
पाकिस्तानचे माजी परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो यांनी संयुक्त राष्ट्रांत त्यांच्याच देशाच्या गुप्तचर संस्थेचा पर्दाफाश केला. खरं तर, संयुक्त राष्ट्रात पत्रकार परिषदेदरम्यान बिलावल म्हणाले की, भारतीय एजन्सी जेव्हा आयएसआयशी बसून चर्चा करतील तेव्हाच दहशतवाद संपू शकतो. बिलावल यांच्या मते, याशिवाय दहशतवाद संपवण्यासाठी दुसरा कोणताही पर्याय नाही.
दरम्यान, मागील काही काळापासून भारत (India) सरकार पाकिस्तानच्या गुप्तचर संस्थेवर दहशतवाद्यांना पाठिंबा देण्याचा आरोप करत आहे. आयएसआयवर प्रॉक्सी दहशतवादी संघटना निर्माण करण्याचा आणि काश्मीर तसेच देशाच्या इतर भागात दहशतवादी पाठवून हल्ले घडवून आणण्याचा आरोप देखील आहे. जैश-ए-मोहम्मद, लष्कर-ए-तैयबा आणि हिजबुल मुजाहिदीन सारख्या दहशतवादी संघटनांना आयएसआयकडूनच मदत मिळते. तथापि, पाकिस्तानने कधीही अधिकृतरित्या हे मान्य केले नाही. जर पाकिस्तानमधून दहशतवादाला समूळ नष्ट करायचे असेल तर आयएसआयशी बोलावे लागेल, असे संकेत बिलावल यांनी पहिल्यांदाच दिले.
दुसरीकडे, पहलगाम हल्ल्यानंतर जेव्हा जगभरातून पाकिस्तानवर टीका झाली, तेव्हा संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांनी एका मुलाखतीत पाकिस्तानबद्दलचे सत्य स्वीकारले होते. स्काय न्यूजशी बोलताना आसिफ म्हणाले होते की, होय, पाकिस्तानने 2 दशकांपासून दहशतवाद्यांना पोसले, ज्यामुळे आम्हाला खूप त्रास सहन करावा लागला. मात्र आम्ही हे अमेरिका आणि ब्रिटनच्या इशाऱ्यावरुन केले.
बिलावल भुट्टो पाकिस्तानी खासदारांच्या शिष्टमंडळाचे नेतृत्व करत आहेत. या शिष्टमंडळाचे काम जगभरातील देशांना भारतासोबत शांतता चर्चेसाठी आवाहन करणे आहे. बिलावल सिंधू जलवाटप कराराच्या मुद्द्यावरही जगभरातील देशांकडून समर्थन मागत आहेत. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने सिंधू जलवाटप करार स्थगित केला. या निर्णयापासून पाकिस्तानला (Pakistan) सिंधू नदीचे पाणी मिळत नाही.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.