जर तुम्ही वाहनचालक असाल आणि दररोज गाडी घेऊन रस्त्यावर जात असाल, तर आता अधिक सावध राहण्याची वेळ आली आहे. केंद्र सरकारने रस्ते अपघातांमध्ये घट आणण्यासाठी आणि वाहतूक शिस्त राखण्यासाठी वाहतूक नियम अधिक कडक केले आहेत. 2025 पासून हे नवे नियम लागू करण्यात आले असून नियम मोडणाऱ्यांसाठी मोठा दंड आणि तुरुंगवासाचीही शिक्षा ठोठावण्यात येणार आहे.
गेल्या काही वर्षांत अनेक अपघात अल्पवयीन मुलांकडून गाडी चालवल्याने घडल्याचे आढळून आले आहे. आता सरकारने अशा घटनांना रोखण्यासाठी कठोर पावले उचलली आहेत.
नवीन कायद्यानुसार जर एखादा अल्पवयीन मुलगा किंवा मुलगी गाडी चालवत असताना पकडला गेला, तर पालकांवर २५,००० रुपये दंड ठोठावला जाईल. तसंच ३ वर्षांपर्यंत तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते.
संबंधित वाहनाची नोंदणी एका वर्षासाठी रद्द केली जाईल. आणि त्या अल्पवयीन व्यक्तीस २५ वर्षांपर्यंत ड्रायव्हिंग लायसन्स मिळणार नाही.
दारूच्या नशेत वाहन चालवणं हे केवळ निष्काळजीपणाचं लक्षण नाही, तर ते एक गंभीर गुन्हा आहे ज्यामुळे अनेक वेळा अपघात होऊन प्राणहानी देखील होते. अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी सरकारने आता अधिक कठोर पावलं उचलली आहेत.
पहिल्यांदा दारूच्या नशेत पकडल्यास, संबंधित व्यक्तीला १०,००० रुपये दंड आणि ६ महिने तुरुंगवास होऊ शकतो.पुन्हा तसंच गुन्हा केल्यास, दंडाची रक्कम वाढून १५,००० रुपये केली जाईल आणि २ वर्षांपर्यंत तुरुंगवास होऊ शकतो.
वाहतूक सिग्नल तोडणे म्हणजे स्वतःच्या आणि इतरांच्या जीवाशी खेळण्यासारखे आहे. म्हणून सरकारने या प्रकारावरही कठोर भूमिका घेतली आहे. आधी ५०० रुपयांचा दंड असलेल्या या नियमाचा आता दंड ५,००० रुपयांपर्यंत वाढवण्यात आला आहे.
नवीन वाहतूक नियम फक्त दंड व शिक्षा वाढवण्यासाठी नाहीत, तर लोकांमध्ये शिस्त आणि सुरक्षा भावना निर्माण करण्यासाठी आहेत. त्यामुळे वाहन चालवताना नियमांचे काटेकोर पालन करा, अन्यथा आर्थिक नुकसान तर होईलच, पण कायदेशीर कारवाईलाही सामोरे जावे लागेल.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.