास झाला. जंगलेच नष्ट झाल्याने जंगलवासी प्राणी बेघर झाले आणि ते लोकवस्तीत येऊ लागले. निसर्गाचा तोल बिघडून गेल्याचे हे लक्षण म्हणावे लागेल.

माणसातील स्वार्थीपणा कमालीचा वाढला. स्वार्थीपणाचे एक उदाहरण आजच समोर आले. कार्यानुभव आणि कृतिसत्रासाठी केरळ येथील एक विद्यार्थी गट काही दिवसांसाठी गोव्यात आला होता. अगदी मोजके पैसे घेऊन असे गट गोव्यात येत असतात. इथल्या एखाद्या वसतिगृहात ते राहतात. संध्याकाळी मोकळ्या वेळात फिरण्यासाठी बाहेर पडतात. फिरता फिरता त्यांना उशीर होतो. प्रदेश नवीन, स्थानिक भाषेचे अज्ञान, कुठून कुठे कसे जायचे याची माहिती नाही; या त्यांच्या असहाय्यतेचा गैरफायदा रिक्षावाले आणि टॅक्सीवाले उठवतात आणि त्यांच्याकडून दामदुप्पट भाडे उकळतात. असाच एक गट पणजी येथील बाजारपेठेत आला असता त्यांना खरेदी करताकरता आठ वाजले.

त्यांना आपल्या दोनापावला येथील वसतिगृहात परतायला उशीर झाला. परत कसे जायचे हा प्रश्न त्यांना पडला. त्यांनी एका टॅक्सीवाल्यांशी संवाद साधला. त्याने पणजी मार्केटमधून दोनापावलाला जाण्यासाठी आठशे रुपये भाडे सांगितले. ’आता तुम्हाला बस मिळणार नाही’ अशी त्यांना खोटी भीती घातली. जे अंतर पाच सहा किलोमीटर होते आणि ज्याचे बसभाडे प्रत्येकी केवळ वीस रुपये होते त्याला या टॅक्सीचालकाने भरमसाठ भाडे सांगितले. अडलेल्या माणसाची अशी फसवणूक करणे गोमंतकीय संस्कृतीचा हिस्सा कधीच नव्हता. आज जागोजागी हाच अनुभव दृष्टीस पडतो. अगदी भाजी व फळे विक्रेत्यापासून ते सुपर मार्केट किंवा मॉलपर्यंत ग्राहकांना लुटणे हाच अनुभव येतो. याचा फटका पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकांना किंवा अभ्यासासाठी आलेल्या विद्यार्थ्यांनाच बसतो असे नाही तर तो स्थानिकांनाही बसतो.

इथे येणारे देशी विदेशी पर्यटक माघारी जाताना वाईट अनुभव घेऊन जातात आणि पुन्हा गोव्यात न येण्याची शपथ घेतात. त्यांच्याकडून समाजमाध्यमांवर गोव्याची बदनामी केली जाते. हे असेच घडत राहिले तर नजीकच्या काळात गोव्याच्या पर्यटन क्षेत्रावर प्रतिकूल परिणाम होईल. अर्थात पर्यायाने याचा परिणाम बाजारपेठेवरदेखील दिसून येईल. गोव्यातील खाण व्यवसाय बंद झाल्यानंतर पर्यटनक्षेत्र हाच इथल्या राज्याचा आर्थिक कणा बनला आहे. तोच मोडून पडला तर काय होईल याचा कुणीही विचार करीत नाही. अशा प्रकारे आपणच आपल्या पायावर धोंडा मारून घेत असतो किंवा आपणच आपल्या घराला चूड लावीत असतो. सरकारने अशा गोष्टींची गांभीर्याने दखल घेऊन फसवणूक करणाऱ्या सर्वांनाच जरब बसेल अशी कारवाई करणे आवश्यक आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Water Supply Shortage: 24 तास पाण्याचं आश्वासन हवेत विरलं! सासष्टी तालुक्यात तक्रारींचा पाऊस, नागरिक पाण्यासाठी व्याकूळ

रणवीरची अ‍ॅक्शन अन् मोदींचा स्वॅग! 'धुरंधर 2' मधील पंतप्रधानांच्या एन्ट्रीवर चित्रपटगृहात जल्लोष अन् टाळ्यांचा कडकडाट VIDEO

Viral Video: 'हे इराण-इस्रायल युद्ध नाही तर...', पंजाबी फॅमिलीचा फूल टू ड्रामा, सोशल मीडियावर व्हिडिओ तूफान व्हायरल; काय घडलं नेमकं?

Goa Drug Case: मोठा गाजावाजा, पण पुरावा शून्य! 43 कोटींचे ड्रग्ज रॅकेट हवेत विरले; पुराव्याअभावी वास्कोतील वाडेकर दांपत्यासह चौघांची निर्दोष मुक्तता

Bicholim Crime: डिचोलीतील 'त्या' अमानुष हत्यांनी हादरला 'गोवा'! 10 महिन्यात 4 निर्दयी खून; दोन चिमुकले आणि दोन महिलांचे बळी

SCROLL FOR NEXT