S Jaishankar Rajya Sabha Speech: मध्यपूर्वेतील बिघडत चाललेली परिस्थिती आणि इराण-युएई दरम्यान निर्माण झालेला तणाव या पार्श्वभूमीवर आज परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी राज्यसभेत महत्त्वाची माहिती दिली. आखातातील हा संघर्ष केवळ त्या क्षेत्रापुरता मर्यादित नसून तो संपूर्ण जगासाठी, विशेषतः भारतासाठी अत्यंत चिंतेचा विषय असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी या संपूर्ण घडामोडींवर स्वतः बारीक लक्ष ठेवून असून भारतीय नागरिकांची सुरक्षा आणि जागतिक पुरवठा साखळीवर होणारे परिणाम कमी करण्यासाठी संबंधित सर्व मंत्रालये एकमेकांच्या समन्वयाने प्रभावी पावले उचलत असल्याची ग्वाही जयशंकर यांनी दिली. भारताने यापूर्वीच अधिकृत भूमिका मांडत सर्वच बाजूंनी संयम बाळगण्याचे आवाहन केले असून केवळ संवाद आणि मुत्सद्देगिरीच्या (Diplomacy) माध्यमातूनच हा प्रश्न सुटू शकतो, असे भारताचे (India) ठाम मत असल्याचे त्यांनी नमूद केले.
परराष्ट्र मंत्र्यांनी या संघर्षाचे भारतासाठी असलेले गांभीर्य अधोरेखित करताना सांगितले की, पश्चिम आशिया हा भारताचा शेजारील प्रदेश असून या क्षेत्रातील स्थिरता भारताच्या हितसंबंधांसाठी अत्यंत आवश्यक आहे. खाडी देशांमध्ये आजमितीस सुमारे एक कोटी भारतीय नागरिक राहतात आणि काम करतात. त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न भारतासाठी सर्वात महत्त्वाचा आहे. याशिवाय, इराणमध्येही हजारो भारतीय विद्यार्थी शिक्षण घेत आहेत किंवा रोजगारासाठी तिथे वास्तव्यास आहेत.
भारताच्या ऊर्जा सुरक्षेच्या दृष्टीने हा प्रदेश कणा मानला जातो, कारण तेल आणि नैसर्गिक वायूचा मोठा पुरवठा याच भागातून होतो. युद्धाच्या या वातावरणामुळे जागतिक पुरवठा साखळी विस्कळीत होण्याचा धोका निर्माण झाला असून त्याचे थेट परिणाम भारताच्या अर्थव्यवस्थेवर होऊ शकतात, अशी भीती त्यांनी व्यक्त केली. हा संघर्ष आता केवळ दोन देशांपुरता मर्यादित न राहता शेजारील इतर देशांमध्येही पसरत चालला असून यामुळे विनाश आणि सामान्य जनजीवनावर होणारे परिणाम गंभीर असल्याचे त्यांनी सांगितले.
या युद्धाच्या झळा भारतीय नागरिकांनाही बसल्याची दुर्दैवी माहिती जयशंकर यांनी सभागृहात दिली. एका व्यापारी जहाजावर कार्यरत असलेल्या दोन भारतीय खलाशांचा या संघर्षात मृत्यू झाला असून एक भारतीय खलाशी अजूनही बेपत्ता आहे. ही घटना भारतासाठी अत्यंत क्लेशदायक असल्याचे सांगत त्यांनी मृतांच्या कुटुंबियांबद्दल संवेदना व्यक्त केल्या. तसेच, इराणची (Iran) राजधानी तेहरानमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांच्या सुटकेसाठी सुरु असलेल्या प्रयत्नांची माहिती त्यांनी दिली.
तेहरानमधील भारतीय दूतावास सध्या 'हाय अलर्ट' मोडवर असून अडकलेल्या विद्यार्थ्यांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी सक्रिय पावले उचलली जात आहेत. अनेक विद्यार्थ्यांना आर्मेनियाच्या मार्गाने भारतात परत आणण्यासाठी दूतावासाने सहकार्य केले. प्रत्येक भारतीय नागरिकाची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी सरकार पूर्णपणे कटिबद्ध असून दूतावास चोवीस तास संपर्कात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या संकटकाळात भारतीयांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची भूमिका सरकारने घेतली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.