Bilawal Bhutto on Terrorism: पाकिस्तानचे माजी परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो झरदारी यांनी पहलगाम हल्ल्याबाबत मोठी कबुली दिली आहे. बिलावल भुट्टो यांनी भारतीय पत्रकार करण थापर यांना दिलेल्या मुलाखतीत पहलगाम हा दहशतवादी हल्ला होता असे कबूल केले. भुट्टो म्हणाले की, त्या हल्ल्यातील बळींचे दुःख मी समजू शकतो.
यासोबतच भुट्टो यांनी लष्कर-ए-तैयबा आणि जैश-ए-मोहम्मद सारख्या दहशतवादी संघटना पाकिस्तानात अस्तित्वात असल्याचेही कबूल केले. परंतु त्यांनी पहलगाम हल्ल्याला पाकिस्तान सरकार आणि लष्कराचा पाठिंबा असल्याचे नाकारले. त्यांनी असेही म्हटले की, आम्ही यापूर्वीही या संघटनांवर कारवाई केली आहे.
दरम्यान, पहलगाम दहशतवादी हल्ल्यात पाकिस्तानचा (Pakistan) हात असल्याचा दावा बिलावल भुट्टो यांनी फेटाळून लावला. ते म्हणाले की, 'पाकिस्तान दहशतवादाला पाठिंबा देत नाही. पाकिस्तान कोणत्याही दहशतवादी गटाला त्याच्या सीमेत किंवा बाहेर दहशतवादी कारवाया करण्यास परवानगी देत नाही. उलट, पाकिस्तान स्वतः दहशतवादाचा शिकार ठरला आहे.'
ते पुढे म्हणाले की, ''पाकिस्तान दहशतवादाविरुद्ध अनेक दशकांपासून युद्ध लढत आहे. दहशतवादाविरुद्धच्या लढाईत पाकिस्तानने 92,000 हजाराहून अधिक लोक गमावले, गेल्या वर्षी (2024) 200 हून अधिक हल्ल्यांमध्ये 1,200 हून अधिक लोक मारले गेले. बिलावल यांनी इशारा दिला की, जर हीच स्थिती राहिली तर 2025 हे वर्ष पाकिस्तानच्या इतिहासातील सर्वात रक्तरंजित वर्ष ठरु शकते."
भुट्टो यांनी पहलगाम हा दहशतवादी हल्ला असल्याचे मान्य केले. परंतु या हल्ल्यात पाकिस्तानने दहशतवादाला पाठिंबा दिल्याच्या आरोपांना त्यांनी 'प्रचार' म्हटले. ते म्हणाले की, ''पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनीही या हल्ल्याचा निषेध केला. एवढचं नाहीतर निष्पक्ष आंतरराष्ट्रीय चौकशीत सहभागी होण्याची ऑफर देखील भारताला दिली, पण त्यांनी ती नाकारली. आमचे हात स्वच्छ आहेत.''
दहशतवादाविरुद्ध सहकार्याचे आवाहन करु बिलावल यांनी भारत आणि पाकिस्तानमध्ये "व्यापक संवाद" घडवून आणण्याची वकिली केली, ज्यामध्ये दहशतवादाचा मुद्दा देखील समाविष्ट आहे. "दहशतवादाला तोंड देण्याचा एकमेव मार्ग म्हणजे सहकार्य," असेही ते म्हणाले.
2007 मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात त्यांची आई आणि माजी पंतप्रधान बेनझीर भुट्टो यांच्या हत्येचा संदर्भ देत बिलावल म्हणाले की, "मी देखील दहशतवादाचा शिकार आहे. पहलगाम हल्ल्यातील बळींचे आणि त्यांच्या कुटुंबियांचे दुःख मला समजते. "द्वेष आणि युद्धाच्या चर्चा टाळून शांततेसाठी काम केले पाहिजे. प्रत्येक पाकिस्तानी दहशतवादी किंवा शत्रू नाही."
बिलावल यांनी कबूल केले की, लष्कर-ए-तैयबा आणि जैश-ए-मोहम्मद सारख्या दहशतवादी संघटना पाकिस्तानमध्ये अस्तित्वात आहेत. तथापि त्यांनी सांगितले की, हे दहशतवादी गट अफगाण जिहाद दरम्यान उदयास आले.' बिलावल पुढे म्हणाले की, 'त्यांच्या आईने आणि त्यांच्या पक्षाने (पीपीपी) कधीही या गटांना पाठिंबा दिला नाही. 9/11 नंतर या गटांना दहशतवादी मानले गेले आणि पाकिस्तानने त्यांच्यावर कारवाई केली. त्यामुळे अफगाणिस्ताननंतर हे दहशतवादी काश्मीरकडे वळले.'
जेव्हा करण थापर यांनी हाफिज सईद आणि 2008 च्या मुंबई हल्ल्यांवरील पाकिस्तानच्या कारवाईबद्दल विचारले तेव्हा बिलावल म्हणाले की, हाफिज सईदला 2022 मध्ये 31 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली. तथापि, मुंबई हल्ल्याच्या खटल्यात कारवाईत झालेल्या विलंबासाठी बिलावल यांनी भारताला (India) जबाबदार धरले. ते म्हणाले की, भारताने खटल्यात सहकार्य केले नाही आणि साक्षीदारांना हजर करण्यास नकार दिला. मुंबईतील लोकांना न्याय मिळावा यासाठी आम्हाला सहकार्याची आवश्यकता आहे." जेव्हा बिलावल यांना मुलाखतीत लष्कर-ए-तैयबा, जैश-ए-मोहम्मद आणि हाफिज सईद सारख्या मुद्द्यांवर अनेक वेळा प्रश्न विचारण्यात आले तेव्हा ते चिडले आणि म्हणाले की, "जर तुम्हाला उत्तर ऐकायचे नसेल तर मी कार्यक्रम सोडू शकतो."
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.