

अहमदाबाद: पराभूत होण्याची भीती बाळगली, तर विजय कधीच मिळवू शकत नाही. तसेच संघात वैयक्तिक विक्रम नव्हे, तर करंडकासाठीच खेळण्याला प्रधान्य आहे, हेच प्रशिक्षक म्हणून आपला मंत्र आहे, असे स्पष्ट मत भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी व्यक्त केले.
नरेंद्र मोदी स्टेडियमवर रविवारी झालेल्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडचा धुव्वा उडवून टी-२० विश्वकरंडक स्पर्धेचे विजेतेपद मिळवणाऱ्या भारतीय संघाचे प्रशिक्षक गंभीर भरभरून आणि रोखठोकपणे बोलले. सामन्यानंतरचही कर्णधार सूर्यकुमार यादवसोबतची ही पत्रकार परिषद भारतीय संघाची धोरणे स्पष्ट करणारी होती.
टी-२० प्रकारात माझी आणि सूर्याची विचारधारा एकदम स्पष्ट आहे. आम्ही कधीही वैयक्तिक विक्रमाला प्राधान्य देत नाही. आम्ही केवळ विचार करंडक जिंकण्याचाच करत असतो, असे गंभीर म्हणाले. वैयक्तिक विक्रमांचा जल्लोष करणे थांबवा आणि करंडक जिंकल्याचा आनंद साजरा करा. कारण संघ म्हणून खेळतो, तेव्हा केवळ करंडक जिंकणे हेच ध्येय असते. तुम्ही वैयक्तिक किती धावा केल्यात, हे माझ्यासाठी महत्त्वाचे नसते, असे गंभीर म्हणाले.
तुम्ही ९४ धावांवर खेळत आहात आणि एकेरी धाव घेत शतक पूर्ण करण्यास वेळ घेतला, तर तुम्ही संघाचा विचार करत नसता. कारण तुमचा असा प्रयत्न किमान २० धावा कमी करणारा असतो, अशा वेळी एका फटक्यात शतक केले, तर ते संघासाठीही फायद्याचे असते, असे रोखठोक विधान गंभीर यांनी केले. त्यामुळे माझा आणि सूर्यकुमारचा विचार एकाच पातळीवरचा आहे.
सांगणाऱ्या गंभीर यांनी स्वतः खेळत असताना कधीही वैयक्तिक विक्रमाला प्राधान्य दिले नाही. २००७ मधील टी-२० विश्वकरंडक स्पर्धेत पाकिस्तानविरुद्धच्या अंतिम सामन्यात ७५ धावांची खेळी केली होती, तर २०११ मधील एकदिवसीय विश्वकरंडकाच्या अंतिम लढतीत ९७ धावांवर विकेट गमावली तरी त्याचे दुःख त्यांना नव्हते.
गंभीर यांनी संजू सॅमसनचे उदाहरण दिले. संधी मिळताच वेस्ट इंडीजविरुद्ध तो वैयक्तित जागा राखण्यासाठी खेळला नाही. त्यानंतर उपांत्य आणि अंतिम सामन्यातही शतक नजरेच्या टप्प्यात आल्यानंतरही त्याने फटकेबाजी कायम ठेवली. सॅमसनने या तीन सामन्यांत ९७ नाबाद, ८९ आणि ८९ धावा केल्या. या तिन्ही वेळी सॅमसनने शतकाला प्राधान्य दिले असते, तर आम्हाला अपेक्षित धावांपर्यंत मजल मारता आली नसती, असे गंभीर यांनी उदाहरणासह स्पष्ट केले.
सोशल मीडिया मी फॉलो करत नाही. तुम्ही म्हणता माझ्यावर टीका होत असते, परंतु मला त्याची पर्वा नाही. कारण माझी बांधिलकी सोशल मीडियाशी नव्हे, तर संघात असलेल्या खेळाडू आणि सपोर्ट स्टाफ अशा ३० जणांशी आहे. माझ्यासाठी हे महत्त्वाचे आहे, असे गंभीर यांनी आपल्या शैलीत सांगितले. मी आता प्रशिक्षक म्हणून टी-२० करंडक जिंकलाय तरी या पुढेही माझ्यासाठी हेच ३० जण महत्त्वाचे आहेत. सोशल मीडियावर काय व्यक्त केले जाते, हे मी पाहत नाही आणि त्याचा विचारही करत नाही, असेही गंभीर म्हणाले.
हे विजेतेपद अगोदरचे प्रशिक्षक राहुल द्रविड आणि राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत पडद्यामागे अथक काम करणाऱ्या व्ही. व्ही. एस. लक्ष्मण यांना अर्पण करत असल्याचे गंभीर यांनी खुल्या मनाने सांगितले. द्रविड यांनी ज्युनियर क्रिकेटपासून ते थेट सीनियर संघापर्यंत उत्तम रचना केली. तर लक्ष्मण अकादमीत खेळाडूंवर फार मेहनत घेत आहेत. यांच्यासोबत निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर यांनाही श्रेय द्यायला हवे, असा उल्लेख गंभीर यांनी केला. दरम्यान, गौतम गंभीर यांच्या मार्गदर्शनामध्ये २०२५मध्ये भारतीय क्रिकेट संघाने चॅम्पियन्स करंडकाच्या जेतेपदावरही मोहर उमटवली होती.
सामना हरण्याची भीती बाळगायची नाही. अशी भीती बाळगली, तर जिंकता येणार नाही. म्हणूनच विजयाचीच मानसिकता ठेवायची, असे धोरण मी संघात राबवत आहे. १५० ते १६०ची इनिंग आपल्याला खेळायची नाही. थेट २५० धावांचे लक्ष्य ठेवायचे. त्यासाठी एखाद्या सामन्यात १०० धावांच्या आत बाद झालो तरी बेहत्तर, परंतु ध्येय मोठेच असायला हवे, असे गंभीर यांनी सांगितले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.