

Najam Sethi Pakistan Nuclear Policy: पाकिस्तानचे प्रसिद्ध पत्रकार आणि राजकीय विश्लेषक नजम सेठी यांनी पाकिस्तानच्या अण्वस्त्र धोरणाबाबत अत्यंत खळबळजनक दावे केले. एका टीव्ही मुलाखतीत बोलताना सेठी यांनी स्पष्ट केले की, पाकिस्तानचा अणुबॉम्ब हा कोणताही 'इस्लामिक बम' नसून ते पूर्णपणे भारताला केंद्रस्थानी ठेवून तयार करण्यात आलेले एक 'अँटी-इंडिया' हत्यार आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे दक्षिण आशियातील सामरिक सुरक्षेबाबत पुन्हा एकदा चर्चांना उधाण आले.
नजम सेठी यांनी 'दुनिया न्यूज' वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत हा मोठा खुलासा केला. ते म्हणाले की, पाकिस्तानने अद्याप अण्वस्त्रांच्या 'नो फर्स्ट यूज' या आंतरराष्ट्रीय करारावर स्वाक्षरी केलेली नाही आणि पाकिस्तानने या करारावर कधीही स्वाक्षरी करु नये, असे त्यांचे मत आहे.
सेठी यांच्या दाव्यानुसार, "आंतरराष्ट्रीय समुदाय आणि भारत सातत्याने पाकिस्तानवर दबाव आणत आहेत की, पाकिस्तानने अण्वस्त्रांचा प्रथम वापर न करण्याचे आश्वासन द्यावे. मात्र, पाकिस्तानला वाटते की जर त्यांनी असे आश्वासन दिले, तर त्यांची संरक्षणात्मक ताकद कमकुवत होईल. भारतासमोर (India) पाकिस्तान स्वतःला असुरक्षित समजतो आणि म्हणूनच अण्वस्त्रे हेच त्यांचे शेवटचे संरक्षण कवच आहे."
मुलाखतीदरम्यान सेठी यांनी पाकिस्तानच्या मनातील सर्वात मोठी भीती उघडपणे बोलून दाखवली. त्यांच्या मते, पारंपारिक युद्धात पाकिस्तान भारतासमोर कधीही टिकू शकत नाही. सेठी म्हणाले, "जर भारताने पारंपारिक शस्त्रास्त्रांनी पाकिस्तानवर मोठा हल्ला केला, तर पाकिस्तानकडे स्वतःचा बचाव करण्यासाठी अण्वस्त्रे वापरण्याशिवाय दुसरा कोणताही मार्ग उरणार नाही. जेव्हा देशाचे अस्तित्व धोक्यात येते, तेव्हा पाकिस्तानला अण्वस्त्र हल्ला करण्याचा पूर्ण अधिकार आहे."
त्यांनी पुढे असेही स्पष्ट केले की, पाकिस्तानला इस्रायल किंवा अमेरिकेपासून कोणताही धोका नाही. त्यामुळे हे अण्वस्त्र केवळ भारताच्या लष्करी ताकदीला प्रत्युत्तर देण्यासाठीच तयार करण्यात आले आहे.
नजम सेठी यांनी पाकिस्तानवर असलेल्या जागतिक दबावाचे आणखी एक कारण सांगितले. पाकिस्तान (Pakistan) सध्या गंभीर आर्थिक संकटातून जात आहे. अशा परिस्थितीत पाकिस्तान आपले अण्वस्त्र तंत्रज्ञान एखाद्या श्रीमंत इस्लामिक देशाला विकू शकतो, अशी भीती जगातील शक्तिशाली देशांना सतावत आहे.
सेठी म्हणाले, "जोपर्यंत पाकिस्तानकडे अण्वस्त्रे आहेत, तोपर्यंत जगाला हे दडपण राहील की पाकिस्तान आर्थिक फायद्यासाठी या तंत्रज्ञानाचा सौदा करु शकतो. याच भीतीपोटी पाकिस्तानच्या अण्वस्त्र हालचालींवर जगाची करडी नजर असते आणि त्यांच्यावर सतत दबाव आणला जातो."
नजम सेठींसारख्या ज्येष्ठ पत्रकाराने जेव्हा अशा प्रकारे अण्वस्त्रांच्या प्रथम वापराचे समर्थन केले, तेव्हा भारतासाठी हे चिंतेचे कारण ठरते. भारताचे धोरण 'नो फर्स्ट यूज' असे असताना पाकिस्तानची ही 'फर्स्ट यूज' वृत्ती सीमावर्ती भागात कोणत्याही वेळी अण्वस्त्र युद्धाचा धोका निर्माण करु शकते, असे संरक्षण तज्ज्ञांचे मत आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.