नवी दिल्ली: होळीपूर्वी केंद्र सरकार आपल्या लाखो कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी आनंदाची बातमी घेऊन येण्याची शक्यता आहे. मोदी सरकार लवकरच महागाई भत्त्यात (DA) वाढ करण्याची अधिकृत घोषणा करू शकते. कामगार ब्युरोच्या ताज्या आकडेवारीनुसार, यावेळेस महागाई भत्त्यात २ टक्क्यांची वाढ निश्चित मानली जात आहे, ज्यामुळे कर्मचाऱ्यांच्या पगारात आणि पेन्शनमध्ये मोठी वाढ होणार आहे.
सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना ५८ टक्के दराने महागाई भत्ता मिळत आहे. जर सरकारने २ टक्क्यांच्या वाढीवर शिक्कामोर्तब केले, तर हा भत्ता आता मूळ वेतनाच्या (Basic Salary) ६० टक्क्यांपर्यंत पोहोचेल. ही वाढ १ जानेवारी २०२६ पासून लागू मानली जाईल. 'ऑल इंडिया कन्झ्युमर प्राईस इंडेक्स' (CPI-IW) च्या डिसेंबर २०२५ च्या आकडेवारीनुसार, निर्देशांक १४८.२ अंकांवर स्थिर राहिल्याने २ टक्क्यांची वाढ तांत्रिकदृष्ट्या निश्चित झाली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली मार्च २०२६ च्या सुरुवातीला होणाऱ्या कॅबिनेट बैठकीत या निर्णयाला मंजुरी मिळण्याची दाट शक्यता आहे. मार्चमध्ये ही घोषणा झाल्यास, होळीच्या सुमारास मिळणाऱ्या पगारात केवळ वाढीव वेतनच नाही, तर जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्याचे थकीत 'एरियर' (Arrears) देखील जमा होईल. सणासुदीच्या काळात खात्यात येणारी ही मोठी रक्कम कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा ठरणार आहे.
ही वाढ ७ व्या वेतन आयोगाच्या शिफारशींनुसारच केली जाणार आहे. ८ व्या वेतन आयोगाच्या स्थापनेबाबत सरकारने अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा केली नसली तरी, ३१ डिसेंबर २०२५ रोजी ७ व्या वेतन आयोगाचा औपचारिक कालावधी संपल्यानंतरची ही पहिलीच वेतन समीक्षा असेल. याचा फायदा सुमारे ५० लाखांहून अधिक केंद्रीय कर्मचारी आणि ६५ लाखांहून अधिक पेन्शनधारकांना मिळणार आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.