India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्र क्षमतेबाबत तसेच लष्करी सामर्थ्याबाबत एका अमेरिकन थिंक टँकने अत्यंत महत्त्वाचा आणि मोठा दावा केला. 'फेडरेशन ऑफ अमेरिकन सायंटिस्ट्स' या संस्थेने जारी केलेल्या ताज्या अहवालानुसार, भारताच्या अण्वस्त्र शस्त्रागारात सध्या सुमारे 190 अण्वस्त्रे सज्ज असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला. यामध्ये सध्या निर्मितीधीन असलेल्या नव्या क्षेपणास्त्रांसाठी विशेषत्वाने तयार करण्यात आलेल्या 30 अतिरिक्त अण्वस्त्रांचाही समावेश आहे.
ओपन सोर्स माहिती, सरकारी आकडेवारी आणि व्यावसायिक सॅटेलाइटद्वारे मिळालेल्या छायाचित्रांच्या सखोल विश्लेषणाच्या आधारे हा अहवाल तयार करण्यात आला. 2026 मधील जागतिक अण्वस्त्रांच्या ताज्या आकडेवारीनुसार, भारत आपल्या अण्वस्त्रांचा ताफा अधिक आधुनिक, मजबूत आणि प्रगत बनवण्यावर सातत्याने भर देत आहे.
अहवालातील माहितीनुसार, भारताकडे (India) सध्या अण्वस्त्रे वाहून नेण्यास सक्षम असलेल्या 9 वेगवेगळ्या ऑपरेशनल प्रणाली अस्तित्वात आहेत. यामध्ये 2 प्रकारची लढाऊ विमाने, जमिनीवरुन डागली जाणारी 6 बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे आणि समुद्रातून म्हणजेच पाणबुडीवरुन डागल्या जाणाऱ्या 1 बॅलिस्टिक क्षेपणास्त्राचा समावेश आहे. याशिवाय किमान 2 नवीन प्रगत क्षेपणास्त्र प्रणाली जवळपास पूर्णपणे सज्ज आणि तैनात होण्याच्या मार्गावर आहेत.
भारताने आपल्या तिन्ही दलांमधील अण्वस्त्रवाहू यंत्रणा अधिक सक्षम आणि आधुनिक बनवली आहे. अहवालानुसार, भारताने 140 ते 225 अण्वस्त्रे बनवण्यासाठी पुरेसे लष्करी दर्जाचे प्लुटोनियम तयार केले असून, त्यापैकी सुमारे 190 अण्वस्त्रे पूर्णपणे तयार स्थितीत ठेवली असण्याची शक्यता आहे. मात्र, भारताने आपल्याकडील सर्व प्लुटोनियमचा वापर लगेच न करता काही भाग रिझर्व्ह ठेवला असण्याची शक्यता वर्तवण्यात आली.
एकीकडे अण्वस्त्रांची क्षमता आणि क्षेपणास्त्रांची रेंज वेगाने वाढवत असतानाच, भारताने अण्वस्त्रांबाबतच्या आपल्या मूलभूत धोरणात कोणताही बदल केलेला नाही. भारत आजही आपल्या 'नो-फर्स्ट-यूज' म्हणजेच अण्वस्त्रांचा 'आधी वापर न करण्याच्या' ऐतिहासिक आणि जबाबदार धोरणावर ठाम आहे. भारत सरकारने नुकतेच संसदेत स्पष्ट केले होते की, देशाच्या सुरक्षेसाठी एक विश्वासार्ह आणि किमान अण्वस्त्र प्रतिबंधक क्षमता (Credible Minimum Deterrence) बाळगणे आणि 'नो-फर्स्ट-यूज' तत्त्वाचे पालन करणे यासाठी भारत पूर्णपणे वचनबद्ध आहे. थोडक्यात सांगायचे तर, भारत स्वतःहून कोणत्याही देशावर पहिला अण्वस्त्र हल्ला करणार नाही, परंतु देशाच्या सार्वभौमत्वावर आणि सुरक्षेवर कोणतीही आच आल्यास चोख प्रत्युत्तर देण्यासाठी भारताचे अण्वस्त्र शस्त्रागार पूर्णपणे सज्ज आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.