Operation Sindoor: 'त्यांनी गोळी झाडली, पण आपण धमाका केला...'; भारताच्या मेजरने सांगितली ऑपरेशन सिंदूरची A टू Z माहिती
पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला भारताने 15 दिवसांनी घेतला. भारताने ऑपरेशन सिंदूर राबवत पाकिस्तानातील दहशतवाद्यांचे अनेक तळ उद्ध्वस्त केले. भारताच्या धडक लष्करी कारवाईत अनेक दहशतवादीही मारले गेले. भारताने पाकिस्तानचे अनेक हवाई तळही उद्ध्वस्त केले. गेल्या आठवड्यात भारत आणि पाकिस्तान यांच्यात कमालीचा तणाव वाढला होता. या तणावाच्या पार्श्वभूमीवर आता जम्मू आणि काश्मीरमधील भारतीय लष्कराच्या एका मेजरने ऑपरेशन सिंदूरबाबत A टू Z माहिती सांगितली. 'त्यांनी गोळी झाडली, पण आपण धमाका केला,' असे मेजरने म्हटले.
ऑपरेशन सिंदूरसाठी आधीच आम्ही तयार होतो
मेजरने सांगितले की, ''ऑपरेशन सिंदूर ही प्रतिक्रिया नव्हती. ही एक विचारपूर्वक आणि ध्येयाभिमुख कारवाई होती. आमचा हेतू अगदी स्पष्ट होता. आम्हाला शत्रूच्या पायाभूत सुविधा आणि घुसखोरीला चालना देणाऱ्या चौक्या नष्ट करायच्या होत्या. आम्ही यासाठी मानसिक, सामरिक आणि तार्किकदृष्ट्या पूर्णपणे तयार होतो.''
'आपली कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही'
मेजरने पुढे सांगितले की, 'पाकिस्तानला प्रत्युत्तर देण्यासाठी आपण स्वदेशी शस्त्रांचा आणि रडार प्रणालीचा वापर केला. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या सैनिकांचा उत्साह कमालीचा होता. पाकिस्तानकडून खूप गोळीबार झाला. पण मी अभिमानाने सांगू शकतो की, आपल्या बाजूने त्यांच्या प्रत्येक हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देण्यात आले. यादरम्यान आपली कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही.'
आमचा हेतू स्पष्ट होता...
मेजरने पुढे असेही सांगितले की, 'आमचे उद्दिष्ट दहशतवाद्यांच्या पायाभूत सुविधा नष्ट करणे हे होते. जेव्हा त्यांनी आपल्या नागरी क्षेत्रांना आणि लष्करी आस्थापनांना लक्ष्य करायला सुरुवात केली तेव्हा आमचा हेतू स्पष्ट होता. त्यांनी आपल्या सीमावर्ती भागातील गावांवर गोळीबार केला पण आम्ही केवळ त्यांच्या लष्करी चौक्या उद्ध्वस्त केल्या. आम्ही त्यांच्या प्रत्येक हल्ल्याला उत्तर दिले. आम्ही खात्री केली की, कोणताही नागरिक मारला जाणार नाही.'
पाकिस्तानचे मनोबलही खचले
'ऑपरेशन सिंदूरने केवळ त्यांच्या चौक्याच उद्ध्वस्त केल्या नाहीत तर त्यांचे मनोबलही खच्ची केले. आम्ही मिळालेल्या संधीचा पुरेपूर फायदा घेतला. पाकिस्तानला हे ऑपरेशन नेहमीच लक्षात राहील. तसेच, भविष्यात काहीही करण्यापूर्वी ते शंभर वेळा विचार करतील, असेही मेजरने नमूद केले.
अखनूर सेक्टरमध्ये चोख प्रत्युत्तर देण्यात आले
भारतीय लष्कराच्या तोफखान्यांनी धाडस आणि अचूकतेचे शक्तिशाली प्रदर्शन केले. अखनूर सेक्टरमध्ये पाकिस्तानने (Pakistan) केलेल्या शस्त्रसंधीच्या उल्लंघनाला चोख प्रत्युत्तर दिले, असेही मेजरने सांगितले.
शत्रूंच्या चौक्यांना लक्ष्य करण्यात आले
'ऑपरेशन सिंदूर अंतर्गत आमचे लक्ष्य अगदी स्पष्ट होते. आम्हाला दहशतवाद्यांच्या पायाभूत सुविधा आणि घुसखोरीला पाठिंबा देणाऱ्या शत्रूच्या चौक्यांना लक्ष्य करायचे होते, असेही शेवटी मेजरने सांगितले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

