Women Empowerment Dainik Gomantak
ब्लॉग

Blog : स्त्रीला किमान माणूस तरी समजा

आपल्या घरातील गृहिणीला कधीतरी विचारा, तुला काही मदत हवी आहे का? एक कप चाय की प्याली स्वतःच्या हातांनी द्या, तिच्या कलागुणांना वाव द्या, कौतुक करा.

दैनिक गोमन्तक

आसावरी कुलकर्णी

‘यत्र नार्यन्तु पूज्यते वसते तत्र देवता’, नदीतल्या गुळगुळीत झालेल्या दगडासारखा झालेला हा श्लोक. ज्या घरात स्त्री नसते, किंवा तिचे लक्ष नसते ते घर वाळवंटापेक्षा कमी नसते हे कितीही सत्य असले तरी घरातल्या स्त्रीची फुलांनी सोडा शाब्दिक खेटरानीच पूजा होते अस म्हटले तर वावगे ठरणार नाही.

कमावती नसल्यामुळे येणारे आर्थिक परावलंबित्व, त्याचमुळे आपल्याबद्दल असलेला प्रचंड न्यूनगंड, दुसऱ्या कमावत्या बाईबद्दल नकळत निर्माण होणारी असूया, आणि अशा मानसिक दबावामुळे ढासळणारे आरोग्य अशा समस्यांच्या गर्तेत गृहिणी सापडते.

पूर्वीच्या काळी सण उत्सव, जत्रा, इत्यादी वेळी स्त्रिया एकत्र यायच्या. त्याशिवाय शेती वगैरे करण्यासाठी एकमेकांना मदत करायला जायची पद्धत होती. अशावेळी मनातले बोलायला स्त्रियांना संधी मिळायची.

पण आता न्युकलिअर कुटुंबपद्धती, किंवा एकूणच वेगवान झालेल्या जगात, व्हाट्सअ‍ॅपच्या माध्यमातून स्त्रिया भेटतात. पण इथेही बोलताना मूळ समस्या किंवा आरोग्यविषयक असे काही न बोलता एकमेकींच्या उखाळ्यापाखाळ्या काढण्यात स्त्रिया धन्यता मानतात. दूरदर्शनवर लागणाऱ्या मालिकांनी तर स्त्रीवर्गाला अक्षरशः काळाच्या मागे नेण्याचे पाप केले आहे.

आत्मनिर्भर होण्यासाठी लागणारा आत्मविश्वास, लागणारे कौशल्य याकडे काही स्त्रिया दुर्लक्ष करतात आणि त्यामुळे चालत आलेल्या दुष्टचक्रात नकळत अडकतात. सर्वेक्षणात समोर आले त्याप्रमाणे 60 वर्षे वयाच्या वरच्या महिलांना या सगळ्याचा एवढा त्रास होत नाही किंवा त्यांना यात वावगे वाटत नाही.

पण 40 ते 55 या वयोगटातील महिलांना या समस्या मोठ्या प्रमाणात भेडसावतात. कारण पिढ्या बदलतात त्याप्रमाणे विचारांची प्रखरता, त्याचे आयाम बदलतात. पूर्वी शिक्षण ही गरजेची गोष्ट नव्हती, त्यामुळे जे चालले आहे तेच नशिबाचा भाग आहे किंवा समाजाची चालरीत आहे असे या पिढीचे मानणे आहे.

या उलट 90 दशकानंतर शिक्षण घेणे, नोकरी करणे ही हळूहळू गरजेची बाब झाली, आणि त्यामुळे शिक्षण घेतल्यानंतर नोकरी गरजेचीच आहे असे या पिढीला वाटते. महिला-बाल कल्याण, महिला मंडळ, स्वयंसाहाय्य गट याद्वारे गृहिणी वर्गासाठी सुवर्ण काळच आला. वेगवेगळी कौशल्य शिकवण्याचे वर्ग गावागावांतून सुरू झाले.

या माध्यमातून घरच्या घरी काहीतरी उद्योग महिला करू लागल्या, त्यातून आर्थिक सक्षमता येऊन आत्मविश्वास वाढला. या मधूनच काही यशस्वी उद्योजिका तयार झाल्या. घर, चूल, मूल सांभाळून आर्थिक बाजूही सांभाळता येऊ शकते हे गृहिणींनी सिद्ध केले.

पण मूळ समस्या ही नाहीच. स्त्रीला गृहिणी असल्याची समस्या नाहीच, हे आपण सर्वेक्षणातून पाहिले. पण तुमच्या नावाच्या मागे टीचर, डॉक्टर, प्रोफेसर, अगदी क्लार्क किंवा उद्योजिका असे लागले की समाजातील वजन वाढते, तुम्हाला मानमरातब मिळतो, आणि फक्त गृहिणी म्हटले की कुणीही मान देत नाहीत ही वस्तुस्थिती आहे.

माझ्या आईला कुणीही विचारले की तुम्ही काय करता किंवा करत होता तेव्हा ती अभिमानाने सांगते मी माझ्या मुलींना घडवले. समाजाचा एक सुदृढ नागरिक बनविण्याचे आणि त्याचमुळे सुदृढ समाज घडविण्याचे महत्त्वाचे काम गृहिणी करते आणि त्याचमुळे देवी म्हणून नाही तर निदान माणूस म्हणून वागवले जाणे गरजेचे आहे.

एवढी साधी अपेक्षा गोव्याच्या गृहिणीची आहे. आपल्या घरातील गृहिणीला कधीतरी विचारा, तुला काही मदत हवी आहे का? कधीतरी तिच्या कामात हातभार लावा, एक कप चाय की प्याली स्वतःच्या हातांनी द्या, तिच्या कलागुणांना वाव द्या, कौतुक करा, ऋतूतली फुले तिच्या ओंजळीत घाला. बघा ती करते त्याहीपेक्षा दुप्पट उत्साहाने ती आपले काम करेल, आणि ‘रमते तत्र देवता’ हा श्लोक प्रत्यक्ष अनुभवायची संधी तुम्हाला मिळेल.

आज एखादा केवडा, सुरंगी, किंवा अबोलीची फाती घेऊन जाच!

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

हडफडे अग्नितांडव प्रकरण! 'बर्च बाय रोमिओ लेन'च्या मालकांचे धाबे दणाणले; अजय गुप्ताची जामिनासाठी कोर्टात धाव

Goa Raj Bhavan Name Change: गोव्यात ऐतिहासिक निर्णय! 'राजभवन' आता ओळखले जाणार 'लोकभवन' नावाने; राज्यपालांनी पुसली वसाहतवादी ओळख

Cyber Fraud: 'अनन्या'च्या जाळ्यात अडकला एसबीआय क्लर्क, फेसबुकवरची एक फ्रेंड रिक्वेस्ट अन् 92 लाखांचा गंडा; काय नेमकं प्रकरण?

बेतुल ONGC परिसरात अग्नितांडव! वेल्डिंगच्या ठिणगीमुळे भीषण आग; प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला

IND vs SA 4th T20: 'तीन पोती गहू विकून आलो होतो...', भारत-दक्षिण आफ्रिका सामना रद्द झाल्याने चाहत्याचा टाहो; BCCI वर टीकेची झोड VIDEO

SCROLL FOR NEXT