Gopal Ganesh Agarkar Jayanti: मराहाष्ट्रातील थोर समाजसुधारक गोपाळ गणेश आगरकर यांची दरवर्षी 14 जुलै रोजी जयंती साजरी केली जाते. महाराष्ट्राच्या सामाजिक आणि वैचारिक इतिहासातील आगरकर हे अत्यंत महत्त्वाचे नाव होते. त्यांच्या विचारांनी समाजाला प्रगतीच्या नव्या वाटा दाखवल्या, पण त्याचवेळी त्यांना प्रचंड विरोधालाही सामोरे जावे लागले. त्यांच्या आयुष्यातील 'जिवंतपणीच प्रेतयात्रा' हा प्रसंग त्यांच्या निर्भीड विचारांची आणि त्यासाठी त्यांनी सोसलेल्या संघर्षाची साक्ष देतो.
गोपाळ गणेश आगरकर (14 जुलै 1856 - 17 जून 1895) हे एक बुद्धिप्रामाण्यावादी विचारवंत, थोर समाजसुधारक, पत्रकार आणि शिक्षणतज्ज्ञ होते. आधुनिक महाराष्ट्राच्या सामाजिक जागृतीमध्ये त्यांचे योगदान अनमोल आहे. त्यांनी लोकमान्य टिळकांसोबत 'केसरी' वृत्तपत्राचे संपादन केले. तसेच, 'डेक्कन एज्युकेशन सोसायटी' आणि 'फर्ग्युसन महाविद्यालय' यांसारख्या संस्थांच्या स्थापनेत त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. मात्र, त्यांचे खरी ओळख त्यांच्या 'सुधारक' या वृत्तपत्रातून त्यांनी मांडलेल्या पुरोगामी विचारांमुळे झाली.
आगरकरांचे विचार हे बुद्धिप्रामाण्यवाद, व्यक्तिस्वातंत्र्य, समता, स्वातंत्र्य, वैज्ञानिक दृष्टी, इहवाद आणि मानवतावाद या तत्त्वांवर आधारित होते. त्यांनी तत्कालीन समाजातील अनिष्ट रुढी, परंपरा, अंधश्रद्धा, बालविवाह, अस्पृश्यता, जातीभेद यांवर कठोर टीका केली. स्त्री-पुरुष समानतेचे ते पुरस्कर्ते होते. एवढचं नाहीतर त्यांनी स्त्रियांच्या शिक्षणाचे त्यांनी हिरिरीने समर्थन केले. धर्माच्या चौकटीत अडकून न राहता, मानवी कल्याणासाठी बुद्धीचा आणि विज्ञानाचा आधार घ्यावा, असे त्यांचे मत होते. त्यांच्या या क्रांतीकारक विचारांमुळे त्यांना सनातनी लोकांकडून प्रचंड विरोध झाला. तत्कालीन समाजाला त्यांचे विचार पचनी पडले नाहीत. त्यांच्या विचारांनी समाजात 'विचारकलह' निर्माण केला, जो आगरकर समाजस्वास्थ्यासाठी आवश्यक मानत होते.
आगरकरांच्या जीवनातील सर्वात हृदयद्रावक आणि त्यांच्या निर्भय वृत्तीची साक्ष देणारा प्रसंग म्हणजे त्यांची जिवंतपणी काढण्यात आलेली प्रतीकात्मक प्रेतयात्रा.
1891 साली 'संमती वया'च्या कायद्यावरुन समाजात मोठा वाद निर्माण झाला होता. हा कायदा मुलींच्या विवाहाचे वय वाढवण्यासंबंधी होता, ज्याला सनातनी लोकांचा तीव्र विरोध होता. आगरकरांनी या कायद्याचे समर्थन केले, कारण त्यांना सामाजिक सुधारणा अत्यंत आवश्यक वाटत होत्या. त्यांच्या मते, राजकीय स्वातंत्र्यापूर्वी सामाजिक सुधारणा घडवून आणणे अधिक महत्त्वाचे होते, जेणेकरुन सुशिक्षित आणि प्रगल्भ समाजच स्वातंत्र्याचा चांगल्या प्रकारे उपयोग करु शकेल. या भूमिकेमुळे समाजातील कट्टर लोकांनी त्यांच्यावर संताप व्यक्त केला.
याच वादातून, पुण्यातील (Pune) काही सनातनी लोकांनी आगरकरांच्या विचारांचा निषेध करण्यासाठी त्यांची प्रतीकात्मक प्रेतयात्रा काढली. ही प्रेतयात्रा ओंकारेश्वर मंदिराजवळील आगरकरांच्या घरासमोरुन काढण्यात आली होती. या प्रसंगावर आगरकरांनी आपल्या 'फुटके नशीब' या आत्मचरित्रात भाष्य केले आहे. त्यांनी नमूद केले आहे की, "मी एकमेव असा समाजसुधारक आहे, ज्याने स्वतःच्या डोळ्यांनी स्वतःचाच अंत्यविधी पाहिला."
याशिवाय, या प्रसंगाचा उल्लेख आगरकरांच्या चरित्रांमध्ये ‘सुधारक’च्या काही संपादकीय लेखांमध्ये आणि विचारवंतांच्या वैचारिक लेखनांमध्ये आढळतो. डॉ. व. ग. बापट यांच्या ‘आगरकर – जीवन आणि कार्य’ या चरित्रग्रंथातही या प्रसंगाचा उल्लेख आहे. आगरकरांनी या सर्व प्रसंगाकडे तटस्थ आणि संयमी दृष्टिकोन ठेवला होता. ते म्हणाले होते की, “माझ्या मृत्यूची अफवा पसरवणाऱ्यांनी त्यांच्या वैचारिक दिवाळखोरीचेच प्रदर्शन केले आहे.”
दुसरीकडे, आगरकरांच्या जीवनातील हा प्रसंग आजच्या समाजालाही विचार करायला लावतो. समाजाला सुधारणा नको असते, कारण ती साचलेल्या विचारांना ढवळून काढते. पण इतिहास साक्षी आहे की, सुधारक मरतो, पण विचार नाही. आगरकरांच्या मृत्यूच्या अफवेने त्यांचे विचार मरले नाहीत उलट त्यांच्या विचारांची प्रेतयात्रा काढणाऱ्यांची वैचारिक अंत्ययात्रा ठरली.
हा प्रसंग आगरकरांच्या आयुष्यातील एक मैलाचा दगड ठरला. यातून त्यांची विचारधारेची निष्ठा आणि कोणत्याही विरोधाला न घाबरता आपल्या तत्त्वांवर ठाम राहण्याची वृत्ती स्पष्ट होते. आजही 'जिवंतपणी प्रेतयात्रा' हा उल्लेख आगरकरांच्या त्यागाचे आणि दूरदृष्टीचे प्रतीक म्हणून केला जातो. आगरकर हे असे सुधारक होते, ज्यांनी समाजाच्या बौद्धिक जडणघडणीत मोठे योगदान दिले. त्यांचे विचार आजही तितकेच प्रासंगिक आहेत आणि ते आपल्याला समाज सुधारणेसाठी निर्भीडपणे उभे राहण्याची प्रेरणा देतात.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.