दिल्ली: ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारतीय लष्कराने मोठी माहिती दिली आहे. भारतीय लष्कराच्या सांगण्यानुसार या कारवाईत पाकिस्तानी लष्कराचे ६४ सैनिक आणि अधिकारी ठार झाले आहेत. हे सर्वजण जम्मू-कश्मीरमध्ये तैनात भारतीय लष्करी तुकड्यांनी केलेल्या प्रतिउत्तर कारवाईत ठार झाले. या कारवाईत ९० हून अधिक पाकिस्तानी सैनिक जखमी झाले. ही माहिती भारतीय लष्कराने अधिकृतरीत्या पुरवलेली आहे.
भारतीय लष्करासोबतच परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी देखील सोमवारी संसदीय समितीपुढे यासंदर्भात महत्त्वाची माहिती दिली. त्यांनी सांगितले की भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सैनिकी संघर्ष पारंपरिक मर्यादेत राहिला आहे. पाकिस्तानकडून अण्वस्त्र वापराचा कोणताही धोका जाणवला नाही. लष्करी कारवाई थांबवण्याबाबत दोन्ही देशांमध्ये द्विपक्षीय सहमती झाली होती.
परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले की पाकिस्तान आपल्या भूमीवर घडलेल्या काही हत्यांसाठी भारतावर आरोप करतो, परंतु त्याच्याकडे कोणतेही ठोस पुरावे नाहीत. संयुक्त राष्ट्रांनी दहशतवादी ठरवलेले लोक पाकिस्तानमध्ये खुलेआम फिरतात आणि भारताविरोधात हिंसाचाराला खतपाणी घालतात. काही खासदारांनी परराष्ट्र सचिवांना विचारले की, पाकिस्तानने या संघर्षात चीन बनावटीच्या उपकरणांचा वापर केला होता का?
यावर उत्तर देताना विक्रम मिस्री म्हणाले की, याचा काहीही फरक पडत नाही. भारताने पाकिस्तानी हवाई तळे उद्ध्वस्त केले. डोनाल्ड ट्रंप यांनी सीझफायरचे श्रेय घेतल्याच्या विधानावरही त्यांनी खोचक टीका केली. ते म्हणाले की, ट्रंप यांनी तसे करण्यासाठी आमची परवानगी घेतलेली नव्हती. कोणत्याही देशाला जम्मू-कश्मीर विषयावर टिप्पणी करण्याचा अधिकार नाही.
गृह मंत्री अमित शहा यांनी सांगितले की, ऑपरेशन सिंदूर दरम्यान ब्रह्मोस क्षेपणास्त्रांनी पाकिस्तानी हवाई तळ उद्ध्वस्त केले. यापूर्वी सर्जिकल स्ट्राइक आणि एअर स्ट्राइक फक्त पाकिस्तानव्याप्त कश्मीरपुरते मर्यादित होते. पण ऑपरेशन सिंदूरमध्ये भारताने पाकिस्तानच्या सीमेत तब्बल १०० किलोमीटर आत घुसून दहशतवादी आणि त्यांचे अड्डे उद्धवस्त केले.
गृह मंत्री अमित शहा म्हणाले की, भारतीय हवाई दलाने अचूक लक्ष्य साधत पाकिस्तानला अनेक ठिकाणी जबरदस्त नुकसान पोहोचवले. त्यांनी अशा ठिकाणांना लक्ष्य केले, जे पाकिस्तान अभेद्य असल्याचे मानत होता. जेव्हा सीमावर्ती सुरक्षेचा इतिहास लिहिला जाईल, तेव्हा ऑपरेशन सिंदूरचे नाव सुवर्णाक्षरात लिहिले जाईल. पाकिस्तान जगासमोर नेहमी सांगत असे की त्यांच्या देशात कोणतीही दहशतवादी कारवाय होत नाहीत. पण ऑपरेशन सिंदूरमध्ये भारतीय क्षेपणास्त्रांनी दहशतवाद्यांचा खात्मा करत पाकिस्तानला संपूर्ण जगासमोर उघडे पाडले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.