India Slams Pakistan in UN: संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या व्यासपीठावर भारताने पाकिस्तानची नाचक्की करत त्यांचे दहशतवादाचे खोटे दावे उधळून लावले. भारताचे संयुक्त राष्ट्रातील स्थायी प्रतिनिधी पर्वतनेनी हरीश यांनी पाकिस्तानच्या 'ऑपरेशन सिंदूर'शी संबंधित खोट्या प्रचाराचा पर्दाफाश केला आणि पाकिस्तानच्या दूताने गेल्या वर्षी मे महिन्यात सादर केलेली माहिती पूर्णपणे चुकीची असल्याचे सिद्ध केले. यावेळी भारताने अतिशय कठोर शब्दांत पाकिस्तानला कायदा आणि सुव्यवस्थेचे पालन करण्याचा सल्ला दिला. एवढच नव्हेतर स्वतःचे हित जपण्यासाठी भारत कोणत्याही थराला जाऊ शकतो, असा स्पष्ट संदेशही दिला.
या संघर्षाची पार्श्वभूमी मांडताना पर्वतनेनी हरीश यांनी स्पष्ट केले की, एप्रिल 2025 मध्ये पहलगाममध्ये पाकिस्तान (Pakistan) समर्थित दहशतवाद्यांनी अत्यंत क्रूर हल्ला केला होता, ज्यामध्ये 26 निष्पाप नागरिकांना आपला जीव गमवावा लागला होता. खुद्द संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेने या निंदनीय दहशतवादी कृत्यातील गुन्हेगारांना कठोरात कठोर शिक्षा देण्याची मागणी केली होती.
भारताने केलेली लष्करी कारवाई ही केवळ त्या मागणीची पूर्तता आणि स्वसंरक्षणासाठी उचललेले पाऊल होते. भारताची ही कारवाई अत्यंत विचारपूर्वक आणि जबाबदारीने केलेली होती, ज्याचा उद्देश केवळ दहशतवादी पायाभूत सुविधा नष्ट करणे आणि शत्रूला निष्क्रिय करणे हाच होता, असे भारताने जागतिक व्यासपीठावर ठामपणे सांगितले.
पाकिस्तानने भारतावर लष्करी विजय मिळवल्याचा जो आभासी दावा केला होता, तो भारताने पुराव्यांसह फेटाळून लावला. हरीश यांनी नमूद केले की, 9 मे पर्यंत पाकिस्तान भारताला धमक्या देत होता, मात्र 10 मे रोजी पाकिस्तानी सैन्याने थेट भारतीय लष्कराला फोन करुन युद्ध थांबवण्याची विनंती केली होती. भारताच्या प्रतिहल्ल्यात पाकिस्तानच्या अनेक एअरबेसचे प्रचंड नुकसान झाले असून उद्ध्वस्त झालेले धावपट्टी (Runway) आणि जळालेले हँगर याची छायाचित्रे सार्वजनिकरित्या उपलब्ध आहेत. पाकिस्तानचा पराभव जगासमोर असतानाही ते 'विजयी' झाल्याचा जो खोटा नरेटिव्ह पसरवत आहेत, त्याला भारताने चोख प्रत्युत्तर दिले.
दहशतवादाला 'न्यू नॉर्मल' किंवा सामान्य घटना म्हणून पाहण्याच्या पाकिस्तानच्या वृत्तीवर भारताने तीव्र प्रहार केला. हरीश म्हणाले की, पाकिस्तानने कितीही प्रयत्न केले तरी दहशतवादाला कधीही सामान्य मानले जाऊ शकत नाही. सुरक्षा परिषदेचा निवडून आलेला सदस्य असूनही पाकिस्तानचा एकमेव अजेंडा केवळ भारताचे नुकसान करणे हाच आहे, ही अत्यंत खेदजनक बाब आहे. जम्मू-काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग होता, आहे आणि सदैव राहील, असे सांगून भारताने पाकिस्तानला भारताच्या अंतर्गत विषयात ढवळाढवळ न करण्याचा सक्त इशारा दिला.
सिंधु जल कराराबाबत भारताने (India) घेतलेली भूमिका आता अधिक कठोर झाली आहे. ६५ वर्षांपूर्वी भारताने सद्भावनेतून हा करार केला होता, परंतु पाकिस्तानने वारंवार युद्धे आणि दहशतवादी हल्ल्यांच्या माध्यमातून या कराराच्या भावनेचा अपमान केला आहे. साडेसहा दशकांत पाकिस्तानने भारतावर तीन युद्धे लादली आणि हजारो दहशतवादी हल्ले घडवून आणले, ज्यामध्ये हजारो भारतीयांचा बळी गेला.
जोपर्यंत पाकिस्तान दहशतवादाचे जागतिक केंद्र राहणे थांबवत नाही आणि सीमापार दहशतवाद पूर्णपणे नष्ट करण्याचे विश्वासार्ह पाऊल उचलत नाही, तोपर्यंत सिंधु जल करार निलंबित राहील, अशी ऐतिहासिक घोषणा भारताने केली आहे. भारताने आपल्या नागरिकांच्या संरक्षणासाठी जे आवश्यक असेल ते करण्याची आपली वचनबद्धता पुन्हा एकदा अधोरेखित केली आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.